Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निकालांमुळं महायुतीची जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यभरातल्या ग्रामपंचायत, सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्णत्वाकडे
बीड जिल्ह्यात क्षीरसागर गटाचं वर्चस्व तर अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला यश
आणि
नांदेड पाटबंधारे मंडळाकडून पाण्याच्या आवर्तनांचं वेळापत्रक जाहीर
****
ग्रामपंचायतींसह सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीतल्या आजच्या निकालांवरुन जनतेचं महायुतीला पाठबळ असल्याचं स्पष्ट होत असून महायुतीची जबाबदारी वाढली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या निकालांबाबत माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले -
आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणखी काम करू. या राज्याचा विकास करू. आणखी उद्योगधंदे आणू. तरूणांना नोकऱ्या, हाताला काम, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे काही धोरण आम्ही आखलेलं आहे, त्याला अधिक गती देऊ, अधिक चालना देऊ. आणि केवळ सव्वा वर्षामध्ये एवढा भरघोस पाठिंबा या ठिकाणी जनतेने दिलाय. ही अशीच घोडदौड पुढे चालू राहील. पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हेच महायुतीचं यश कायम राहील, किंबहुना यामध्ये वाढ होईल. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंचेचाळीस प्लस जागा या राज्यामधून आम्ही देऊ.
****
राज्यभरात दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींसह १३० सरपंचपदांसाठीच्या काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत असून निकाल प्राप्त होत आहेत. मराठवाड्यातल्या २४८ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत आहे. बीड जिल्ह्यातल्या १८६, नांदेड १९, छत्रपती संभाजीनगर १६, लातूर १३, धाराशिव सहा, तर परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्या मतमोजणी होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांतल्या १५८ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटानं जिंकल्या आहेत. त्या पाठोपाठ बीड तालुक्यात आमदार संदीप क्षीरसागर गटानं विजय मिळवला आहे तर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या गटानं प्रथमच तीन ग्रामपंचायतींमध्ये विजय प्राप्त केला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दोन ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले असून जांभूळटोला इथं महायुती तर माकडी इथं सात पैकी पाच जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ठिकाणचे निकाल हाती आले असून यात काँग्रेसनं सर्वाधिक १७ जागी विजय मिळविला आहे. भाजपनं ८, शिवसेना शिंदे गट ३, शिवसेना ठाकरे गट २, बीआरएस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १, आणि अपक्षांनी ४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. नागपूर जिल्ह्याच्या १४० सरपंच पदांपैकी ११४ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. ३६५ सरपंच पदापैकी २४० पेक्षा जास्त जागा भाजप समर्थित उमेदवार जिंकतील असा विश्वास नागपूर ग्रामीणचे पक्ष प्रमुख सुधाकर कोहळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या १४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं सर्वधिक जागा मिळवून आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीनं तीन जागांवर, काँग्रेस दोन जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं दोन जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, प्रहार जनशक्ती यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं २३ पैकी सरपंचपदाच्या १५ जागांवर विजय मिळवला आहे.
****
राज्यात झालेल्या दोन हजार तीनशे एकोण साठ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीनं राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला असल्याचं त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
****
केंद्रीय माहिती आयुक्त हीरालाल समरिया यांनी आज मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना या पदाची शपथ दिली.
****
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव मिळवून देण्यासाठी एक फिरतं वाहन नागपूरकरांच्या सेवेत आजपासून रुजू झालं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, यांच्या हस्ते आज सकाळी नागपूरमध्ये याचं लोकार्पण करण्यात आलं. थेट गरजू रुग्णांच्या घरापर्यंत पोचून दररोज १५ रुग्णांची तपासणी या माध्यमातून करता येईल. दिव्यांगाच्या अपंगत्वाचं मूल्यांकन, मोजमाप आणि अवयवांचं वितरण वेगवान पद्धतीनं करण्यासाठी हे वाहन तयार करण्यात आलं आहे.
