Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी तसंच लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· परीक्षेविना दहावीचे विद्यार्थी उत्तीर्ण केले जाऊ शकत नाहीत - मुंबई उच्च न्यायालयाचं मत; सरकार आणि सर्व शिक्षण मंडळांना लेखी स्वरुपात म्हणणं मांडण्याचे निर्देश.
· महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद, ग्रामीण भागांना कोरोना विषाणू संसर्गापासून मुक्त करण्यासाठी काम करण्याचं आवाहन.
· राज्यात २९ हजार ९११ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १०२ जणांचा मृत्यू तर तीन हजार ३४० बाधित.
· पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती.
· व्यक्तीगत प्राप्तीकर विवरण पत्र दाखल करण्यास तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
· जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकरसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना अटक.
आणि
· मराठा समाज आरक्षणासंबंधी येत्या २७ तारखेला खासदार छत्रपती संभाजीराजे भूमिका स्पष्ट करणार.
****
दहावीची परिक्षा व्हायला हवी, परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातल्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यांकन झालेलं नाही, आता दहावीची परिक्षा होणार नाही, तर ही संपूर्ण तुकडी योग्य मूल्यांकनाशिवाय पुढील शिक्षणासाठी बाहेर पडणार असल्याचं, याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणामधली सर्वात महत्वाची परीक्षा असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणाखाली ही परीक्षा रद्द कशी काय केली, असा प्रश्न न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे. परीक्षा रद्द करुन पुढील काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. सरकारनं आणि सर्व शिक्षण मंडळांनीही यासंदर्भात लेखी स्वरुपात आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीला तोंड देण्यासाठीचं धोरण गतीशील आणि नावीन्यपूर्ण असावं, तसंच ते सतत अद्ययावत केलं जावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म���हटलं आहे. पंतप्रधानांनी काल महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातल्या उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी आणि बीडसह १७ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या विषाणूमुळे तरुण आणि लहान मुलं यांना जो धोका आहे, त्याबाबत समाजाच्या निरनिराळ्या वर्गांत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. याचा पाठपुरावा करावा, असं ते म्हणाले. ग्रामीण भागांना संसर्गापासून मुक्त करण्यासाठी काम करावं, आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याशी बोलावं, अशी सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संसर्ग प्रतिबंधक कामाची दखल घेऊन, पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बद्दल डॉ. भोसले यांचं अभिनंदन केलं असून, ते करत असलेलं कौतुकास्पद काम यापुढेही सुरु ठेवावं असं आवाहन केलं.
****
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पंतप्रधानांनी साधलेल्या संवादा संदर्भात आकाशवाणीला माहिती दिली. ते म्हणाले –
सध्याच्या काळामध्ये जो पॉझिटीव्ही रेट कमी होतो आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचा रेट हा ३३ ते ३४ टक्क्यांवरुन आता १७ ते १८ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. मात्र, साथ निर्मुलनाच्या दृष्टीनं दहा टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी रेट झाला पाहिजे या दृष्टीने कठोर प्रयत्न करण्याच्या माननीय पंतप्रधानांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीनं लसीकरणाच्या बाबतीत लसींची संख्या ज्या ज्या पद्धतीनं प्राप्त होईल त्यानुसार आपण जास्तीत जास्त को-मॉर्बिड व्यक्तींचं लसीकरण प्राधान्यानं व्हावं यासाठी सगळ्यांनीच समोर येणे गरजेचं आहे. माननीय पंतप्रधानांनी टेस्टींग ट्रकिंग आणि व्हॅक्सीनेशन या तीनही गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष देण्याकडे मार्गदर्शन केलेलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत चाचण्या करण्याचं नियोजन केलं असल्याचं जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले.
****
राज्यात काल २९ हजार ९११ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८ झाली आहे. काल ७३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८५ हजार ३५५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. काल ४७ हजार ३७१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५० लाख २६ हजार ३०८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९१ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ८३ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
म���ाठवाड्यात काल तीन हजार ३४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २७, औरंगाबाद २४, बीड १४, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी ११, परभणी नऊ, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९९२ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५३४, औरंगाबाद ५३०, जालना ४८८, लातूर ४२०, नांदेड १६२, परभणी १४१ तर हिंगोली जिल्ह्यात ७३ नवे रुग्ण आढळून आले.
