Tumgik
#प्रश्नावर
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सायबर सुरक्षा हा देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. 
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा.
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू.
****
सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त दिलीप पावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांनी राज्यपालांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांनी शहरातल्या सुभेदारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात राज्यभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांशी पाणी प्रश्नावर आपण चर्चा केली, तसंच वैधानिक विकास महामंडळा विषयी देखील चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांनी जळगाव इथं लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जळगाव जिल्हा सुवर्णालंकार व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं.  जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावं, राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचं रखडलेलं काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावं. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा असं राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.
****
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेची पोलिस कोठडी १३ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुख्य संशयित जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली, न्यायालयानं ती काही अंशी मान्य करत, १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू. राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. मात्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे तसंच संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आठ हजार ६०३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नाही तसंच आता लोकसंख्या वाढली असल्याने नाशिक जिल्ह्यालाच पुरेसं पाणी उपलब्ध नाही, असं सांगत, आमदार फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, समन्यायी पाणी वाटपाच्या पुनर्विलोकनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी अभ्यास करून पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश न्यायालयाने दिल्याचं, आमदार फरांदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. महात्मा फुले पुतळा इथून संवादयात्रा रॅली काढण्यात आली. यावेळी भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना अर्थसंकल्पीय तरतूद, जातिनिहाय जनगणना, प्रशिक्षण संस्था अशा एकूण १७ मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
****
प्राथमिक शिक्षक पदाकरिता केवळ पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा महाटीईटी’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिक्षण सेवकशिक्षक या पदांकरिता १० नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-१ घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-२ दुपारी २ ते साडे चार वाजे दरम्यान होणार आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३३ पूर्णांक ३९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यतल्या उर्वरीत १३१ पात्र शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी थेट हस्तांतरण योजना अर्थात डीबीटी द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रं लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 10 days
Text
Chinchwad : अटक करण्‍याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक
एमपीसी न्यूज – फ्राॅड केसमध्‍ये अटक करण्‍याची भिती दाखवत (Chinchwad)एका ज्‍येष्‍ठ नागरिकाची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे 4 ते 9 सप्टेंबर 2024 रोजी घडली. याप्रकरणी 60 वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिकाने सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम…
0 notes
imranjalna · 4 months
Text
*कासरा च्या मुख्य भूमिकेत जालन्याचा जनमेजय तेलंग!*निलम चित्रपट गृहात  प्रिमियर शो*
Jalna’s Janamejay Telang starring Kasara!Premier Show at Neelam Cinema* जालना ( प्रतिनिधी) :  शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित “कासरा” या चित्रपटात जालना शहरातील उभारता अभिनेता जनमेजय भागीरथ तेलंग हा मुख्य भूमिकेत दिसणार असून खास जालनेकरांसाठी रविवारी ( ता. 26) दुपारी 12.00 वा.रेल्वे स्थानक मार्गावरील निलम चित्रपट गृहात  विशेष प्रिमियर शो चे आयोजन करण्यात आले आहे. जूना जालना भागातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jayantnaiknavare · 9 months
Text
अखेरचा हा तुला बंदोबस्त !
नमस्कार पोलीस बंधू-भगिनिंनो,
मी उदया दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी साडेएकतीस वर्षांच्या पोलीस सेवेनंतर सेवानिवृ्त्त होत आहे. ३० व ३१ डिसेंबर रोजी सु्ट्टी आल्याने आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम होत आहे. मला बरंच काही बोलायचं आहे परंतु नेहमीप्रमाणे वेळेचं बंधन असल्यामुळं मी फक्त माझ्या कारकिर्दिचा आढावा घेणार आहे व मला इतर ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या लिखीत स्वरुपात आपल्या एस पीं कडे पीडीएफ मध्ये पाठवणार आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वेळ काढून जरुर वाचावं.
एम.पी.एस.सी.ची नागरी सेवा परिक्षा पास होण्यापूर्वी ज्या अनिश्चितेच्या मन:स्थितीतून जात होतो तशाच परंतु थोड्या वेगळ्या भावनाकल्लोळातून आता सेवानिवृत्त होत असताना जात आहे. पायलट, एस्काॅर्ट आणि पी.एस.ओ. काढून घेतलेले व्ही.आय.पी. जसे उसने अवसान आणून मला काय कुणाची भिती आहे असं सांगतात तसं काहीसं झालं आहे.
एकतीस डिसेंबर २०२३ ही तारीख कामाला लागल्यापासून अधून मधून कागदपत्रांमधून डोकावत राहायची. ती आता वास्तव बनून समोर उभी आहे. पोलीस विभागातली कारकिर्द संपली आणि आता पुढे कसं होणार हा अनुत्तरीत प्रश्न कसा सोडवायचा याची चिंता सतावू लागली आहे. कितीही उसणं अवसान आणलं तरी डोक्याला टेन्शन झालं आहे हे खरं.
बहुत शादमा थे
हम उनको भुलाके,
अचानक ये क्या हो गया.
के चेहरेपे रंगे मलाल आ गया.
आजूबाजूला होणारे बदल अनाकलनिय आहेत. वर्तमानामध्ये जगणं बरं असं वाटायला लागलं आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरुन असं दिसतं की भविष्याचा अचूक वेध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या कल्पनाशक्तिला मर्यादा आहेत हे वेळोवेळी जाणवतं. आपलं भविष्य कसं असेल याचा अंदाज सर्वसाधारणपणे भूतकाळात घडलेल्या घटना व घडामोडींवर बेतलेला असतो. परंतु चालू घटकेला घडणाऱ्या बदलांशी समरस होत आपली जगण्याची व्यूहरचना पदोपदी बदलत जाते. या वास्तवाकडे चिकित्सकपणे पाहिलं तर दिर्घकालीन नियोजनाला तसा फार काही अर्थ राहात नाही.
आता लाईफस्टाईलमध्ये महत्वाचे बदल करावे लागणार आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे पोलीस विभागातील नोकरीच्या अनुषंगाने अंगवळणी पडलेल्या सोयीसुविधा विसरण्याचा. घर, गाडी, कार्यालय, चालक, मदतनीस, अडली वजा करता शिल्लक उरते स्वावलंबन. अतिशय अवघड ॲडजस्टमेंट असणार आहे. ज्या गोष्टी आपण गेली तीस बत्तीस वर्षे गृहित धरुन चाललो होतो त्या आता संपुष्टात येणार आहेत. दुसरा आणि अतिशय महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे जमेल तितका व्यायाम करणं. कितपत शक्य आहे हे समजेलंच… परंतु संकल्प सोडायला काय हरकत आहे? संकल्प सोडणं म्हणतो ते अशासाठी की या गोष्टीवर पुढं जगण्याचं सगळं नियोजन अवलंबून असणार आहे. आरोग्य ही आतापर्यंत बाजूला ठेवली तरी निभावलं जाणारी गोष्ट होती परंतु इथून पुढं ही बाब जगण्याच्या केंद्रस्थानी ठेवावी लागणार कारण उत्तम आरोग्य व स्वावलंबन ह्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. जसं काम करून वेळ मिळाला तर आरोग्यासाठी दिला जात होता तसं यापुढं, अगदी त्याच्या विरुध्द, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जे काही करावं लागतं ते झाल्यानंतर उरलेल्या वेळेपैकी काही वेळ काम करायला द्यावा असं असणार आहे.
आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या माझ्या आत्मपर पुस्तकाच्या शेवटच्या भागात सेवानिवृत्तीनंतर काय करणार या प्रश्नावर थोडं विचारमंथन केलं होतं. त्यात चार-पाच मुद्दे नमूद केलेले आहेत. बिहार स्कूल ऑफ योग मध्ये एखादा कॅम्प करुन त्यानंतर योग हा दैनंदिन जिवनाचा भाग करुन टाकायचा, एक कपोलकल्पित (फिक्शन) पुस्तक लिहायचं, भरपूर संगीत ऐकायचं, जमेल तितकं फिरायचं आणि पोलीस शिपायांसाठी काही लिहायचं तसंच शिकवायचं. या संकल्पांवर गांभीर्यपूर्वक विचार करावा लागणार आहे.
मुंबई पोलीसमध्ये उपायुक्त असताना त्यावेळचे पोलीस आयुक्त श्री ए.एन.रॅाय यांनी एका खाजगी कंपनीनं प्रायोजीत केलेलं व्हर्टिकल इंटरॅक्शन वर्कशाॅप ठेवलं होतं. अनेक गोष्टींपैकी "तुमच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या व्यक्ति कोण'' हे इंग्रजीमध्ये एका फाॅर्मवर लिहून द्यायची एक्सरसाईज होती. मी फाॅर्म भरुन दिला. काही वेळाने मला शोधत बिझनेस सूटमधली एक मुलगी आली आणि पु.ल.देशपांडे म्हणाले होते तसं इथे इथे नाच रे मोरा असं पेनाने दाखवत म्हणाली होती की याचा अर्थ समजला नाही. कसा समजणार ? मी गमतीनं लिहिलं होतं: आयुष्यामधल्या तीन महत्वाच्या व्यक्ति : ड्रायव्हर, ॲापरेटर आणि ॲार्डर्ली...