****
रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आणि पूर्णा पाटबंधारे विभागाद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यत पाण्याची आवर्तनं नांदेड पाटबंधारे मंडळानं जाहीर केली आहेत. रब्बी हंगामासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प -इसापूर धरणातल्या उपलब्ध पाणीसाठयानुसार एकूण चार पाणीपाळया देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिलं आर्वतन उजव्या आणि डाव्या कालव्यातून कालपासून येत्या २५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येत आहे. दुसरं आर्वतन पाच ते २५ डिसेंबर या कालावधीत तर तीसरं आवर्तन पाच जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत सोडण्यात येणार आहे. या सर्व आवर्तनाचा कालावधी २० दिवसांचा राहील, असं मडळानं जाहीर केलं आहे.
****
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज बीड इथं नुकतेच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची पाहणी केली, त्यावेळी भुजबळ बोलत होते. बीडमध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी आहे, हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे, असं त्यांनी नमूद केलं. आता याच्या मुळाशी गेलं पाहिजे नाहीतर पुन्हा सरकारनं गुन्हे मागे घ्यायचे हे चालणार नाही, असं ते म्हणाले. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर आणि प्रशासनातील अन्य अधिकारी भुजबळ यांच्या या पाहणीवेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात दिवाळीनिमित्त शासनाकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ झाला आहे. नांदेड जिल्ह्यासाठी पाच लाख ६२ हजार ८५१ पिशव्या उपलब्ध झाल्या असून पुरवठा विभागाकडून तालुकास्तरावर वाटप सुरू झालं असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
सकल मराठा समाजातर्फे सोलापूर इथं गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेलं साखळी उपोषण आज आंदोलकर्त्यांनी स्थगित केलं. नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरुन उपोषण मागं घेत असल्याची माहिती आंदोलक गणेश देशमुख यांनी दिली आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांवर कंत्राटी स्वरूपात काम सुरू आहे. यात आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका यापासून ते वैद्यकीय अधिकारी या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेनं बांगलादेशसमोर विजयासाठी २८० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीमध्ये सुरू या सामन्यात चरिथ असलांकाच्या १०८ धावांमुळं श्रीलंकेला २७९ धावांचा टप्पा गाठता आला. या सामन्यादरम्यान पंचांनी फलंदाजी करायला वेळ लावल्यानं अँजलो मॅथ्यूजला `टाईमड आऊट` देण्याचा अभूतपूर्व निर्णय दिला. बांगलादेशतर्फे तंझीम हसन शकीबनं सर्वाधिक तीन गडी बाद केले.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास आजपासून दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारं निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेनं दिलं होतं, त्यानुसार ही वाढ करण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यसंचालनालयानं म्हटलं आहे.
****
0 notes
डोंगर, देवदार आणि दगड
प्रस्तावना
हिमालयात फिरायला गेलेला तसा मी काही पहिला मनुष्य नाही. अगदी अभ्यासपूर्ण, जिज्ञासू आणि संशोधक मन असलेला आणि हिमालयाचं रहस्य आता मीच सोडवणार असा विचार करणारा तर मुळीच नाही. कामाच्या रहाटगाड्यात कंटाळलेलो आम्ही तिघे जण काहीतरी वेगळं म्हणून कामधंदे सोडून फिरायला गेलो तेवढंच काहीसं ऍडव्हेंचर. तिघांचे तीन वेगळे विचार, कामं करण्याच्या वेगळ्या पद्धती आणि समोर दिसतंय ते चितारण्याच्या वेगळ्या शैली. हे जे तुम्ही आता काही वाचताय, पाहताय हि माझी शैली.
हे प्रवास वर्णन नाही, अनुभवकथन नाही, हा काही प्रवासाचा इतिवृत्तांत सुद्धा नाही, तर मला गोळा कराव्याशा आणि सांगाव्याशा वाटलेल्या क्षणाचा घेतलेला मागोवा आहे. हे काही पॅचेस आहेत; आठवणीत सदैव कोरल्या गेलेल्या क्षणांचे. बरं, या फक्त आठवणी नाहीयेत तर त्यासोबत काही पुरावे सुद्धा आहेत, त्या क्षणांचे. पहिला पुरावा म्हणजे, गोळा केलेले काही दगड; जे निःशब्द, शाश्वत असतात. त्यांना भावना नसतात पण त्यांनी सगळं सोसलेलं असतं, अनुभवलेलं असतं. दुसरा पुरावा म्हणजे झाडांची पानं आणि लाकडाचे काही तुकडे, झाडं तशी दगडांइतकी जुनी नसतात. पण ती नव्याने येत असतात, बहरत असतात. त्या झाडांच्या आधीच्या पिढ्यांनी, दगडांसारखंच सगळं पाहिलेलं असतं, आळीपाळीनं. त्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ती तग धरून उभी असतात.