****
गावकऱ्यांनी केलेल्या सामुहिक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्यातलं भोयरे खुर्द हे गाव, संपूर्णपणे कोरोना विषाणू संसर्ग मुक्त झालं आहे. अहमदनगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर डोंगर पट्ट्यात हे गाव आहे. केवळ दीड हजार लोकवस्ती असलेल्या या गावातले बहुतांश नागरिक कामानिमित्त बाहेरगावी असतात. मात्र टाळेबंदी लागू झाल्यावर हे सर्व कामगार मुंबईहून गावी आले आहेत. तेव्हा गावात तीन ते चार जण बाधित आढळून आले होते, सरपंच राजेंद्र आंबेकर यांनी सांगितलं. मे महिन्यापासून गावामध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नसल्याचं सांगताना, आंबेकर म्हणाले –
सुरवातीला चार ते पाच पेशंट होते. तिथून पुढे आम्ही दखल देण्यास चालू केली. शासकीय नियमांचं पालन आणि रोज अनांऊसिंग वगैरे करून, प्रत्येक घरोघरी जाऊन जनजागृती केली. आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंक हे प्रत्येक घरोघरी लोकांना त्याचं आपण वाटप केलं. आणि सोशल डिस्टंसिंग आणि ज्या घरामधे पेशंट निघाले होते, त्यांच्या प्रत्येकाची अँटीजेन टेस्ट इथं गावामधे तीन ते चार वेळा टेस्ट करून घेतल्या. आणि टेस्ट झाल्यानंतर पेशंटच्या घरामधे जे नातेवाईक होते ते आपण विलगीकरण कक्षात ठेवले.
****
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पदोन्नतीची सर्व शंभर टक्के पदं ही सेवा ज्येष्ठतेनुसारच भरावी, असा आदेश राज्य सरकारनं सात मे रोजी जारी केला होता. या निर्णयाला आरक्षण बचाव कृती समितीनं न्यायालयात आव्हान दिलं आहे. राज्य शासनानं याप्रकरणी आपलं म्हणणं दहा जून पर्यंत सादर करावं, असा आदेश न्यायालयानं दिला आहे.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२० यावर्षीचा 'जीवनगौरव पुरस्कार', ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांना, तर २०२१ या वर्षीचा पुरस्कार, डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी, काल या पुरस्कारांची घोषणा केली. वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे, आणि इंदूरचे मोहन रेडगांवकर यांना जाहीर झाला आहे. परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या इतर पुरस्कारांची घोषणाही लवकरच केली जाईल, असं जोशी यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं वर्ष २०२१-२२ साठी व्यक्तीगत प्राप्तीकर विवरण दाखल करण्याची मुदत, ३१ जुलै ऐवजी वाढवून, आता तीस सप्टेंबर केली आहे. अर्थ मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात आली आहे. कंपन्यांनाही ३१ ऑक्टोबर ऐवजी, ३० नोव्हेंबर पर्यंत प्राप्तीकर विवरण भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असल्याचं, मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, प्राप्तीकर विभाग करदात्यांसाठी येत्या सात जून रोजी नवीन पोर्टल सुरु करणार आहे. या पोर्टलवरुन करदात्यांना विवरणपत्र भरणं आणि अन्य प्राप्तीकरविषयक कामं अधिक सुलभ होणार आहेत.
****
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तसंच पोलिस कर्मचारी संतोष अंभोरे आणि विठ्ठल खार्डे यांना, काल दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना अटक केली. तक्रारदाराविरुद्ध दाखल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, खिरडकर यानं पोलिस नाईक अंभोरेच्या मार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी नंतर ती कमी करुन तीन लाख रुपये घेण्याचं मान्य केलं होतं. अंभोरे हा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातच यापैकी दोन लाख रूपये स्वीकारत असताना, सापळा रचून ही अटक करण्यात आली. पुणे पथकानं यावेळी खिरडकरच्या घराचीही झडती घेतली.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. या प्रकल्पामुळे जायकवाडी, उजनी या शाश्वत स्त्रोतांमधून औरंगाबाद, बीडसह लातूर जिल्ह्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं, देशमुख म्हणाले.