यातला गमतीचा भाग सोडला तरी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय काम करणं अवघड असतं हे वास्तव आहे. पोलीस अधिकारी प्रशिक्षण संपवून कर्तव्यावर रुजू झाल्यापासून सेवानिवृत��त होईपर्यंत पर्सनल स्टाफ आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. कितीही दुर्गम भाग- कोणतीही वेळ- कसलंही हवामान आणि कसलीही जबरदस्त दंगल किंवा खराब परिस्थिती असो, अवती भवतीच्या पोलीस सहकाऱ्यांमुळे कधी असुरक्षित वाटलं नाही. दंगलीत डायरेक्ट दगड कधी लागलाच नाही. लागलाच तरी आजूबाजूला असलेल्या कुणाच्यातरी हेल्मेटवरुन, शिल्डवरुन रिकोशिएट होऊन आला तरंच. कितीही कठिण परिस्थिती असो कुठूनतरी कुणी देवदूतासारखा मदतीला धावून येणार हे नक्की. पूजेचं ताट घेऊन मागे न बघता देवाचा नवस फेडायला निघालेल्या भक्तासारखं; लाठी हेल्मेटसह मागे न पाहता जमावात घुसायच्यावेळी खात्री असायची की आपल्यामागे सगळेजण असणारंच. मोझेसला समुद्राने दुभंगून जसा रस्ता करुन दिला होता तसे अधिकारी व कर्मचारी तुम्हाला कितीही गर्दी असलेल्या मिरवणूकीतून पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणारंच.
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या सापेक्ष गोष्टी आहेत. प्रसरण पावणाऱ्या विश्वासारखा त्यांचा अमर्याद आवाका आहे. या चारही बाबी जणू सणासुदीला फेर धरणाऱ्या महिलांसारख्या नेहमी एकमेकींच्या हातात हात धरुन गोल फिरतात. परस्परावलंबी असल्याने त्यांची व्याप्ती जाणीवपूर्वक आटोक्यात ठेवावी लागते नाहीतर एक गोष्ट मिळाली की दुसरी व दुसरी मिळाली की तिसरी प्राप्त करण्याकडे लोकांचा नैसर्गिक कल राहतो.
पहिली व अतिशय मूलभूत गोष्ट म्हणजे आसक्ती होय. आसक्तीला बरेच कंगोरे आहेत. त्यामध्ये वात्सल्य, माया, ओढ, निरपेक्ष प्रेम इत्यादि बाबी येतात. जसे, कोणतीही अपेक्षा न ठेवता आईवडिलांचे मुलांवरील प्रेम. आसक्तीशिवाय पुनरुत्पादन व मानववंश संवर्धन असंभव आहे- निदान नवजात अर्भकाच्या बाबतीत तरी... जीवनाला पूरक बाबींची निसर्गाने सोय करुन ठेवली असली तरी, विशिष्ट काळासाठी परावलंबी राहणं जीवनाच्या रहाटगाडग्याचा भागच आहे. आईवडिल व मुलं, मित्र- मित्र, प्रियकर-प्रेयसी व पती-पत्नी या समाजमान्य आसक्ती दिसून येतात. उरलेल्या पैसा, प्रसिद्धी व सत्ता या तीन गोष्टींचा दरएक माणसाच्या आयुष्यात येण्याचा क्रम वेगवेगळा असू शकतो.
इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला तसं पाहिलं तर चपखल बसणारा मराठी शब्द सापडला नाही. त्याअर्थाने जवळचा शब्द म्हणजे सत्ता. परंतु पाॅवर या शब्दाची व्याप्ती सत्ता शब्दापेक्षा बरीच जास्त आहे. नेतृत्व करणं, प्रभाव टाकणं, अनुयायी तयार करणं या व अशा अनेक बाबींचा सामावेश पाॅवर या शब्दात होतो. सत्ता या शब्दातून बऱ्यापैकी औपचारिकता अभिप्रेत होते. म्हणजे शासनकर्ते, निवडून आलेले लोकसेवक, न्यायव्यवस्था, पोलीस व नागरी सेवेतले अधिकारी, सैन्यदले इत्यादिंना कायदे-कानून तयार करुन शासन चालविण्यासाठी, न्यायनिवाडे करण्यासाठी, प्रशासन-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, देशाच्या संरंक्षणासाठी तसेच समाज नियमनासाठी प्रदान करण्यात आलेले कायदेशीर अधिकार वगैरे होत. सत्ता हा शब्द इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून या पुस्तकात वापरला आहे.
वर म्हटल्या प्रमाणे आसक्ती वगळता पैसा, प्रसिध्दी व सत्ता या उरलेल्या तीन सापेक्ष गोष्टी आयुष्यात कोणत्याही क्रमाने घडू शकतात. काहींना आधी पैसा मिळतो त्यायोगे प्रसिध्दी व सत्ता मिळते. काहींना आधी सत्ता व सत्तेच्या माध्यमातून पैसा व प्रसिध्दी तर इतरांना आधी प्रसिध्दी नंतर पैसा व त्यानंतर सत्ता मिळू शकते. या सर्वांचा क्रम उलट सुलट असला तरी प्रत्येक बाबीची कमाल व किमान मर्यादा प्रत्येकाच्या कर्तृत्वावर, नशीबावर, वारश्याने मिळालेल्या संपत्तीवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ही मर्यादा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्यासाठीच्या सततच्या स्पर्धेमुळे जगण्याचे संतुलन बिघडते व त्यामुळे जीवनात बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतात.
व्यापार उद्यम करुन श्रीमंत झालेल्या व्यक्ती त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीमुळे प्रसिध्द होतात व त्यांना इतरांवर प्रभाव टाकता येतो. नेतृत्वगुण अंगी असलेल्या व्यक्ती समाजोपयोगी कामे करतात. संघटना बांधतात किंवा आधी कुणीतरी बांधलेल्या संघटनेत सक्रिय होऊन समाजावर छाप पाडतात व त्यामुळे प्रसिध्द होतात. काही प्रसिध्दी पर्यंत थांबतात तर बरेचजण त्यामाध्यमातून संपत्ती जमा करतात. ज्यांच्या अंगी सुप्तगुण आहेत असे काहीजण खेळ, संगीत, अभिनय, चित्रकला इत्यादिंमध्ये प्राविण्य मिळवून प्रसिध्द होतात त्यायोगे त्यांच्याकडे संपत्ती येते. याउलट समाजविघातक, अनैतिक व गैरकायदेशीर कामे करुन पैसे मिळवणारे व त्यामुळे कुप्रसिध्द झालेले त्याचप्रकारचे मार्ग पत्करुन सत्ता मिळवणाऱ्यांच्या आश्रयाला गेलेले आपण पाहातो.
जगातल्या पंच्याहत्तर टक्के समस्या ह्या पैशांशी निगडीत असतात असं माझं मत आहे. या पृथ्वीतलावर माणसं अनंत काळापासून समूहानेच राहातात आणि तेंव्हापासूनच पृथ्वीतलावर उदरनिर्वाहासाठी बुफे सिस्टिम अस्तितवात आहे. काही लागलं की निसर्गाकडून घ्यायचं. सुरुवातीला शिकार करणं आणि निसर्गाने पिकवलेलं अन्न गोळा करणं ही मुख्य कामं होती. पोटाला लागेल इतकंच घ्यायचं, संचय करायचा नाही. मुख्य प्रश्न होते ते आरोग्य आणि सुरक्षिततेशी निगडीत. आरोग्याच्या प्रश्नावर उपाय म्हणजे हवामानानुसार वस्रं वापरणं आणि उन, पाऊस आणि वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी गुहा खोदून निवारा तयार करणं. सुरक्षेच्या प्रश्नावर छोटे छोटे समूह करुन राहणं, बचावासाठी हत्यारं तयार करणं आणि हवामानानुसार स्थलांतर करणं हा तोडगा काढण्यात आला होता.
