Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी ��ंबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात; आगामी २१ जूनपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी.
· कोविड संसर्ग दर जास्त असलेल्या बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा.
· राज्यात नऊ हजार ७९८ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २० जणांचा मृत्यू तर ५८५ बाधित.
· इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी येत्या २६ जूनला चक्काजाम आंदोलन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा इशारा.
· बुलेट ट्रेनच्या नियोजनात, मुंबई- औरंगाबाद- नांदेड- हैद्राबाद, मार्ग प्रस्तावित करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मागणी.
आणि
· महान धावपटू ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग आणि औरंगाबादमधील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचं निधन.
****
राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र शासनानं राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागानं लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून, त्याप्रमाणे आजपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरण सत्रांचं नियोजन करण्याकरता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.
****
देशात आगामी २१ जूनपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २६ राज्यांमधल्या १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये, आघाडीच्या कामगारांसाठी हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. देशभरातल्या एक लाखांहून अधिक फ्रंटलाईन कामगारांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं या कार्यक्रमाचं उद्दीष्ट असून, या योजनेसाठी एकूण २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
****
कोविड संसर्ग दर जास्त असलेल्या जिल्ह्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आढावा घेतला, यामध्ये बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात पवार यांनी बैठक घेतली.
कोविड काळात एक वर्षाचा आमदार निधी संबंधित मतदार संघात खर्च करण्याच्या परवानगी बाबत, लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं, पवार यांनी बीड इथल्या बैठकीनंतर सांगितलं. जिल्ह्यातल्या कोविड संसर्गाबाबत चिंता व्यक्त करत, स्थानिक पातळीवरील आरोग्य विषयक प्रश्न लवकरच मार्गी लावू, असं पवार म्हणाले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
उस्मानाबाद इथं झालेल्या बैठकीत पवार यांनी, १५ जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची सूचना केली. जिल्ह्यात खतांच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी, लवकरच कृषी आयुक्तांना निर्देश देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात उस्मानाबाद जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेऊन, लहान मुलांसाठीचे औषधोपचार, त्यासाठी स्वतंत्र रुग्णखाटांची उपलब्धता, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला त्यांनी निर्देश दिले
दरम्यान, कोविड परिस्थितीत आरोग्य विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी बीड इथं पवार यांच्या बैठकीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. तीन महिन्याचं वेतन न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप, या कर्मचाऱ्यांनी केला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वाहन अडवण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला. यात तीन आंदोलक जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काल नऊ हजार ७९८ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ५४ हजार ५०८ झाली आहे. काल १९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १६ हजार ६७४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार ३४७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ९९ हजार ९८३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३४ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ५८५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, जालना तीन, उस्मानाबाद दोन, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १५६ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद १४१, औरंगाबाद १३०, परभणी ४९, लातूर ३९, जालना ३२, नांदेड २६, तर हिंगोली जिल्ह्यात १२ नवे रुग्ण आढळून आले.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी महाविकास आघाडी सरकारने गेल्या दीड वर्षात एक दमडीही दिली नसल्याची टीका, माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेसाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. ते म्हणाले –
माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हात जोडून विनंती केली होती की, पक्षविरहीत तुम्ही ही योजना करा. तुम्हाला या योजनेला ज्याचं नाव द्यायचं त्याच नाव द्या, पण आमची योजना करा. दोन कोटी लोकांच्या वतीनं आम्ही हात जोडून विनंती केली, पण या सरकारच्या हृदयाला पान्हा फुटला नाही. या सरकारनं दिड वर्षात दमडी दिली नाही. मराठवाड्यावर अन्याय करु नका, नसता आम्ही रस्त्यावरची आंदोलनाची लढाई लढू. आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाची लढाई लढू. आम्ही विधानसभेमध्ये सरकारला मराठवाडा वॉटरग्रीड करायला भाग पाडू.