****
मराठा समाज आरक्षणासंबंधी मागच्या सरकारनं बोगस कायदा केला, की आताच्या सरकारनं योग्य मांडणी केली नाही, याच्याशी आम्हाला काही करायचं नाही, यावर तोडगा सांगा, मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकता यावर बोला, असं आवाहन, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असून, समाजाची दिशाभूल कोणी करण्याचा प्रयत्न केला, तर आपण स्वत: आडवे येणार असल्याचा इशारा, त्यांनी दिला. महाराष्ट्र फिरुन येत्या २७ तारखेला समाजाची भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
समाजाला दिशाभूल करायचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल. निश्चित येणार. मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात जे तज्ञ लोकं आहेत, ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजावर अभ्यास आहे या लोकांशी मी चर्चा करायलोय. आणि येत्या २७ तारखेला, मुंबईत, मुख्यमंत्र्यांना आणि विरोधीपक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे. आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल, याच्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत २७ तारखेला समाजाची भूमिका स्पष्ट होईल.
****
बागला उद्योग समुहानं काल सामाजिक जबाबदारीचं भान म्हणून औरंगाबाद महापालिकेला नऊ प्राणवायू काँसट्रेटरचं वितरण केलं. समुहाचे कार्यकारी संचालक ऋषी बागला आणि संचालक जी.एस. फिरके यांच्या पुढाकारानं, हा उपक्रम राबवण्यात आला. महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. निता पाडळकर यांच्याकडे हे काँसट्रेटर सुपूर्द करण्यात आले.
****
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष त्र्यंबक मोहन शेळके यांचं काल सोलापूर इथं खाजगी इस्पितळात निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. कळंब तालुक्यातल्या खामसवाडीचे मूळ रहिवासी असलेले शेळके यांनी, मराठवाड्यातल्या सहकारी तत्वावरील पहिल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. खामसवाडी इ��ल्या जगदंबा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते अध्यक्ष होते.
****
शेतकऱ्यांना सुलभतेनं खत उपलब्ध होईल अशी व्यवस्था राज्य सरकारनं करावी, तसंच खरीप हंगामातल्या मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचं सरसकट रोख अनुदान तातडीनं द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. खतांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा मोठा फटका देशभरातल्या शेतकऱ्यांना बसणार हे ओळखून केंद्र सरकारनं १४ हजार ७७५ कोटी रुपयांच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या समाधी स्मारकाचं संवर्धन आणि संरक्षण तातडीनं करण्यात यावं, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या स्मारकाची अवस्था जीर्ण झाली असल्यानं, त्याचं संवर्धन आणि संरक्षण करणं आवश्यक असून, यामुळे परिसराला वेगळं वैभव प्राप्त होऊ शकेल, असंही आमदार दानवे यांनी मंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवण्यात पोलिसांना यश आलं आहे. उमरगा तालुक्यातल्या मुळज आणि एकोंडी गावात हे विवाह पार पडत असताना, पोलिसांनी हस्तक्षेप करुन ते थांबवले. पालकांचं समुपदेशन करत दोन्ही पक्षांनी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह पुढे ढकलत असल्याची हमी पोलिसांना लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी लोकसंख्येच्या तीनपट झाडं लावण्याचं नियोजन करावं, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी दिले आहेत. कोविड-१९ परिस्थितीत ऑक्सिजनचं महत्व लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणं आवश्यक असल्याचं फड यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं तूर, मुग, उडीद या कडधान्यांची सुरु केलेली आयात तात्काळ थांबवावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं परभणी जिल्ह्यात ‘थाळी - टाळी वाजवा’ आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध मागण्यांचं निवेदनही जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना देण्यात आलं.
****
0 notes