युवल नोहा हरारी हा इस्रायली लेखक आपल्या सेपीयन्स या पुस्तकामध्ये लिहितो की सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता तेंव्हा मानवाच्या सेपीयन्स जातीने बुध्दीमत्तेच्या जोरावर जवळच्या निआंन्डरथल आणि तशा इतर सस्तन जातभाईंचा, उत्क्रांतीच्या देव- दानव लढाईत, पराभव केला आणि तेंव्हापासून होमो सेपीयन्स ही एकच मानवजात संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करत आहे. आपल्या कुणाच्याही डी.एन.ए.चे, माॅलमधल्या बारकोड रिडर सारखे स्कॅन करुन, जेंव्हा कधी वाचन शक्य होईल तेंव्हा पृथ्वीतलावरची झालेली सगळी महायुध्दं, लढाया आणि भांडणं ही सत्तर हजार वर्षांपासून चालत आलेली भाऊबंदकीच होती हे स्पष्ट होईल.
हरारी यांच्या मते होमो सेपीयन्सनी ही उत्क्रांतीची लढाई जिंकली ती त्यांच्या आकलनाच्या क्षमतेमुळे. याला ते काॅग्निटीव्ह रिव्हाॅल्यूशन म्हणतात. त्यानंतर सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी दुसरी क्रांती झाली ती होती कृषी क्रांती- किंवा ॲग्रिकल्चरल रिव्हाॅल्यूशन. काही संकल्पना, जसे देव, देश, धर्म, चलन, ज्या आभासी आहेत त्यांवर विश्वास ठेवण्याची होमो सेपीयन्सची ही आणखी एक क्षमता ही अद्वितीय होती. या क्षमतेमुळे मोठ्या संख्येने आपापसात सहकार्य करुन, आभासी बाबी खऱ्या आहेत हे मानून परस्पर विश्वासावर तयार केलेली चलनव्यवस्था त्यांच्या लोकसंख्यावाढीला आणि सृष्टीतील इतर प्रजातींवरील त्यांच्या अधिपत्याला जबाबदार आहेत. शासन आणि अर्थ या दोन्ही व्यवस्था धर्म व्यवस्थेवर बेतलेल्या आहेत असंही हरारी म्हणतात.
पुढे विज्ञानक्रांतीत लागलेले विविध शोध, औद्योगिक क्रांती यामुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाले.
हरारी यांचं म्हणणं विज्ञ���न, मानववंशशास्र आणि तर्कशास्रावर बेतलं असल्यानं मनाला पटतं. आपल्या जगाबाबत आणि मानव जाती बाबत विचार करण्याच्या पध्दतीवर या बाबींचा सखोल परिणाम होऊ शकतो. देव, देश आणि धर्म ह्या मानवनिर्मित संकल्पना आहेत या पार्श्वभूमीवर असंही म्हणता येईल की या संकल्पना ज्या उद्देशांनी निर्माण करण्यात आल्या ती उद्दीष्टं बऱ्यापैकी सफल झाली तर त्या नष्ट होऊ शकतात किंवा त्यामध्ये काळानुसार बदल होऊ शकतात. याचाच अर्थ असा की या संकल्पनांवर विश्वास ठेवणे ऐच्छिक आहे. वसुधैव कुटुम्बकम्, पृथ्वी हा परिवार आहे ही संसदेच्या प्रवेशद्वारावर लिहिलेली संकल्पना आपल्यासाठी फार महत्वाची आहे. जगाबद्दल विचार करताना काल्पनिक सरहद्दींना जास्त महत्व देण्याचं कारण नाही.
स्वत:च्या मनाला बाहेरच्या जगाचा विचार करताना, किमान विचारात तरी, सरहद्दीच्या बंधनात बांधणे योग्य नाही. तिच गोष्ट धर्माची. व्हिक्टर फ्रॅंकल हे विचारवंत म्हणतात त्याप्रमाणे सहिष्णूता म्हणजे इतरांच्या श्रध्देशी सहमत होणं नसून प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे श्रध्दा ठेवण्याच्या अधिकार असल्याचं मान्य करणं होय.
जगातली आत्ताची अर्थव्यवस्था ही कृष्णविवरा सारखी आहे. एकदा त्यामध्ये ओढले गेलो की त्यातून सुटका नाही. बाहेरुन न कळणाऱ्या या कृष्णविवरातला प्रवेश कुणालाही चुकला नाही.
ब्रासटॅक्स् ॲाफ मनी
पैसा हे मानवाच्या श्रमाचं फलित मानलं जातं. पैशांची उपयुक्तता ही आपल्या कृतींवर अवलंबून असते. आपण उत्पादित केलेल्या अनेक वस्तूंपैकी बऱ्याच वस्तू अशा असतात की त्या सर्वांना या ना त्या कारणास्तव नेहमी लागतात. अशा नेहमी लागणाऱ्या वस्तूंचा प्रथम चलन म्हणून उपयोग होऊ लागला. या मालाची अदलाबदल करुन होणाऱ्या व्यापाराला बार्टर पध्दत म्हणतात. या पध्दतीत वेळेचा अपव्यय जास्त होत असे व आपल्याला नेमकी पाहिजे असलेली वस्तू मिळेपर्यंत थांबायला लागे. तसेच समोरच्याला त्याच्या वस्तूच्या बदल्यात नेमकी आपल्याकडील वस्तू पाहिजे असं गिऱ्हाईक मिळायला वेळ लागे. त्याचप्रमाणे आपल्याकडील वस्तूच्या बदल्यात समोरच्याकडील वस्तूचे मूल्य ठरविणं आणखी वेगळीच समस्य़ा होऊ लागली. यावर उपाय म्हणजे सर्वोपयोगी व जास्त मागणी असलेल्या सामान्य वस्तू चलन म्हणून वापरात आणणं. अशा सामान्य वस्तू खरेदी-विक्री व देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यासाठी वापरायचं माध्यम झालं. हीच पैशांची सुरुवात मानायला हरकत नाही.
त्यानंतर वेगवेगळ्या धातूंच्या अंगी असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्यांचा चलन म्हणून वापर करणं सोय़ीचं ठरु लागलं. धातूंचा टिकाऊपणा, तुकडे करुन विभाजन केलं तरी गुणधर्मात काही फरक न पडणं व त्यांना स्वत:ची अशी आंतरिक किंमत असणं इत्यादिंमुळं प्रामुख्यानं तांबा, चांदी व सोनं ही मुख्य चलनं झाली. एकीकडं सोनं व चांदी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांना, त्यांच्या आंतरिक मूल्यामुळे जास्त महत्व प्राप्त झालं, व लोक त्यांचा संचय करू लागल्याने ही मौल्यवान जंगम मालमत्ता सुरक्षित ठेवणं जिकीरीचं होऊ लागलं. तर दुसरीकडं बाजारांमध्ये व्यापार उद्यम जसा वाढू लागला तशी वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांची गरज वाढूच लागली. ही चलनाची मागणी टाकसाळींमध्ये योग्य प्रतिची नाणी पाडून पुरविणं काही प्रमाणात होत होतं परंतु त्यालाही मर्यादा होत्या. एकीकडे लोकांकडे साठवून ठेवलेली परंतु उपयोगात न आणल्याने पडून असलेली मौल्यवान नाण्यांची जंगम मालमत्ता तर दुसरी कडे व्यापारासाठी अधिकाधीक नाण्यांची आवश्यकता ही मागणी विरुध्द पुरवठा अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकांकडील नाणेसंचय वर म्हटल्याप्रमाणे असुरक्षित तर होताच त्यावर भर म्हणजे नुसता साठा करुन ठेवल्याने त्यांच्या किमती मध्ये वाढसुध्दा होत नव्हती. यावर तोडगा म्हणून स्वतः:ची अशी समाजामध्ये प्रतिष्ठा असलेला व लोकांचा विश्वास असलेला प्रामाणिक माणसांचा वर्ग तयार झाला. या व्यक्ती सामान्यांकडून व्याजावर ठेवी स्विकारु लागल्या व व्यापाऱ्यांना थोड्या जास्त व्याजाने हे पैसे पुरवू लागल्या. ठेवीदारांना दिलेले व्याज व व्यापाऱ्यां कडून मिळालेलं व्याज यामधील फरक हा या प्रतिष्ठीत व्यक्तींना मिळालेला नफा त्यांच्या उत्पन्नाचं आणखी एक स्तोत्र झालं.
ठेवीदारांकडून स्विकारलेल्या ठेवींचा पुरावा म्हणून हे समाजात प्रतिष्ठा असलेले विश्वासू लोक ठेवीदारांना पावत्या देऊ लागले. या पावत्यांना विश्वासार्हता असल्याने त्यांचा उपयोग मौल्यवान दस्ताऐवजा सारखा होऊ लागला. प्रारंभी या पावत्या एका व्यक्ती कडून दुसरीकडे व दुसरीकडून तिसरीकडे जात व जेंव्हा केंव्हा ही पावती मोडण्यासाठी प्रतिष्ठीत व्यक्तीकडे जाई तेंव्हा तिच्या पूर्ण मूल्याएवढं चलन मिळू लागलं त्यामुळं या पावत्या हस्तांतरणीय झाल्या. या प्रक्रियेतून दोन बाबींचा उगम झाला. पहिली बाब म्हणजे बॅंका व बॅंकर्स उदयाला आले व दुसरी घडामोड म्हणजे जंगम मालमत्तेच्या ठेवीवर देण्यात आलेल्या पावत्या कागदी चलनं झाल्या.