असेच काहीसे क्षण, काही पुरावे सांगणारे हे शब्द. बस्स, त्यापलीकडे काही नाही.
...........
९ ऑगस्ट, २०१८. गुलमर्ग, काश्मीर.
“इरफानभाई, अब ये टुरिस्ट स्पॉट बोहोत हो गये. किधर ऐसी जगह ले चलो, जहाँ कोई नहीं हो.”
आमचे घोडे रस्ता सोडून कच्च्या वाटेला लागले. घोडा आणि इरफान सराईतपणे त्या गोल दगडांवरून आणि गुडघाभर चिखलातून जात होते. आम्ही पाठीवर बॅगा आणि मुठीत जीव घेऊन कसेबसे त्या चार पायांच्या फुरफुरणाऱ्या प्राण्यावर बसलो होतो. हलकासा पाऊस पडत होता म्हणून इरफानची थोडी घाई चालली होती. त्या अरुंद पायवाटेवरून जाताना ���जूबाजूच्या झुडूपाला आमचे पाय घासले जात होते. इथे आम्हाला माणसं दिसत नव्हती. उगाच खिदळणं नाही, मोबाईलवर फोटो काढणं नाही. जसजसे पुढे जात होतो, वाहत्या पाण्याचा आवाज तीव्र होत होता. इरफानला आम्हाला काय हवंय ते कळलं होतं.
एक ओहोळ होता तो. मोठमोठाले दगड असलेला, आधी भिजून गेलेल्या दगडांवर चांगलंच शेवाळ साचलं होतं. आजूबाजूला सरळ वाढलेली पाईन ची घनदाट झाडं आणि त्यातूनही झिरपून पडणारा पाऊस. ओलं करणारा नव्हे तर जॅकेटवर दवबिंदूंसारखा विसावणारा. या सगळ्याला खळाळत वाहणाऱ्या पाण्याचं पार्श्वसंगीत. पाणी मात्र स्वच्छ होतं. इरफान गेला आणि ओंजळीत पाणी घेऊन प्यायला. आम्हालाही बोलला, “पीओ, कुछ नहीं होता हैं” आम्ही सुद्धा एका रिकाम्या बाटलीत पाणी भरून घेतलं आणि घोटभर प्यायलो.
मग आम्ही तिथे विसावलो, बराच वेळ थांबलो. दगडांवर बसलो, ओल्या गवतातून फिरलो. निघालो तेव्हा दुपार टळून गेली होती. भूक जाणवायला लागली होती पण आम्हाला त्या दिवशीचा निवांत क्षण मिळाला होता.
...........
१० ऑगस्ट, २०१८. श्रीनगर, काश्मीर.
आठवणीत ठेवण्यासारख्या क्षणातला हा एक क्षण. लिहिताना पेनाची खरखर स्पष्ट ऐकू यावी, इतका निवांत आणि शांत. काय असेल या शांततेचं रहस्य? मला उगाचंच पहिल्या जगातून आलेल्या त्या पत्रकारांच्या भूमिकेत घुसायचं नाहीये. पण देवदारच्या लाकडांनी नटलेल्या या हाऊसबोट मधली हि उबदार शांतता; माझ्या मनातल्या ‘काश्मीर’ या समीकरणाबाबत अजूनच गोंधळ उडवत आहे. हि वरवरची शांतता की हाच या लोकांचा खरा पिंड? जादूच्या दुनियेत जसं काहीतरी एका क्षणी असतं, तेच दुसऱ्या क्षणी नसतं तसं तर हे फसवं जग नाही ना?
“काश्मीर का मौसम मुंबई के फॅशन कि तरह होता है; कब बदल जाये पता नहीं चलता. समझे?” आमचा ड्रायव्हर जावेद आम्हाला सांगत होता, ते कदाचित या अर्थीही लागू पडत असावं.
