Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक ���ातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला वेग;उस्मानाबाद आणि लातूरच्या सभेत भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर कडाडून टीका
महाविकास आघाडीचीही आज पुण्यात जाहीर सभा-काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या तीन तारखेला पुणे दौऱ्यावर
नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या सात तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक रॅली, बैठका, प्रचारसभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर तसंच उस्मानाबाद इथं अनुक्रमे सुधाकर श्रृंगारे आणि अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली. शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नने महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाची प्रगती आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. पाणी प्रश्नासह विविध मुद्यांवरून त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.
दरम्यान, धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत २५ एकर क्षेत्रावर घेतलेल्या सभेत मोदी यांनी, गेल्या दहा वर्षात शेतकरी तसंच सामान्य जनतेसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला.
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज माळशिरस इथं जाहीर सभा झाली. विरोधी पक्षांच्या कारकिर्दीतील सिंचन प्रकल्प आणि उसाला मिळणारा रास्त भाव यावरून विरोधी पक्षांवर टीका केली.
****
महाविकास आघाडीचीही आज संध्याकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, येत्या तीन तारखेला पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या देखील पुण्यात रोड शो घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड, कल्याण लोकसभा मतदार संघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे, नाशिक मतदार संघातून दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलाचे कमलाकर गायकवाड, अपक्ष सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती आणि अपक्ष जितेंद्र भाभे यांनी, धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव, तसंच अपक्ष उमेदवार आनंदसिंग पांडुरंग ठोके यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीने उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांना तर दक्षिण मुंबई मतदार संघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षानं आज यासंदर्भातलं पत्रक जारी करुन ही माहिती दिली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे धनुष्यबाण या चिन्हावर तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील हे पतंग तर बहुजन समाज पक्षाचे संजय जगताप हे हत्ती या चिन्हावर निवडणुकीत उतरले असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना गॅस सिलिंडर हे चिन्ह मिळालं आहे. अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये जे के जाधव यांना रूम कूलर, डॉ.जीवन राजपूत यांना टी.व्ही.रिमोट, तर हर्षवर्धन जाधव यांना टी.व्ही. हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे.
****
महाराष्ट्रातल्या एका १४ वर्षीय लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या गर्भपाताला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली परवानगी मागे घेतली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि जे बी पार्डीवाला यांच्या पीठानं ३० आठवड्यांच्या गर्भाचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं सांगत आपल्या निर्णयात बदल केला. याआधी गेल्या आठवड्यात २२ तारखेला याबाबतचा निर्णय देण्यात आला होता.
****
छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यात जिल्हा राखीव दल, विशेष कृती दलासोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह दहा नक्षलवादी मारले गेले. अबूझमाडच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलानं शोधमोहिम सुरु केल्यानंतर ही चकमक झाली. या ठिकाणाहून एक ए के -47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा तसंच दारुगोळा जप्त करण्यात आला.
****
ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज भारतीय नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केला. ॲडमिरल आर हरीकुमार यांनी याआधी कार्यभार संभाळला होता.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११५ वी जयंती साजरी करण्यात आली. अमरावतीच्या यावली शहीद इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर गावातून पालखी यात्रा काढण्यात आली.
मुंबई इथं मंत्रालयात अपर सचिव रवींद्र पेटकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर ३३ प्रवासी जखमी झाले. भिवंडी इथल्या खलीदा गुलाम हुसेन, तर नाशिकच्या साई संजय देवरे, बळीराम सोनू आहिरे आणि सुरेश तुकाराम सावंत यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आज सकाळी पावणे दहा वाजता राज्य परीवहन महामंडळाची बस चांदवड इथून नाशिककडे जात असताना राहुड घाटात ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.
****
श्रोतेहो, 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 'स्वीप' अंतर्गत गृहभेट उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या उपक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक यांच्यासह विविध शासकीय सेवकांचा समावेश आहे
****
परिपूर्ण लोकशाहीसाठी महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना आपले कुटूंब तसंच परिसरातल्या लोकांनाही मतदान करायला प्रोत्सहित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. आज औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मेळावा सेंट फ्रान्सिस हायस्कूल इथं आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 'हम मतदार है' या गीतावर नृत्य सादर झाले. तसंच उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.
दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघातल्या निवडणूक खर्चांची तपासणी ३, ७ आणि ११ मे रोजी होणार असल्याचं कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांचे खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
एक जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या या संघात हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. यष्टीरक्षक ऋषभ पंतचं संघात पुनरागमन झालं असून, के एल राहुलला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. उर्वरित संघात विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून, जगभरातल्या २० देशांचे संघ यात सहभागी होणार आहेत.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियंस यांच्यात सामना होणार आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट मैदानावर आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल.
****
बांगलादेशातल्या सिल्हेट इथं सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश महिला क्रिकेट संघासोबत सुरू असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेश संघाच्या चौदा षटकांत पाच बाद ८८ धावा झाल्या होत्या.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा जवळपास ११ हजार मता��नी पराभव केला. धंगेकर ��ांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मतं मिळाली. मात्र अद्याप धंगेकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी देखील आज मतमोजणी होत आहे. त्रिपुरामध्ये भाजप - आयपीएफटी युती ३३ जागांवर आघाडीवर आहे, मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी २४ जागांवर, तर नागालँडमध्ये भाजप - एनडीपीपी युती ३६ जागांवर आघाडीवर आहे.
***
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडने तीन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून दहा ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली आहे. या कंपन्यांनी बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र सुरू केली नसतील तर त्यांना बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देऊ, अशी माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत नाफेड मार्फत १८ हजार ७४३ क्विंटल कांदा खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही फडणवीस यांनी सांगितलं.
स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरवरचा मूल्यवर्धित कर कमी करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी अधिवेशनापर्यंत तोडू नये, त्यानंतर तोडावी असे आदेश सरकारने दिल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी महविकास आघाडीच्या सरकारने मूल्यवर्धित कर कमी केला नव्हता असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ करत सभात्याग केला.
***
विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारची ध्येय धोरणं प्रतीत झालेली नाहीत, असं सांगत, हे अभिभाषण जनतेच्या हिताचं नाही, अशी टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, या अभिभाषणाला विरोध दर्शवला.
***
निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया बदलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला थेट निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नेमता येणार नाही. यासंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने, यापुढे समिती स्थापन करुन ही निवड केली जाईल, असं सांगितलं. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असेल. निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नेमण्यासाठी संसदेत कायदा करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले असून, जोपर्यंत हा कायदा होत नाही, तोपर्यंत समितीच्या माध्यमातूनच निवडणूक आयुक्त नेमले जातील, असं स्पष्ट केलं आहे.
***
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना लवकरच राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मिळालेलं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नावं हे राज्याच्या कानाकोपऱ्यात नेलं जाणार असून, महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण असं या यात्रेचं घोषवाक्य असेल. या यात्रेदरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी अयोध्या इथं जाण्याची शिवसेनेची तयारी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
राज्यात तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालयात ई-फायलिंग सक्तीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद पदाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई फायलिंगमध्ये काहीच वकिलांचा एकाधिकार टाळण्यासाठी वरिष्ठ वकिलांनी देखील तंत्रज्ञान अवगत करत याबाबतचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या आंबा चौंडी फाट्याजवळ एका १९ वर्षीय तरुणीस कारने उडवल्याची घटना घडली. आज पहाटे हा अपघात झाला. कन्याकुमारी भोसले असं मयत तरुणीचं नाव असून, ती पोलिस भरतीची तयारी करत होती, असं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे.
***
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद ३२ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून रविंद्र जडेजानं चार, तर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी तीन बळी घेतले. भारत ५६ धावांनी पिछाडीवर आहे.
//**********//
0 notes
“हनुमानाने उद्धव ठाकरेंना शाप दिला म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्यात आलं”
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास केल्यानंतर राणा दांपत्याला अटक देखील झाली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसाचा संदर्भ देत टीका केली आहे. आम्हाला 14 दिवस तुरूंगात टाकलं. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणा म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा खोचक टोला रवी राणांनी लगावला आहे.
दरम्यान, हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा शाप दिलाय. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला त्याचीच त्यांना सजा मिळाली, असंही रवी राणा म्हणाले आहेत.
Read the full article
0 notes