तरीही खाजगी जंगम मालमत्तेच्या सुरक्षिततेचा मुद्दा येतंच होता. त्यामुळे राजानं ही सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारणं ओघानंच आलं. नुसती जबाबदारीच नाही तर टाकसाळी सुरु करुन नाणी पाडणं व त्यांच्यामध्ये मौल्यवान धातूंचा योग्य अंश राहिल याची दक्षता घेणं हे सुध्दा राजाच्या विश्वासार्हतेचं प्रतिक झालं. राजाच्या दृष्टीनं कर गोळा करणं यामुळं अधिक सोयीचं झालं. वेगवेगळे राजे आपापल्या मुद्रा टाकसाळीत तयार करून चलनासाठी बाजारात आणू लागले. नाण्यांची शुध्दता व त्यामुळे त्यांना प्राप्त झालेलं आंतरीक मूल्य ही राजांच्या सार्वभौमत्वाची व प्रतिष्ठेची लिटमस टेस्ट झाली. अशी मौल्यवान नाणी त्यांच्या आंतरीक मूल्यामुळे राज्याच्या स्थळसीमांच्या बाहेरसुध्दा आंतरराज्य व आंतर्देशीय व्यापारासाठी स्विकृत होऊ लागली. त्याचबरोबर बॅंकर्सनी दिलेल्या पावत्या व हुंडींचा सुध्दा व्यापाऱ्यांच्या विशिष्ट समूहामध्ये वापर वाढू लागला.
जसजशी राजांच्या साम्राज्यांची व्याप्ती वाढू लागली तसतशी आपापल्या हद्दीत आपलीच नाणी वापरावी जावीत याबद्दल आग्रह व सक्ती सुरु झाली. महंमद बिन तुघलक याच्यासारख्या तिरसट परंतु आर्थिक दूरदृष्टी असलेल्या सुलतानाने टोकन म्हणून पहिल्यांदा तांब्याच्या धातूंची नाणी पाडून चलनात वापरायला मुभा दिली. ही तांब्याची नाणी सियासती टाकसाळींमध्ये पाडून मग एकाधिकाराने चलनात आणण्याचं धोरण न ठेवल्यामुळं त्याकाळी घराघरात टाकसाळी सुरु होऊन सर्रास तांब्याची नाणी तयार होऊ लागली होती व चलनाचे अवमूल्यन झाले होते.
युरोपिय देशांनी गोल्ड स्टॅंडर्डवर आधारलेली म्हणजे सुवर्ण मूल्याधारित व्यवस्था सुरु केली. त्यासाठी केंद्रीय बॅंक किंवा रिझर्व्ह बॅंकांची निर्मिती करण्यात आली. या बॅंका शासनाच्या मालकीच्या मौल्यवान धातूंच्या म्हणजे बुलीयनच्या विश्वस्त झाल्या. केंद्रीय बॅंका शासनाचा सोन्याचा साठा आपल्याकडे सांभाळून त्याच्या बाजारमूल्याइतकं चलन छापून व नाणी पाडून अर्थव्यवस्थेमध्ये आणू लागल्या. कायदे करुन नोटा छापणं व नाणी पाडणं ही शासनाची मक्तेदारी करण्यात आली. या एकाधिकारामुळे बनावट चलन बाजारात आणण्याचा मार्ग बंद झाला. शासनाने आपल्याकडील सोन्याच्या साठ्याच्या भरवश्यावर छापलेले चलन म्हणजे गोल्ड स्टॅंडर्ड. आपल्या नोटेवर “मैं धारक को सौ रुपये अदा करने का वचन देता हूँ “ असं लिहून त्याखाली रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची सही असते. हे वचन म्हणजे ज़र कुणा एकाला कधी वाटलं की त्याच्याकडची नोट कुठेच चालत नाही तर तो रिझर्व्ह बॅंकेत ती नोट चालवू शकतो.
पहिल्या महायुध्दापर्य़ंत ही सोन्यावर आधारीत अर्थव्यवस्था व्यवस्थित चालू होती. पहिल्या महायुध्दाच्या प्रचंड खर्चानंतर विकसीत राष्ट्रांवरील कर्जाचा बोजा वाढला. परिणामस्वरूप ही सुवर्ण मूल्याधारित अर्थव्यवस्था सोडून द्यावी लागली. सोन्याच्या पुरवठ्यात तुटपुंजी वाढ झाली परंतु त्या तुलनेत जगभराची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढल्याने मागणी पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे या व्यवस्थेवर असलेला विश्वास समाप्त होऊन ब्रिटीश पाऊंड व अमेरिकन डाॅलर ही जगभराची राखीव चलनं झाली. सगळे देश सोन्याऐवजी ही दोन चलनं व्यापार उद्यमाच्या देण्याघेण्यासाठी आपल्याकडं परदेशी चलन म्हणून साठवू लागली. याचा परिणाम असा झाला की फक्त मोठ्या देशांकडे सुवर्णसाठा वाढला. १९२९ साली जगभरातलं शेयर मार्केट कोसळलं. त्यामुळं ब्रिटननं गोल्ड स्टॅंडर्ड सोडून दिलं. ब्रिटीश पाऊंड सुवर्ण मूल्याधारित व्यवस्थेतून बाहेर गेल्यामुळे फ्रान्स व अमेरिका या दोन देशांकडे सुवर्णसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.
१९३४ साली अमेरिकेने सोन्याचा भाव २०.६७ डाॅलर प्रति औंस (२८.३५ ग्रॅम) वरुन ३५ डाॅलर प्रति औंस असे पुनर्मूल्यांकन करुन वाढवला. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने अमेरिकेने उचलेले हे पाऊल होते. त्यामुळे प्रति औंस सोनं खरेदीसाठी १४.३३ डाॅलर जास्त द्यावे लागू लागले. याचा परिणाम असा झाला की इतर देशांकडील राखीव सोन्याची किंमत अमेरिकन डाॅलरमध्ये वाढली. त्यामुळे अमेरिकन चलनाचे अवमूल्यन झाले. अमेरिकेने सोन्याच्या बाजारावरचा कब्जा वाढवल्यामुळे जगभरातल्या सोन्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. इतकी की १९३९ सालापर्यंत सगळी चलनं पुन्हा गोल्ड स्टॅंडर्डवर आणता येण्याजोगी परिस्थिती तयार होण्याइतकं सोन्याचं उत्पादन झालं. १९६९ साली अमेरिका व युरोपिय देशांनी लंडनच्या शेअर मार्केटवर सोनेविक्री बंद केली व सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले. १९६९ ते १९७१ या काळात सर्व देशांच्या रिझर्व्ह बॅंका वाणिज्य व्यवहारांसाठी अमेरिकेला सोन्याची ३५ डाॅलर प्रति औंस या भावाने खरेदी विक्री करु शकत होते. १९७१ साली सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले व रिझर्व्ह बॅंकाना आपापल्या चलन व्यवस्थेची विश्वासाहर्ता राखण्यासाठी सुवर्णसाठे करून ठेवण्याची गरज संपली.
आता जमाना आहे तो फियाट चलनाचा. फियाट म्हणजे शासनाचा वटहुकूम. मध्यवर्ती बॅंकेला आदेश दिला जातो की अमूक तमूक किमतीचं चलन छापा. आगोदर जेवढ्या किमतीचं सोनं शासन ठेवेल त्याच्या पाठबळावर चलन छापून वितरीत केलं जायचं. परंतु फियाट चलनामध्ये शासनाच्या विश्वासावर चलन छापलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार डॅालर्समध्ये चालतो त्यामुळे अमेरिकन डॅालर्सचा परदेशी चलन म्हणून सगळे देश साठा करतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून हे केलं जातं. परंतु अमेरिकेने मोठ्या प्रमाणात चलनफुगवटा केला तर डॅालरच्या किमती घसरु शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना इतर देशांसमोर ही समस्य़ा कायम असते. अजून तरी सगळं नियंत्रणाखाली आहे असं दिसत असलं तर फियाट चलनाच्या दिर्घकालीन संतुलनाबद्दलचे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी हा इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला निर्वासीत इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं. त्याचं असं झालं की, अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. त्याकाळी व्यावसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा पत्र पाठवणारानं देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा अमेरिकेतून युरोपातल्या एखाद्या देशात व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. युरोपातल्या त्याकाळातल्या विकसनशील देशात ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात युरोपातून अमेरिकेत ज्या दराने पत्र पाठविता येईल त्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. हाच प्रकार युरोपातून अमेरिकेमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टपाला बाबत होता होता. यामागील उद्देश असा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. पेसेटा हे त्याकाळी स्पेनचं चलन होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्याच्यामते ४००% नफा झाला.