श्रीनगर वरून आम्ही निघालो होतो जाताजाता जावेद गाडीच्या समोरच्या काचेतून मान किंचित खाली वाकवत काहीतरी पाहत बोलला, ** **
“ये जो सामने देख रहे हो ना? ये बड़ा वाला पेड़; इसे चिनारका पेड़ बोलते है.”
“जो ‘मोहब्बतें’ मूवी मै पत्ते उड़ते है ना? वो इसी पेड़ के होते है.”
“ये पेड़ काटने को अभी गवर्नमेंट का बैन है. सजा होती है; हाँ.”
मला त्या झाडाची पानं हवी होती. सुदैवाने मिळाली.
...........
१० ऑगस्ट, २०१८. झोजिला पास, काश्मीर.
एव्हाना निसर्गातली स्थित्यंतरं स्पष्ट जाणवायला लागली होती. पर्वतांचे आकार वाढत चालले होते आणि त्यांच्यावरची झाडं आता कमी होत होती. ठिसूळ दगडांचे अजस्त्र पर्वत, त्यांच्यावर नजर फिरवताना छाती दडपून जाईल एवढे भव्य. अशाच एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी आम्ही चहासाठी थांबलेलो होतो. एरवी घाई करणारा जावेद सुद्धा निवांत होता. चहा येईपर्यंत आम्ही डोंगराच्या मंद चढावावर जायचा प्रयत्न केला. वर एक मेंढपाळ आपल्या बकऱ्यामेंढ्या घेऊन जवळजवळ बर्फापर्यंत गेला होता. चित्रविचित्र आकाराचे असंख्य दगड होते, दगडांमध्ये कोणता तरी धातू नक्की असावा त्याशिवाय ते चमकत नसावेत. बराच वेळ थांबल्यानंतर जावेदची हाक आलीच. आम्ही पुढे निघालो.
...........
१० ऑगस्ट, २०१८. कारगिल युद्ध स्मारक, द्रास, काश्मीर.
युद्धस्य कथा: रम्या:
कुठे बनतात अशी माणसं? बलिदान, शहीद होणं ऐकायला किती छान वाटतं पण वेळ आलीच तर आम्ही काय करु? कसे वागू? आम्हाला खरंच किंमत कळते या त्यागाची कि त्यांनासुद्धा त्याचा पगार मिळतो, बऱ्याचश्या सवलती मिळतात असं म्हणून फक्त सोडून देतो आपण? झेंड्यासाठी जीव देणाऱ्या या सैनिकांना काय वाटत असेल जेव्हा ते सुटीवर घरी येतात आणि ग��िच्छ राजकारणाने बरबटलेली वर्तमानपत्रं पाहतात? “हिटलर सारखा देश चालवला पाहिजे” असं जेव्हा नाक्यावरचे विद्वान एकमेकांना म्हणतात तेव्हा काय वाटत असेल त्या महापुरुषांना ज्यांनी रक्त आटवलंय आणि सांडलंय या लोकशाहीसाठी?
द्रास च्या त्या कारगील युद्ध स्मारकातून बाहेर पडताना, कमानीवर एक ओळ लिहिली होती.
‘When you go home, tell them of us and say, ‘For their tomorrow, we gave our today.’
'जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा जाऊन सांगा, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिलाय.'
आजूबाजूच्या हिमालयाइतकाच उत्तुंग पराक्रमाची आठवण म्हणून एक त्रिकोणी दगड मी चालता चालता उचलला. ‘टायगर हिल’
...........
११ ऑगस्ट, २०१८. लेह-लडाख.
डोंगरांचे आकार एव्हाना पूर्णतः बदलले होते. त्यात तळहातावर मावतील अश्या आकाराच्या अब्जावधी दगडांनी बनलेले पर्वत होते. तर काही पर्वत वाळूचे मोठमोठाले ढिगारे वाटावेत तसे दिसत होते. काही पर्वतांच्या शिखरांवर बर्फ अजूनही होता तर काहींचा पूर्ण वितळलेला होता. दर दोन डोंगरांपलीकडून एखाद्या कपारीतून पाण्याचा प्रवाह झिरपत होता. शांत. संथ. खाली वाहणाऱ्या नदीला तो जाऊन मिळत होता. तिला दोन पावलं पुढे घेऊन जात होता.
बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर लेह आलं. गाडीतून उतरलं कि जड झालेले श्वास जाणवत होते. अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा थकायला होत होतं. राज्य बदललेलं नव्हतं पण माणसं, भाषा, धर्म आणि आजूबाजूचं वातावरण चांगलंच बदललेलं होतं. काहीही न करता आलेला थकवा जाणार नव्हताच किंबहुना काही केलं तर वाढणारच होता. फार विचार न करता आम्ही सरळ झोपी गेलो.
...........
११ ऑगस्ट, २०१८. फोर्ट रोड, लेह.
“च्यायला, हा कसला ड्राय डे? आपल्याकडे ड्रायडे ला ड्रिंक्स नाही मिळत. आणि इथे..”
“ड्रिंक्सचं सोड रे, नॉन वेज बंद नको असायला हवं होतं”
“हो ना यार, चिकन मोमो तरी ऍटलीस्ट”
“….”
“बरं, खायला काहीतरी साधंसं घेऊयात, मला ते तिबेटियन फ्लॅट नूडल्स नाही जमले फारसे.”
“हं”
“लोकं बाकी छान आहेत लडाखची; आपल्याला आवडली. उगाच काही कटकट नाही. लोकांना फसवणं नाहीं. निमूटपणे आपापलं काम करतात. विचारलं तेवढंच बोलतात. टुरिझम वाढलंय, एवढी लोकं येतायत पण नीट बोलतात; उद्धटपणा नाही, तुमच्या पुण्यासारख्या”
“आवडली ना? छान. घरी घेऊन जा मग त्यांना”
...........
१३ ऑगस्ट, २०१८. श्योक नदी पात्र, नुब्रा.
“किती वर्षं लागत असतील नाही या दगडांचे वाटोळ्या आकाराचे गोटे व्हायला? कित्येक वर्ष बर्फाखाली, पाण्याखाली रगडून निघत असतील. काय काय घरंगळत जात असेल यांच्यावरून. बर्फ, पाणी आणि अजून खूप सारी मोठी दगडं सुद्धा.
दगडं पण बघ ना, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या टेक्शचरची. हा प्रवाहच बघ किती मोठा आहे; ज्याच्या मधोमध आपण उभे आहोत. कितीतरी वर्ष लागली असतील फक्त हा प्रवाह बनायला आणि मग या दगडांचे गोटे.
बरं, आता या गोट्यांचं काय होणार पुढे? हे असेच राहतील कि झिजून झिजून छोटे होत होत वाळू बनून जातील?”
“...”
“आपण खूप लहान आहोत रे या सगळ्यांपुढे, खूप लहान”
...........
१४ ऑगस्ट, २०१८. पॅंगाँग तलाव.
भलाथोरला तलाव, भोवती शिखरावर बर्फ असणारे पर्वत. जोरजोरात वाहणारा अतिथंड वारा. त्यात पडणारा पाऊस. तो पाऊस अक्षरश: झोंबत होता. तलावात कमीतकमी पाय ओले करावेत असं वाटत होतं. पण थंडीत बूट काढायची हिंमत होत नव्हती. तरीही पाण्यात हात बुडवून पहिलाच. पाणी बर्फाइतकं थंड होतं. हात चोळतच आम्ही गाडीत येऊन बसलो. तेव्हा कुठे बरं वाटलं.
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी अजून बरेचसे पर्यटक होते, काही छोट्या टपऱ्या होत्या, तिथे गेलो. गेल्यावर कळलं आजूबाजूला फार मराठी लोकं आहेत. कोण कोणाला फोटो काढायला सांगतंय,कोण हाका मारतंय. क्षणभर आपण महाबळेश्वरला आलोय असं वाटलं.
...........
१५ ऑगस्ट, २०१८. चांगला पास.
