Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. ****
· राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसः वीज पडून सहा जणांचा मृत्यू
· सत्ता आल्यास जाहीरनाम्यात घोषित किमान उत्पन्न योजनेची अंमलबजावणी करण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुनरूच्चार
· तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या १४ मतदार संघात ३९३ उमेदवार; आज अर्जांची छाननी
आणि
· निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्यासंदर्भात वक्तव्य केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
****
राज्यात अनेक ठिकाणी काल दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान वीज पडल्यामुळे सहा जणाचा मृत्यू झाला असून काही जनावरही दगावली आहेत.
बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसात दोन जणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरात गारांचा पाऊस पडला.
जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, परतूर, अंबड, घनसावंगी, मंठा तालुक्यात काल वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या गुंज इथं गोठ्यात थांबलेल्या ३४ वर्षीय महिलेसह दोन शेळ्यांचा वीज अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. शहागड परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळून झाडंही उन्मळून पडली. या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्याच्या काही तालुक्यात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळं आंब्यासह गहू आणि ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे.
हिंगोली शहरासह, कळमनुरी, सेनगाव तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. पावसामुळं हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा ते खानापूर चित्ता दरम्यान बाभळीचे झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
नांदेड शहरासह जिल्ह्याच्या मुदखेड, कंधार तसंच अर्धापूर तालुक्यात काल गारपीट झाली.
लातूर जिल्ह्यात काल जवळपास सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे लातूर शहरात अनेक भागात विद्युत पुरवठा बंद होता. निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यात वीज पडून सहा जनावरे दगावली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली.
अहमदनगर जिल्ह्यात काल दुपारनंतर नगर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. श्रीगोंदा तालुक्यात पिसोरे बुद्रुक इथं वीज पडून एका महिलेचा आणि कर्जत तालुक्यात दोन मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात यवतमाळ, सोलापूर, वाशिम तालुक्यातही अवकाळी पाउस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जाहीरनाम्यात घोषित केलेली किमान उत्पन्न योजनेची अंमलबजावणी निश्चित केली जाईल आणि या योजनेअंतर्गत पाच कोटी गरीब कुटुंबांना प्रतिवर्ष ७२ हजार रूपये दिले जातील, याचा पुनरूच्चार काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल नागपूर इथं प्रचार सभेत बोलतांना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचं तसंच दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यातील कुठलंही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं गांधी म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या १४ मतदारसंघात काल १९७ उमेदवारांसह एकूण ३९३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी काल १६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. आज तिसऱ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी होणार असून आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात एकूण ४६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सुभाष पाटील यांनी काल औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे उपस्थित होते. जालना लोकसभा मतदारसंघात एकूण ३७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघात काल शेवटच्या दिवशी १५, तर रावेर लोकसभा मतदार संघात १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जळगाव मतदार संघात भारतीय जनता पक्षानं काल आपला उमेदवार बदलला. आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून पाटील यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित झाली होती.
अहमदनगर मतदारसंघात एकूण ३१ तर सातारा लोकसभा मतदार संघात एकूण १४ अर्ज दाखल झाले आहेत.
****
पालघर मतदार संघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत, मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक मतदारसंघातून काल भाजपचे बंडखोर नेते विधिज्ञ माणिकराव कोकाटे यांनी अर्ज दाखल केला. या मतदार संघात शिवसेना भाजप युतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी टी के बागूल यांनी आम आदमी पक्षाच्यावतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधल्या वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यावेळी उपस्थित होत्या, अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रोड शो द्वारे मतदारांशी संपर्क साधला.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं रेपो तसंच रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास, यांनी ��ाल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. २०१९ - २० या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणासंबंधी तीन दिवसीय बैठकीनंतर काल हे धोरण जाहीर करण्यात आलं. बँकेचे रेपो दर आता सहा टक्के, तर रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के राहणार आहे. रेपो दरातली ही सलग दुसरी कपात आहे, या दर कपातीमुळे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होईल, असं दास यांनी सांगितलं.
या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन दशांश एवढा राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
निवडून आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवसांत जेलमध्ये टाकण्यासंदर्भात वक्तव्य केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुध्द यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथं अदखलपात्र गुन��हा दाखल झाला आहे. आघाडीच्या काल झालेल्या एका प्रचारसभेत बोलतांना ॲड.आंबेडकर यांनी हे वक्तव्यं केलं होतं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उस्मानाबाद मतदारसंघातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उमरगा इथं सभा घेतली, देशात जातीय तणाव वाढला असून, देश कर्जबाजारी झाल्याची टीका त्यांनी केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात, काँग्रेसने सत्तर वर्षात अनेक हल्ल्यांना प्रत्युत्तरं दिली पण त्याचं राजकारण केलं नाही, विद्यमान सरकार मात्र सर्जिकल स्ट्राइकचं राजकारण करत असल्याची टीका केली
****
लातूर लोकसभा मतदार संघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना पेड न्यूज प्रकरण आणि अन्य दोन उमेदवारांना सामाजिक माध्यमांबाबत माहिती न दिल्याच्या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल नोटीस बजावली, याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
लातूर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी पेड न्यूज संदर्भात नोटीस बजावली आहे. संबंधित वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचा खर्च शासकीय दरानं सतरा हजार नऊशे अठरा रूपये निवडणूक खर्चात नोंदविण्यात येतील असे बजावले आहे. तसंच लोकसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टी आणि बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीच्या उमेदवारांनी सोशल मिडीयाचा वापर करतात, हे प्रतिज्ञा पत्रात नमूद न केल्याविषयी सुध्दा खुलासा मागितला आहे. अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर.
****
लातूर लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मधुकर संभाजी कांबळे यांनी काल भाजप-सेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना जाहीर पाठींबा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थीत होते.
****
परभणी लोकसभा मतदार संघात रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सोडवले गेलेले नाहीत, त्यामुळे हेच प्रश्न घेऊन आपण मतदारांसमोर जात असल्याचे, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ. वैजनाथ फड यांनी सांगितलं आहे. ते काल परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांनी काहीही विकास कामं केली नसल्याचा आरोप त्यांनी केला
****
मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. व्हॉटस्अॅप वर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. मतदार यादीत नाव नसलं तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येणार नाही, असं या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
औरंगाबाद पोलिस अधीक्षक कार्यालयात एक राज्य एक ई- चालान या प्रणालीचं पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते काल उद्धाटन करण्यात आलं. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरच्या दंडात्मक कारवाईत, या प्रणालीमुळे सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे, यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन पुरवण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदान पावती पडताळणी यंत्र ठेवण्यासाठी बनवण्यात आलेल्या संरक्षण खोलीची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी काल पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
****
गर्भवतीच्या जिवीताला धोका असेल, तर नोंदणीकृत डॉक्टरला विस आठवड्यानंतरही गर्भपाताचा अधिकार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. या कारवाईसाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाच्या पीठानं, राज्य सरकारला येत्या तीन महिन्यात जिल्हा पातळीवर वैद्यकीय मंडळं स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
//**********//
,
0 notes