चार्लसने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्युरिटी आणि एक्सचेंज कंपनी ... आणि ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. एक्क्याणवव्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली तेंव्हा गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूकदारां��ा दिले होते. हां हां म्हणता ही बा��मी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघंच लागली. चार्लस् वर्षभरातंच अतीश्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले व रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केला जायचा. त्यामुळे घोषणा केलेल्या या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डाॅलर्स जमा केले. बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिकेनंतर पत्त्यांच्या इमल्यासारखी त्याची ही योजना कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केल्या प्रमाणे पूर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने त्यापैकी कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअल करत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळतं की ती पाॅंझी स्कीम होती म्हणून...
लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया व डॅालर्सचा पाऊस
कोलंबीयन लष्कराच्या हंटर बटालियनचा लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया २००३ साली आपल्या ७२ जवानांसह मिशनवर होता. मिशन होतं कोलंबीयाच्या जंगलात अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या परदेशी नागरिकांची सुटका करणं. कित्येक आठवडे झाले होते आणि जंगलातली उदरनिर्वाहाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. तशात एके दिवशी सकाळी एक जवान बेस कॅम्पला आला. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण त्याच्या खिशांत आणि हातात ओसंडून वाहणारे १०० अमेरिकन डॅालर्सच्या नोटांचे बंडल्स होते. जॅार्जला वाटलं खोट्या नोटा असतील. पण निट निरखून पाहता सगळ्या खऱ्या नोटा होत्या. सगळा कॅम्प तहान भूक विसरून गेला. नोटांचं रहस्य होतं एफ.ए.आर.सी. या कोलंबीयाच्या दहशतवादी संघटनेनं जमिनीत पुरुन ठेवलेला पैसा. एफ.ए.आर.सी. जरी दहशतवादी संघटना असली तरी कोकेनचा अवैध व्यवसाय करणं त्यांना जास्त फायद्याचं ठरु लागल्यानं क्रांती वगैरे करण्याचं सोडून कोकेनचा व्यवसाय करत होती. काही आठवड्यांपासून हंटर बटालियनच्या या कंपनीचा मुक्काम एफ.ए.आर.सी. च्या कॅम्पवर होता. सगळे जवान या दहशतवादी संघटना कम ड्रग कार्टेलच्या जमिनीत बॅरल्समध्ये पुरुन ठेवलेल्या मध्यवर्ती बॅंकेच्या साठ्यावर अक्षरश: झोपत होते.
जाॅर्जच्या कंपनीची चांदीच झाली. अतिरेक्यांच्या तावडीतून ओलिसांची सुटका वगैरे करायचं काम कंपनीनं थांबवलं आणि खजिन्याच्या शोध घ्यायचं काम सुरु झालं. जाॅर्जने कंपनी कमांडर म्हणून निर्णय घेतला की सापडलेल्या पैशांबद्दल बटालियन हेडक्वार्टरला काही सांगायचं नाही. साधा सोपा हिशेब ठेवला; जो जितके डाॅलर शोधून काढेल तितके त्याचे. एका बॅरलमध्ये ८० लक्ष अमेरिकन डॅालर अशी वीस पेक्षा जास्त बॅरल्स जवानांनी उकरुन शोधून काढली. सुमारे १५ कोटी अमेरिकन डाॅलर्स होते. भारतीय चलनामध्ये ७५ रुपये प्रती डाॅलर हा हल्लीचा भाव धरला तर ११२५ कोटी रुपये होते.
जवानांचं स्वप्नरंजन सुरु झालं. अर्धपोटी असणं सगळे विसरुन गेले. दोन आठवडे असेच गेल्यानंतर सापडलेल्या डाॅलर्सचा वापर दैनंदिन गोष्टींसाठी करत छोटी अर्थव्यवस्था सुरु झाली. शंभर डाॅलरला एक टाॅयलेट पेपर, बॅटरीसह रेडिओ एक हजार डाॅलरला, नविन टूथब्रशची कितीही किंमत दिली तरी एकजण विकायला तयार नव्हता असे प्रसंग घडू लागले. मंडळी कोट्याधिश होती पण खायला काही नव्हतं. आर्मीची हेलिकाॅप्टर्स् इतर महत्वाच्या ॲापरेशन्समध्ये गुंतली असल्यानं या कंपनीच्या जवानांना हेडक्वार्टरला परत न्यायला येऊ शकत नव्हती त्यामुळं हंटर बटालियनच्या कंपनीचे जवान जंगलातच अडकून पडले होते.
शेवटी एकदाची हेलिकाॅप्टर्स आली आणि जितके होतील तितके डाॅलर्सचे बंडल्स घेऊन जवान हेलिकाॅप्टर्स् मध्ये चढले. ठासून हॅवरसॅक्स भरल्या तरी सगळ्यांना मिळून ४ कोटी ६ लक्ष डाॅलर्सच सोबत नेता आले. बाकीचे १०-११ कोटी डाॅलर्स परत बॅरल्समध्ये भरून पुरुन ठेवायला लागले. जवानांचं अवजड लगेज पाहून पायलटना पण आश्चर्य वाटलं. कुणाला काही सांगू नका आणि पैसे खर्च करु नका हा जाॅर्जचा सल्ला मानतील तर ते तरुण जवान कसले? पोपोयान या टाऊन जवळच्या हेडक्वार्टरला परत आल्या आल्या जवानांनी उन्माद सुरु केला. कासा द कॅम्बियो या परदेशी चलन कोलंबियन चलनात बदलून देणाऱ्या ॲाफिसमधलं कोलंबियन चलन संपलं. कुणी महागड्या गाड्या, कुणी मोटारसायकली, कुणी बारमध्ये प्रचंड पैसे उडवायला सुरुवात केली. ही बातमी बटालियनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या कानावर न जाईल तरच नवल. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या जवानांना फाॅलइन व्हायचा आदेश निघाला. जे परेडवर हजर झाले त्यांना अटक करण्यात आली. जे पसार झाले त्यांचा शोध सुरु झाला.
पळुन गेलेल्यापैकी एकजण वेस्ट इंडिजच्या एका बेटावर पोहोचला. तिथं त्यानं नविन ओळख धारण करुन लहानसे हाॅटेल खरेदी करुन ते चालवू लागला. दुसऱ्याने अर्जेंटिनाची एक बस कंपनी विकत घेतली आणि जवळ जवळ रिकाम्या बसेस चालवून काळ्याचं पांढरं करायला लागला. लेनिन नावाच्या तिसऱ्याने इक्वॅडोरला जाऊन लिंगबदल सर्जरी केली आर्मेनिय़ा नावाच्या शहरात ब्यूटी पार्लर उघडून आणि एका पोलीसाशी लग्न करुन राहू लागला. जरी कोलंबियन सरकारनं या सर्वांना गुन्हेगार घोषित केलं असलं तरी सामान्य लोकांमध्ये हे सगळे आख्यायीकांतले हिरो झाले होते. त्यांच्या मते या जवानांनी जिवावर उदार होऊन अतिरेक्यांशी मुकाबला केला आणि योगायोगानं त्यांना ही संपत्ती सापडली होती. तसं पाहिलं तर ही युध्दात मिळालेली संपत्ती होती आणि त्यामुळे त्यांनी ती स्वत:कडे ठेवण्यात काही गैर नव्हतं.
कालांतराने अटक झालेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आणि काहींना त्यांच्याकडून जप्त केलेलं पैसेही परत मिळाले. परंतु ही शापीत दौलत होती. त्यापायी कित्येकांच्या हत्या करण्यात आल्या. कित्येकांच्या कुटुंबातील लोकांचं अपहरण करुन खंडण्या मागण्यात आल्या तर कित्येकांना सरळ सरळ धाक दाखवून लुटण्यात आलं.
टन ॲाफ लक हा सिनेमा या घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर रिग्रेसो अ ला वुआका (खजिन्याकडे परत) ही स्पॅनिश भाषेत सिरीयल पण आली आहे.