आयुष्यात आज पहिल्यांदा स्नोफॉल पहिला. आजूबाजूला साचलेला बर्फ उचलून त्याचा हाताने गोळा करताना हात थंड पडले पण मज्जा आली. पटकन आरोहीची आठवण झाली. आरोही म्हणजे माझी भाची. ‘काश्मीरला येताना कालाखट्टा ची एक बाटली घेऊन यायची आणि तिथे हवे तेवढे बर्फाचे गोळे बनवुन खायचे’ हे तिचं खूप जुनं स्वप्न. मनातल्यामनात हसतच मी तिथल्या त्या झोपडीवजा हॉटेलात गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती आत. बाहेरच्या थंडीमुळे आतली उब हवीहवीशी वाटत होती. आत चहा झाला नसता तरच नवल.
चहाचे पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो. जॅकेट वर जमा झालेले बर्फाचे छोटे छोटे कण झटकून गाडीत बसलो. आणि परत रस्त्याला लागलो.
अजून काही तासांनी आम्ही लेहला पोहोचणार होतो. मग तिथून उद्या पहाटेच पुढल्या ठिकाणी निघणार होतो. नेक्स्ट डेस्टिनेशन. मनाली.
...........
१६ ऑगस्ट, २०१८. लेह आणि मनालीच्या मध्ये कुठेतरी.
भलताच वळणदार रस्ता आहे. ठिकठिकाणी दरड कोसळली आहे; ती हटवण्याचं काम चाललंय. हिमाचल प्रदेश टुरिझम ची ती बस, हळूहळू घाटातून पुढे चाललीये. हा प्रवास खूप थकवणारा आहे. बसच्या खिडकीतून खाली पाहिलं कि दरीच्या एकदम टोकावरून जाणारी बस ची चाकं दिसतायत. म्हणून खिडकी बाहेर पहायची तशी हिंमत होत नव्हती. आम्ही बसल्या बसल्या झोपा काढत होतो.
......
“टोंटी मिनिट ब्रेक फॉर टी, ओन्ली टोंटी मिनिट” बसचा क्लिनर ओरडून सांगत होता (बस मधल्या फिरंगींसाठी इंग्रजी).
बस मधली माणसं उतरत होती चहा पिऊन येऊन गाडीत परत झोपत होती. थोड्या थोड्या अंतराने चहासाठी थांबणं चालूच होतं. कदाचित, प्रवाशांपेक्षा ड्रायव्हरला त्याची जास्त गरज होती.
......
“कंटाळा आला राव आता, किती वेळ झाला च्यायला तोच डोंगर दिसतोय. हा डोंगराभोवती गोल गोल बस फिरवतोय कि काय?”
“.....”
“ए, उठ ए. किती झोपणार आहेस”
१७ ऑगस्ट, २०१८. मनाली.
दुसऱ्या दिवशी दुपारी, साधारण तीन वाजता मनाली आलं. जांभया देत हळूहळू सगळेजण बसमधून खाली उतरले.
...........
१९ ऑगस्ट, २०१८. मनाली.
मनाली खरंच सुंदर आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून भटकणारे आम्ही इथे जरा विसावलोय. उशिरा उठतोय, हॉटेल मध्ये बॅग्स ठेऊन इकडे तिकडे भटकतोय. इथल्या शेजारच्याच, मॅक्स नावाच्या एका राजबिंड्या कुत्र्याशी चांगलीच मैत्री झालीये. तो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आमच्या सोबतच असतो. मनालीत येऊन खूप दिवसांनी बटर चिकन खाल्लं. खूप बरं वाटलं. अधूनमधून घरची आठवण सुद्धा येतेय, खासकरून जेवताना. घरी गेल्यावर पहिल्यांदा मासे खायचे हे आम्ही तिघांनी नक्की केलं.
सगळ्याबाजूनी डोंगरांनी वेढलेलं मनाली शहर आपल्याच मस्तीत जगतंय. वज्रेश्वर���ला, आमच्या गावी, अबोलीची पुष्कळ झाड आहेत, मागच्या अंगणात. तशीच इथल्या अंगणात गुलाबाची झाड आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर बरीच फुलं सुद्धा आहेत. सिनेमा मध्ये पाहिलेल्या, पाठीवर सफरचंदाच्या टोपल्या घेऊन फिरणाऱ्या सुंदर बायका इथे खरंच दिसतायत. इतक्या सुंदर ठिकाणच्या मुली सुंदर नसत्या तरच नवल.