****
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर मागासवर्गीय - ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानं समाजात अतिशय संतप्त भावना असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ओबीसींना हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा, भाजप ��ेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. मंत्र्यांनी या प्रश्नी आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी अपेक्षित माहितीचं संकलन करावं, असं मुंडे यांनी नमूद केलं, त्या म्हणाल्या –
सरकारमधले मंत्रीच ओबीसी वर अन्याय झाला म्हणून मोर्चे काढण्याची भाषा करतायेत. सरकारमधलेच मंत्री हे ओबीसीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. मला वाटतं हे ओबीसीच्या भविष्याबद्दल ही जी वागणूक आहे हा पूर्ण खेळ थांबतो का हा ओबीसीच्या भविष्याचा या सरकारनी केलेला आहे. आणि त्याबद्दल आम्ही नक्की आवाज उचलणार. आपल्याला मी सांगते आम्ही न्यायालयामधे दाद मागणार. आम्ही २६ तारखेला महाराष्ट्रामधे चक्काजाम आंदोलन करणार आणि ओबीसीचा हा संताप रस्त्यावर आणणार.
ओबीसी आरक्षणाचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही, राज्य सरकारनं या प्रकरणी तत्काळ पावलं उचलून कार्यवाही करण्याची गरज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच या अभ्यासक्रमासाठी सीईटीही घेतली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात बुलेट ट्रेनच्या नियोजनात, मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद, असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना या मार्गाची आवश्यकता आणि प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली.
****
राज्य शासनानं नांदेड जिल्ह्यात उर्ध्व पैनगंगा नदीवर प्रस्तावित सहा उच्च पातळी बंधाऱ्यांना, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित केलं आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हदगाव तालुक्यात पांगरा साप्ती तसंच बनचिंचोली, गोजेगाव, हिमायत नगर तालुक्यात घारापूर, किनवट आणि माळेगाव इथल्या बंधाऱ्यांचा यात समावेश आहे.
****
राज्यघटनेतलं शेतकरी विरोधी कायदे असलेलं परिशिष्ट नऊ रद्द करावं, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. काल औरंगाबाद, नांदेड, लातूर आदी ठिकाणी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचं निवेदन सादर केलं. या परिशिष्टाअंतर्गत २८४ कायदे आहेत, मात्र यापैकी कमाल जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, असे अनेक कायदे शेतकरी विरोधी असल्यानं, हे परिशिष्ट रद्द करावं, अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
महान धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचं काल रात्री चंदीगढ इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होतं, घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मिल्खा सिंग यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. १९६२ मधल्या जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि रिलेमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. मराठवाडा विकास आंदोलन, आणि उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला व्हावं, यासाठी झालेल्या लढ्यात त्यांचा मोठा वाटा होता. मराठवाडा जनता विकास परिषद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था आणि इतर अनेक संस्थांच्या कामात ते अखेरपर्यंत सक्रिय होते. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी त्यांनी लढा दिला.
****
नांदेड शहरात वाचन चळवळीला प्रेरणा देणारे ग्रंथमित्र बस्वराज कडगे यांच काल निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. नांदेड शहरातलं फिरतं ग्रंथालय म्हणून कडगे परिचित होते. वाचनाची आवड असलेल्या लोकांना ते घरपोहोच पुस्तकं देत असत. राष्ट्रसेवा दल तसंच नांदेड नागरी कृती समितीचे ते सक्रीय सदस्य होते.
****
लातूर जिल्ह्यात बाभळगाव ग्रामपंचायतीनं कबाले वाटप झालेल्या भूखंडावर, या समाजातल्या लोकांसाठी सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त अशी एक सुंदर वसाहत निर्माण करावी, असं आवाहन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात गौड राजगौड समाजातल्या ४१ लाभार्थ्यांना काल कबाले वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या भूखंडावर ग्रामपंचायतीनं रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधेचा पुरवठा करावा, असं ते म्हणाले.
****
डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमएच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं, काल आयएमएच्या सभागृहात आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेधाचे फलक झळकावत, जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टरांवरील हल्ले थांबले पाहिजे, डॉक्टरांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे, यासह अन्य मागण्या आयएमए औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ.यशवंत गाडे, डॉ.उज्वला दहिफळे यांच्यासह सहभागी डॉक्टरांनी केल्या. नांदेड इथंही संघटनेच्या सदस्य डॉक्टरांनी निदर्शनं करत, डॉक्टरांवरचे हल्ले रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची मागणी केली.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून, दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या एफआरपी रकमेवर पंधरा टक्के व्याज आकारावं, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते, प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे सादर केलं.
****
लातूर इथले भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष पठाण अफझलखान, शहर सरचिटणीस पठाण अफसरखान, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी या सर्वाचं स्वागत करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
****
0 notes