पैशांबद्दलच्या दहा गोष्टी
आपल्याकडे असलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी. थोडक्यात काय तर पैसे कमावणं आणि कमावलेले पैसे सांभाळूणं वाढवणं या दोन वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पगारदार तसेच ज्यांची मासिक आमदानी ठरलेली असते अशांना पैसे बॅंकेत टाकता येतात त्यामुळं सांभाळायचे कसे हा प्रश्न राहात नाही. परंतु त्यामुळे त्यांच्यापुढे कमाईवृद्धी कशी करायची ही मोठी समस्य़ा असते. दुर्देवानं याकरीता मूलभूत गरजांना ���णखी कात्री मारुन बचत वाढविणं हाच पर्याय राहतो. दुर्देवानं अशासाठी की सकस आहार, रोजच्या जिवनातले छोटेमोठे आनंद इत्यादिंना यांना व यांच्या कुटुंबीयांना जास्त बचतीपायी मुकावं लागतं. देशापुरताच विचार केला तर गृहिणींनी केलल्या बचतीमुळे बहुतांश मध्यम आणि गरीब वर्ग तग धरुन आहे असं आय.आय.एम.बंगळूर अर्थशास्राचे प्राध्यापक डाॅ. आर. वैद्यनाथन म्हणतात ते खरंच आहे. या उलट व्यापार उद्यमाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पैसे येतात ते पुन्हा उद्योगधंद्यात योग्यप्रकारे गुंतवूण वाढवणं हे सुध्दा मोठं आव्हान असतं.
पैसा कुणाचा? तर जो उपयोगात आणेल त्याचा, असं बेंजामिन फ्रॅंक्लीन म्हणंत. पैसे मिळविण्यातल्या व्यस्ततेत कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्याचं राहूनंचं जातं. पैसे बँकेत, शेअर मार्केट, रिअल इस्टेट वगैरेमध्ये अडकून किंवा दुर्लक्ष झाल्याने पडून राहतात. गुंतवणूक केलेल्या समभागांच्या कल्पनारम्य (नोशनल) मूल्यामध्येच समाधानी राहावं लागतं. नोशनल मूल्य म्हणजे समभागांचे बाजारमूल्य. शेअरबाजाराच्या निर्देशांच्या वाढ किंवा घटीप्रमाणे समभागांचे मूल्य कमी जास्त होत राहाते. पुन्हा प्राध्यापक आर. वैद्यनाथन यांच्या मिश्कील शब्दात सांगायचं तर शेअर बाजारामध्ये लक्षावधी अभिमन्यू गुंतवणूकदार आहेत ज्यांनी शेअरबाजाराच्या चक्रव्यूहात प्रवेश तर केला परंतु त्यातून सहीसलामत बाहेर कसं पडायचं हे माहित नसल्याने आतंच अडकून पडलेले आहेत. काहींची मोठे परतावे कमी वेळेत देतील अशा आकर्षक परंतु फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक होते. बाजारात प्रचलीत असलेल्या व्याजदरापेक्षा गुंतवणूकीवर जास्त व्याज देणाऱ्या बऱ्याच योजना बनवाबनविच्या असतात. जेष्ठ नागरिक ठराविक मासिक उत्पन्न मिळेल या आशेने या योजनांमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे गुंतवतात. फसवणूक करणं हे अशा खाजगी कंपन्यांचं पहिल्यापासून बिझनेस मॅाडेल असल्यानं पश्चाताप करण्याशिवाय गुंतवणूकदारांच्या हातात काही शिल्लक उरत नाही.
काही बनेल रिअल इस्टेटवाले मोठ्या परताव्याचं अमिष दाखवून दरमहा अमूक तमूक व्याज देऊ असं सांगून रोकड उचलतात. दरमहा व्याज योग्य रितीनं मिळत असल्यानं गुंतवणूकदार समाधानी असतात आणि आपल्या गुंतवणूकीच्या वृध्दिबद्दल निश्चिंत होतात. एके दिवशी रिअल इस्टेटवाला झटका देतो आणि जाहिर करतो की मार्केट फार डाऊन आहे. इथूनपुढे व्याज काही देऊ शकत नाही. इतकंच नाही तर मुद्दल सुध्दा द्यायला मार्केटची परिस्थिती सुधारेपर्यंत थांबाव लागेल. यामुळं गुंतवणूकदारांचं धाबं दणाणतं. वाटाघाटी होतात, प्रश्न काही सुटत नाही. कसा सुटणार ? तो रिअल इस्टेट वाल्यानं मुद्दाम तयार केलेला असतो. वादावादी वाढते. दिवाणी कोर्टात जावं तर बरीच वर्ष लागतील म्हणून पोलीसात जातात. पोलीस स्टेशनला रिअल इस्टेटवाला कबूल करतो की अमूक वर्षांपूर्वी अमूक रोख रक्कम कच्च्या कागदावर लिहून घेतली होती. त्याचबरोबर प्रत्येक गुंतवणूकदाराला दरमहा दिलेल्या व्याजाची यादी देतो. गुंतवणूकदारांच्या आश्चर्याला तेंव्हा पारावार राहात नाही जेंव्हा त्यांना समजतं की व्याजाची रक्कम जवळपास मुदलाएवढी झालेली असते. पोलीसांकडील जबाबात हे नमूद केलं जातं. खोट्या नम्रतेने आपण प्रामाणिक आहोत आणि मार्केट डाऊन असल्यानं हतबल असल्याचं रिअलइस्टेटवाला सांगतो. त्यावेळी समजून जायचं की पैसे घेताना मुदलाएवढं व्याज देऊन झालं की हात वर करायचे हे ठरवूनच रिअल इस्टेट वाल्यानं व्यवहार केलेला आणि प्रत्यक्षात कुठलंही व्याज न देता तीन चार वर्षे गुंतवणूकदारांचे पैसे वापरलेले असतात. गुंतवणूकदारांची फक्त मुदलावरंच बोळवणं होते.
पैसे तात्पुरते उसणे दिलेल्या नातेवाईक किंवा मित्रांनी ऐनवेळी धोका दिला तर आपल्या पैशांवर त्यांना मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. या उलट उत्पन्न तुलनेनं कमी असलं तरी आहे त्याचा पुरेपुर उपयोग करणारे काहीजण असतात. वेळोवेळी देश विदेशात पर्यटन करणारे. कुटुंबासोबत सणासुदीला एकत्र राहणारे सदैव पैसे मिळवण्यात व्यग्र राहात नाहीत. आयुष्यातले छोटे छोटे आनंद वेचण्याची मजा घेतात. खऱ्या अर्थानं पैसा त्यांचा असतो.
मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. पैसे कमावणं हे जुगाराच्या आहारी गेल्यासारखं होऊन बसतं. आजच्या समाजव्यवस्थेमध्ये पैसे हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं महत्वाचं एकक झालं आहे. पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येकाची कामं आणि त्याबाबत मिळणारा मोबदला परंपरागत रितीने ठरलेला होता. परस्परावलंबी असल्याने कुणाकडे किती द्रव्यसंचय व्हावा याला मर्यादा होत्या. सततच्या युध्दांमुळं शांततेचा अभाव, करांचा बोजा आणि स्थावर मालमत्तेच्या मालकीबद्दलची संदिग्धता असल्याने फक्त व्यापारीवर्ग चोरुन लपवून थोडेफार पैसे बाळगून असायचा. त्यांच्यापुढेही पैशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होता. चोर लुटारुंची नेहमीची भिती आणि त्यांच्यापासून वाचवला तरी तात्कालीन राज्यकर्त्यांपासून धोका होताच. त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणावर द्रव्यसंचय होण्याची परिस्थिती नव्हती. सध्याच्या समाज व अर्थव्यवस्थेत या सर्व समस्यांवर खुबीनं मात करण्यात आली. त्यामुळं जगण्यासाठी पैसा हे सूत्र दुर्देवानं मागं पडलं व पैशाकरीता जगणं सुरु झालं. आनंदी जिवन जगण्यासाठी संतुलन आवश्यक आहे. ते ज्यांना साधलं ते नशिबवान.
प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा काॅईनबाॅक्स पॅटर्नवर बेतलेल्या असतात. नाणं टाकल्याशिवाय पूर्वी टेलिफोन लागत नसत तशा. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुध्दा पैशाशी निगडीत असतात. या गरजा पुरविण्यासाठी बचत फार आवश्यक ठरते. मुलांच्या शिक्षणाबाबत सुरुवातीपासूनच फार जागरुक राहायला लागतं. चांगल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण देणं क्रमप्राप्त ठरतं. कुणी काहीही म्हणो परंतु चांगलं शिक्षण नसेल तर चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. तीच परिस्थिती आरोग्यसेवांची आहे. कोरोना महामारीच्या काळात याची सर्वांना चांगलीच जाणीव झाली. आरामदायी जिवनशैली, व्यायामाचा अभाव, नोकरी व्यवसायाच्या मागे लागल्यामुळे प्रकृतीची हेळसांड झाल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर मृत्युच्या थैमानामुळं सर्वांचंच धाबं दणाणलं होतं.