मनाली हे इतर कुठल्याही हिल स्टेशन सारखं आहे अस आम्हाला बरेच जण बोलले होते पण आमचा अनुभव वेगळा होता. कदाचित आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलो नव्हतो म्हणून असेल. काहीही असो, मनाली मध्ये आम्ही रमलोय.
...........
२१ ऑगस्ट, २०१८. मनाली.
मनालीतला तिसरा दिवस. आजूबाजूचं फिरून झालंय. घरच्यांसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात. पण इथल्या नेचर पार्कमधुन पाय निघत नाहीएत. नेचर पार्क असावं तर असं. कुंपण घातलेलं एक जंगलच. उंचच उंच वाढलेली देवदार ची झाडं. अधून मधून दिसणारी काही छोटी-मोठी दगडं, बऱ्याचश्या दगडांवर शेवाळ आलंय. पण या शेवाळावरून पाय घसरत नाहीत. उलट ते छान मऊमऊ आहे. या जंगलातून एक पायवाट गेलीये. जंगलाच्या डाव्या बाजूला मनाल्सु नदी वाहतेय. तिथल्या थंड शांततेत सारखी आपली आठवण करून देतेय. जमिनीवर देवदार वृक्षाची फळ पडली आहेत त्यांना देवदार वृक्षाचा विशिष्ठ असा सुरेख वास आहे. हा वास हॉटेलात, देवळात आणि बऱ्याच ठिकाणी येत होता, हाउसबोटीत सुद्धा. कारण इथे सगळीकडे देवदारचीच लाकडं वापरली होती.** **
पार्कात खूप निरनिराळ्या प्रकारची माणसं दिसत होती. बरेचसे पर्यटक होते, स्थानिक बायका त्यांच्या पारंपरिक वेशात काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं कि त्या मशरूम शोधत होत्या. गोल हिमाचल पद्धतीची टोपी घातलेले लोक जाताना दिसत होते. कॉलेज ला जाणारी काही जोडपी सुद्धा एकांत शोधत तिथे आली होती. तो एकांत त्यांना तिथे मिळत होता. प्रत्येकाला प्रत्येकाचा निवांत वेळ मिळावा एवढं मोठं पार्क होतं ते. मला सुद्धा मिळाला, पण पहिल्या दिवसाचा पुरला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि तोही पुरला नाही म्हणून तिसऱ्या दिवशी सुद्धा गेलो. तिथे बसून मी पुस्तक वाचलं, डायरीत थोडंफार लिहिलं आणि चक्क एका मोठ्या दगडावर झोपलो सुद्धा.
तिथे ठेवलेले खुप पक्षी पाहिले. त्यातला सर्वात आवडला तो म्हणजे ‘चकोर पक्षी’. मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा तेव्हा त्याला भेटून आलो. हाच पक्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे हे नंतर कळलं.
शेवटच्या दिवशी गेलो तेव्हा तिथे एका भोजपुरी गाण्याचं शूटिंग सुरु होतं. लांब केस मोकळे सोडलेली एक सुंदर मुलगी फुलाफुलांच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. आजूबाजूला बरेच फिरंगी जमा झाले होते आणि गमतीनं शूट पाहत होते, फोटो काढत होते.
ती माझी शेवटची फेरी होती त्या पार्कातली, एवढ्या सुंदर ठिकाणाची दगडाव्यतिरिक्त काहीतरी आठवण मला हवी होती. मी देवदारच्या एका पडलेल्या अजस्त्र वृक्षाजवळ गेलो, त्या लाकडाचे काही तुकडे उचलले. मला परत त्या पार्कात जायचं होतं. ते तुकडे ओंजळीत घेऊन त्यांचा वास घेतला कि मी तिथे अलगद जाऊन पोहोचणार होतो. मी माझ्यासाठी ट्रिप वरुन आणलेली ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती.
त्या पार्कने मला काय दिलं हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हा आमच्या ट्रिप चा शेवट होता. आणि तो शेवट खरंच सुंदर झाला.
1 note
·
View note