Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत; महागठबंधनला ११० जागांवर विजय.
· मध्यप्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत २८ पैकी १९ जागांवर तर गुजरातमधल्या आठही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी.
· कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय.
· एसटी कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यांचं थकीत पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देणार- परिवहन मंत्री अनिल परब.
· राज्यात आणखी तीन हजार ७९१ तर मराठवाड्यात ३३३ नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद.
आणि
· मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रिमियर लीगचं पाचव्यांदा विजेतेपद.
****
बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सत्ता कायम राखली आहे. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं १२५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. तर विरोधी महागंठबंधनला ११० जागांवर विजय मिळाला. भारतीय जनता पक्षानं ७४, संयुक्त जनता दलानं ४३ जागा जिंकल्या, तर हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि विकासशील इंसान पार्टीनं प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला.
तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलानं ७५, काँग्रेसनं १९ जागांवर विजय मिळवला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्स लेनिनवादी गटानं १२, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षानं पाच जागा जिंकल्या.
****
दरम्यान, अकरा राज्य विधानसभांच्या ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची सरशी झाल्याचं दिसून येत आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं १९ जागांवर, तर काँग्रेसनं नऊ जागांवर विजय मिळवला.
गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्व आठ जागांवर विजय मिळवला.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं सहा जागा जिंकल्या तर समाजवादी पार्टीला एक जागेवर विजय मिळाला.
मणिपूर विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली, इथे भाजपनं चार जागा जिंकल्या असून, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
नागालँडमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि अपक्ष उमेदवार एकेका जागेवर विजयी झाले.
ओडिशातल्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बिजू जनता दलाचे उमेदवार विजयी झाले.
हरियाणा तसंच छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली, या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.
झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक झाली, इथं काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले.
कर्नाटक विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली, या दोन्ही जागात भाजपनं जिंकल्या असून तेलंगणातल्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही भाजप उमेदवार विजयी झाला.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेतलं जाणार आहे. काल मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं हिवाळी अधिवेशन घेणं उचित होणार नाही, अशा सूचना अनेक सदस्यांनी यावेळी केल्या. येत्या सात डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का आणि अधिवेशन किती दिवसांचं असावं, याबाबत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांचं मागील तीन महिन्यांचं थकीत पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टाळेबंदीमुळे पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचं नुकसान झालं. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत जाऊन कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत राहिल्याचं परब यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत काल बैठक झाली. आणि त्यानंतर शासनाकडून एसटीसाठी आगामी सहा महिन्यांकरता एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती परब यांनी दिली. ते म्हणाले –
राज्य शासनाने हे मान्य केलंय की एस टी कर्मचाऱ्यांचं ३० ऑक्टोबरपर्यंतचं पूर्ण वेतन हे दिवाळीपूर्वी मिळेल. हा विकाराचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. किंवा राज्य शासनाकडे वारंवार पैसे मागितले जातात. म्हणून मी अजित दादांकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला सहा महिन्यांचं एकंदर पॅकेज द्या. आणि अजित दादांनी सर्व खात्यांशी चर्चा करून एक हजार कोटीचं पॅकेज एस टी महामंडळाला जाहीर केलेलं आहे.
****
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तीवाद काल संपल्यानं न्यायालय उद्या आपला निर्णय देणार आहे. तर अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आज आपलं म्हणणे सादर करणार आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावरही आज सुनावणी होणार आहे.
****
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट - टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंह यांना अटक करण्यात आली आहे. आजपर्यंत या प्रकरणात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रींचं पालन करावं असं आवाहन नवी मुंबईतल्या वारली चित्रकार उज्ज्वला भाटे यांनी केलं आहे.
****
राज्यात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून, त्यासाठी शाळेतल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागानं काल शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. शिक्षकांना १७ ते २२ नोंव्हेंबर दरम्यान चाचणी करणं आवश्यक असून, नकारात्मक प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीस सादर करावं लागणार आहे.
****
विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोन उमेदवार काल जाहीर केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात काल सहा जणांनी अर्ज दाखल केले. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी काल अर्ज दाखल केला. माजी खासदार जयसिंग गायकवाड, आशिष देशमुख, भारत फुलारे यांनी अपक्ष म्हणून, तर बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीकडून यशवंत कसबे यांनी अर्ज दाखल केला.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - मनरेगा अंतर्गत राज्यातल्या ग्रामीण भागात एक लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते, तसंच इतर खडीकरणाचे रस्ते बांधले जाणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. मनरेगामधून ‘हरघर गोठे - घरघर गोठे’ उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मनरेगांतर्गत बंधनकारक असलेलं कुशल-अकुशल कामावरच्या खर्चाचं प्रमाणही, यामधून राखलं जाणार असून, गावांमध्ये रोजगार निर्मिती होणार असल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात १२ सनदी अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर, तर शिवानंद टाकसाळे यांची अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी तीन हजार ७९१ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख २६ हजार ९२६ झाली आहे. राज्यभरात काल ४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४५ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार ७६९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख ८८ हजार ९१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ९२ हजार ४६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात नऊ कोविड बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३३३ रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू, तर नवे ९५ रुग्ण, परभणी जिल्ह्यात दोन मृत्यू, तर नवे २५ रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ७२, तर नांदेड जिल्ह्यात नव्या ३४ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात ३६, जालना जिल्ह्यात ३५, उस्मानाबाद जिल्ह्यात २५, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या ११ रुग्णांची भर पडली.
****
मुंबईत काल आणखी ५३५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १९ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ४५७ नवे रुग्ण, तर एका मृत्यूची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात १८० रुग्ण आढळले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २५०, सोलापूर २८१, सातारा १७५, गोंदिया ६६, गडचिरोली ६१, सांगली ६३, यवतमाळ ४५, जळगाव ३६, बुलडाणा ३५, अमरावती ३३, नंदुरबार २३, धुळे १८, सिंधुदुर्ग १३, वाशिम सहा तर रत्नागिरी जिल्ह्यात चार नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई देण्यात उद्धव ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. आपत्ती काळाची मदत देण्यात आचार संहिता अडसर ठरत नसते असा दावाही पाटील यांनी यावेळी केला. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे, त्यांना भरघोष आर्थिक मदत द्यायला हवी. मात्र, राज्य सरकार याबाबत उदासीन दिसत असल्याचं पाटील म्हणाले.
****
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईपोटी जारी केलेल्या पहिल्या हप्त्यात परभणी जिल्ह्याला ९० कोटी ५१ लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनानं निधी मंजूर केला आहे. औसा तालुक्यासाठी सात कोटी ७९ लाख ३२ हजार रुपये, तर निलंगा तालुक्यासाठी पाच कोटी ५२ लाख ६० हजार रुपये मंजूर झाले आहेत. परवा १३ नोव्हेंबर पर्यंत ही कामं सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासन आदेश देण्यात आले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात पालम नगर पंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत काल प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथंही काल तालुक्यातल्या सरपंच पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या १२८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत येत्या १९ नोव्हेंबरला होणार आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन आमदार भाई गिरकर यांनी केलं आहे.
****
मुंबई इंडियन्स संघानं पाचव्यांदा इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघानं सात बाद १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघानं पाच बाद १५७ धावा केल्या.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना काल मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीमुळे त्रस्त असल्यानं, उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मुंडे यांनी ट्वीट संदेशातून दिली आहे.
****
ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काल परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणी सावरगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राणी सावरगाव मंडळातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
0 notes