फॅमिली डॅाक्टर ही संस्था आता वैद्यकीय व्यवसायातल्या वेगवेगळ्या विशेष तज्ञांमुळे जवळ जवळ लयास गेली आहे. रुग्णाची स्टेथेस्कोप लावून तपासणी आणि लक्षणांबाबत विचारपूस करुन रोगनिदान जवळ जवळ कालबाह्य झालं आहे. डॅाक्टर थोडा नावारुपाला आला की ज्युनिअर डॅाक्टर्स सोबत ठेवतो. पेशंटच्या रोगाबद्दल व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल हे ज्युनिअर डॅाक्टर्स पेपर्स तयार करुन ठेवतात. मग एकामागोमाग एक पेशंट नामवंत डॅाक्टरांच्यापुढे पाठवले जातात. एक किंवा दोनच मिनिटात फॅार्म बघून गोळ्याऔषधांचं प्रिस्क्रिप्शन सांगितलं जातं. गमतीची गोष्ट अशी की पेशंटशी हे निष्णात डॅाक्टर कधी कधी डायरेक्ट बोलत सुध्दा नाहीत. किमान रक्त व मूत्र तपासणी केल्याशिवाय रोगनिदान केलं जात नाही. क्लिनिक, लॅब्ज, डायग्नोस्टिक सेंटर्स आरोग्यविमा कंपन्या व औषध कंपन��याच्या साट्यालोट्यात रुग्णांची ससेहोलपट व पिळवणूक होते. आंतररुग्णांसाठी तर आरोग्यविमा ही अत्यावश्यक गरजच झाली आहे. कधी कधी जेवढा विमा मोठा तेवढ्या वेगवेगळ्या तज्ञ डॅाक्टरांच्या भेटी जास्त आणि करायच्या टेस्ट्सची संख्या मोठी. विम्याच्या देय पैशांइतका आंतररुग्णाचा रुग्णालयातला मुक्काम वाढतो. बेजार झालेल्या नातेवाईकांना रोगनिदाना बद्दल काही शंकासुध्दा घेता येत नाही कारण सगळे रिपोर्ट हे पुरावे असतात. तसं पाहिलं तर विशिष्ट वयानंतर शरीरातल्या व्याधी शोधायच्याच म्हटलं तर ते काही फार अवघड काम नाही.
दैनंदिन गरजांचा विचार करता पूर्वी सामानाची यादी करून वाण्याकडे दिली की किराणा भरला जायचा. आता कुणी याद्या वगैरे तयार करायच्या भानगडीत पडत नाही. मॅालमध्ये बास्केट किंवा ट्रॅाली फिरवत कशावर काय फ्री, किती सूट हे बघायचं आणि आवश्यक वस्तूंबरोबर गरज नसलेल्या वस्तूंचं शाॅपींग करायचं. मॅालवाले ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन भुलभुलैय्ये तयार करतात व ग्राहकांना भुरळ पडेल अशी वस्तूंची मांडणी करुन ठेवतात. सरकत्या जिन्यांवरुन चढताच अवतीभोवती सगळ्या वस्तू आकर्षक पध्दतीने लावलेल्या दिसतात. ज्या वस्तूंच्या किमती बद्दल गृहिणी जागरुक असतात अशा वस्तूंचे भाव कमी ठेवले जातात व त्यांच्यावर आणखी सवलती, छोट्यामोठ्या वस्तू फ्री देऊ केल्या जातात. मोठे दुकानदार आपला नफा ग्राहकांना किमतीचा अंदाज नसलेल्या इतर आकर्षक वस्तू व ब्रॅंडच्या माध्यमातून वसूल करतात.
असो... शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजा भागविताना येणाऱ्या समस्या बचतीच्या पैशामुळं पूर्णपणे सुटल्या जरी नाहीत तरी सुसह्य होतात.
गुंतवणूकीत एक्झिट पाॅलीसी, म्हणजे कधी बाहेर पडायचं याची वेळ महत्वाची असतं. आधी म्हटल्याप्रमाणे अर्थविषयक जागरुकता व नियोजन या दोन्ही गोष्टींकडे बहुतेकांचं सर्रासपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. कोणत्या ठेवी कधी परिपक्व होतात, किती व्याज मिळालं, व्याज योग्यरित्या आकारुन दिलं आहे का या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. योग्यप्रकारे पाठपुरावा न केल्यानं ठेवींना बॅंक आपोआप मुदतवाढ देते. प्रथमदर्शनी व्याज बुडाले नाही तरी त्याला तसा फार अर्थ नसतो. एखाद्या ठेवीची मुदत संपताच रोखीकरण करून गुंतवणूक विश्राम घेणं बरं. त्या व्यवहारात मिळालेले व्याज किंवा झालेला नफा आपल्या कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकणं योग्य. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. बचतीच्या बाबतीत असं म्हणतात की खर्चकरून शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे बचत असं न समजता आधी बचत किती करता येईल हे पाहावं व तेवढी बचत करायचं नियोजन करून शिल्लक राहिलेले पैसे खर्च करावेत. मिळकत वृध्दीच्या प्रमाणात बचतीची टक्केवारी तसं पाहिलं तर वाढायला पाहिजे. परंतु तसं नेहमी होत नाही. कित्येकवेळा या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबूनही राहात नाहीत. त्यामुळे बचतीसाठी काटकसर, साधी राहाणी हाच पर्याय आपल्यासमोर शिल्लक राहातो.
बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या लिखाणात क्रेडिटर्सच्या म्हणजे पैसे उधारीनं देणाऱ्यांच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. पैसे उधार देणारी माणसं ज्याला पैसे दिलेले असतात त्याच्या राहणीमानाकडे कायम लक्ष ठेऊन असतात. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तूपेक्षा महागडी वस्तू कर्जदाराने घेतल्याचं उधार देणाऱ्याच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या दारात, आपले ठरलेल्या व्याजासह पैसे परत मागायला आलाच म्हणून समजा. कर्जदार जर मेहनत करताना आढळला तर तोच उधार देणारा शाश्वत होऊन आपल्या पैशांबाबत निश्चींत राहातो. कुणाकडून कर्ज घेतलं तर आपल्याकडे पैसे येताच जेवढे शक्य असतील तेवढे परत करावेत. पैसे कमी आहेत म्हणून कसे द्यावे असा संकोच करू नये. उधार देणारा त्याला योग्य प्रकारे आग्रह केल्यास ते स्विकारतो. थोडं थोडं करून कर्ज उतरवित जावं असा मोलाचा सल्ला बेंजामिन फ्रॅंक्लिन यांनी देऊन ठेवला आहे.
इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थाॅट या तत्वज्ञानात मानलं जातं. अस्तित्व, सत्य आणि ज्ञान या त्रिसूत्रीशी निगडीत अध्यात्माचा शोध घेण्याची एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिका व ब्रिटनमध्ये एक चळवळ सुरु झाली. राल्फ वाल्डो इमरसन यांच्या अच्च्युतम व अलौकिक अनुभवाच्या तत्वज्ञानाचा या चळवळीवर प्रभाव आहे. शारिरीक व मानसिक व्याधींची उत्पत्ती आधी मनात होते त्यामुळे सकारात्मक विचार मनात आणले तर यावर मन:शक्तीने मात करता येऊ शकते असं ही विचारधारा म्हणते. ख्रिस्ती विचारसरणी वर बेतलेली असली तरी वेगवेगळ्या अतिप्राचीन विचारांची एकत्र मोट बांधून न्यू थाॅट तयार झाल्याचं दिसतं. ध्यान, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि जे मिळेल त्याच्याबद्दल कृतज्ञता असेल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्राप्त होऊ शकतात असंही या विचारसरणीत सांगितलं आहे. वॅलेस डी वॅटल यांचं "सायन्स ॲाफ गेटींग रिच" (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं "द सिक्रेट" ही दोन पुस्तकं न्यू थाॅट विचारसरणीवर आधारीत आहेत.
गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. सिकटा पटी या लेखिकेनं पायोनियर या वर्तमानपत्रातील गरीबीच्या उदात्ती करणाची मिमांसा करताना लिहिलं होतं की भारतात चांगलं विरुध्द वाईट या अनुभूतींशी गरीबी श्रीमंती विनाकारण जोडले गेले आहेत. पौराणिक कथा, रामायण- महाभारतातले प्रसंग आणि हल्ली सिनेमातून दाखवण्यात येणाऱ्या महिलांच्या व्यक्तिरेखा या ध्रुविकरणाला जबाबदार असाव्यात. कुटंबासाठी कष्ट उपसून मुलांना नावारुपाला आणणारी महिला साध्या कपड्यात, साध्या राहणीमानाने त्यांना नितीमत्तेचे, परोपकाराचे आणि चांगुलपणाचे धडे देत मोठं करते. शेवटी तिचा विजय होतो आणि वार्धक्यात ती सुखी होते. या उलट श्रीमंत महिलेची पाश्चिमात्य वेषभूषा, लाईफस्टाईल, घमेंडी स्वभाव आणि आरामदायी सुखसोयींचा उपभोग घेणारी प्रतिमा दाखवली जाते. गरिबी म्हणजे प्रामाणिकपणा, साधेपणा, त्याग तर श्रीमंती म्हणजे अप्रामाणिकपणा, लोकांचे शोषण आणि गर्व असं दाखवलं जातं. प्रामाणिकपणे कामधंदा करून श्रीमंत होताच येत नाही अशी लोकांची धारणा करुन देण्यात आली आहे. एक योगिनी तर दुसरी भोगिनी. असं चित्रण केल्यामुळे काळ्या पांढऱ्यांमधल्या विविध छटा स्पष्टपणे दिसतंच नाहीत. श्रीमंतीतली माणसं प्रामाणिक, दयाळू आणि पापभिरू तर गरिबीतली माणसं क्रूर, अनैतिक आणि बेईमान असंही असू शकत हे आपल्या सहजासहजी पचनी पडत नाही. गरीबीतून सगळा समाजंच बाहेर काढणं हे राष्ट्रांचं धेय्य असायला हवं. विकसीत राष्ट्रांमध्ये ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात वास्तवात आल्याचं दिसतं.
कोडिपेंडन्सी
कर्तृत्ववान माणूस सेंच्युरी मिल्स च्या लोगो मधल्या हर्क्युलस सारखा दिसतो. जणू खो-खो खेळायला बसला आहे. दोन्ही हातांनी पृथ्वीगोल मानेवर तोलून धरलेला आणि त्यामुळे सदैव सतर्क राहून जणू खो ची वाट पाहाणारा. गोदीतली वॅगन खाली करणाऱ्या माथाडी कामगारासारखा पाठीवर लादलेल्या जबाबद���ऱ्यांच्या ओझ्यांमुळे झुकलेला. हाच तो कोडिपेन्डन्ट. मराठी भाषेत याला काय शब्द आहे ते माहित नाही परंतु या लेखापुरतं को-डिपेन्डन्टला आपण हर्क्युलस म्हणू.
को-डिपेन्डन्सी हा गेल्या काही वर्षात इंग्रजी भाषेत प्रचलित झालेला शब्द आणि मानसिक आजार आहे. आपल्या माणसांना म्हणजे लाभार्थीना गरज असो वा नसो त्यांना सदैव मदत करणारा. त्यांच्या विचित्र, बेजाबदार आणि हेकट वागण्यापुढे मान तुकवून त्यांची काळजी घेणारा, आपल्या वैयक्तिक गरजा, आनंद इत्यादि बाबी गौण माननारा, सदैव आपल्या माणसांना वाचवणारा त्यांच्यासाठी लढणारा ग्लॅडिएटर ही को-डिपेन्डन्टची म्हणजे आपल्या हर्क्युलसची स्वप्रतिमा असते. या इमेजमध्ये तो दंग आणि खुष असतो. इतका की एखाद्या जुगाऱ्यासारखा आपल्या माणसांना मदत करणं हे व्यसन होऊन बसतं. चुकून कुणाला नाही म्हणायची जर वेळ आली तर त्याला ओशाळल्यासारखं व्हायला लागतं.
खेडेगावी एक साधा पत्यांचा जुगार चालायचा. दोन प्रतिस्पर्धी समोरा समोर बसायचे. एकजण पत्ते पिसायचा व दुसरा बोली लावायचा. समजा बोली लावली की कोणताही गुलाम पत्ता ज्याच्याकडे पहिला येईल तो जिंकला... आणि यावर एक रुपयाची बोली. पत्ते पिसणाऱ्याने बोली स्विकारली की दोेघे एक एक रुपया टेबल टाकायचे. मग पत्ते पिसणारा एक समोरच्याकडे आणि दुसरा स्वत:कडे असे पत्ते उघड करायचा. ज्याच्याकडे गुलाम पत्ता पहिल्यांदा येईल तो डाव जिंकायचा. मग पुढची बोली आणि पुढचा डाव. पत्त्याचा हा जुगार खेळणारे जरी दोघे असले तरी भोवती कोंडाळं करुन पहाणारे दहाबारा असायचे. मग अवती भोवतीचे पाहणारे त्याच डावावर जोड्या करुन पाच-दहा पैशांच्या लहान लहान पैजा लावायचे. अशा प्रकारे हर्क्युलसच्या डावावर अवलंबून राहणारी बरीच माणसं त्याचं कौशल्य गृहित धरु लागतात आणि आपल्या पैजा हर्क्युलस जिंकून देईल या विश्वासावर निर्धास्त जगतात. हर्क्युलसला मानसिक त्रास होईल, समाजामध्ये त्याची पत घसरेल, त्यांच्यावतीने इतरांना विनंत्या करताना त्याला ओशाळल्यासारखं होईल याचीसुध्दा काहींना फिकीर नसते. हर्क्युलसनं दहा पैजा जिंकल्या आणि अकरावी मोठी पैज हरला तर त्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात.
को-डिपेन्ड्न्सी हे व्यसन प्रयत्नपूर्वक संपवणं महत्वाचं आहे. कोणत्याही नात्यामध्ये सकारात्मक देव-घेव असणं नात्याला पोषक असतं. ज्यावेळी एकतर्फी आवक बारनिशी चालू होते त्यावेळी आपल्यातल्या ग्लॅडिएटरला थोडा आवर घालणं गरजेचं ठरतं. इतरांचे प्रश्न आपण तयार केलेले नसतात, त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं आणि ते सोडवणं नेहमीच काही शक्य नसतं. नेहमीच जिंकून देऊ न शकल्यानं येणारी गिल्ट प्रयत्नपूर्वक संपवावी, कोणत्या रास्त गोष्टींबाबत मदत करू शकतो आणि कोणत्या नाही याची सीमारेषा स्पष्ट करावी, आपल्या सौख्याला प्राथमिकता देण्यामध्ये काही गैर नाही ही भावना जोपासणं गरजेचं ठरतं.
त्यांनी “ मी लाभार्थी” नाही म्हटले तरी फारसा फरक पडू नये. दातृत्वाचा मूलभूत नियम आहे की देणाऱ्याने कुवतीपेक्षा थोडं जास्त द्यावं आणि घेणाऱ्यानं गरजेपेक्षा कृतज्ञतापूर्वक थोडं कमी घ्यावं. जिथं घेणारा हा नियम मोडेल तिथं देणाऱ्यानं भविष्यातलं देण्याघेण्याचा विषय संपवावा.
नात्यागोत्यांच्या बाबतीत आतापर्यंत सांगेन तिथं कडाडून विरोध होतो अशी माझी एक पक्की धारणा आहे. ती म्हणजे आपल्यावर सदैव निस्पृह प्रेम करणारी नाती दोनचं- आई आणि मुलगी- बाकीं नात्यांमध्ये काहीना काही स्वार्थ दडलेला असतो. आईकडे हवंतेवढं लक्ष न देणारा मी अपराधी आहे. त्यामुळं मुलांनी माझी अपेक्षेएवढी काळजी घेतली नाही तरी तक्रार करणार नाही असं ठरवतो आहे.
पोलीसींगच्या बाबतीत इतक्या वर्षांच्या नोकरीनंतर सुपरकाॅप, गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे फिक्शन असतं असं माझं मत आहे. पोलीस दलामध्ये सिनेमाच्या लार्जर दॅन लाईफ व्हायरस पासून जे स्वत:ला दूर ठेवतात, यशाचं श्रेय सहकाऱ्यांना देतात आणि तत्वज्ञान हा फक्त विद्यापीठातच शिकवायचा विषय आहे अशी ज्यांची धारणा असते अशीच माणसं नेतृत्व देतात. खोटं वाटत असेल तर ब्रिटीश फिल्ड मार्शल माँटगोमेरी यांचं लिडरशीप हे पुस्तक वाचावं.
पोलीसासारखी इंटरेस्टिंग दुसरी नोकरी नाही. खात्यात आल्यापासून नोकरीबद्दला कधीही पश्चाताप झाला नाही. उलट कित्येक वेळा वाटायचं, खरंच आपण गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्यकर्म केलं असावं. काही सहकाऱ्यांना पोलीस विभागाबद्दल नाराजीचा सूर लावताना आणि स्वत:वर कसा नेहमी अन्याय होत आला याचा पाढा वाचताना पाहतो तेंव्हा मला आश्चर्य वाटतं की हे असं का बोलत आहेत? कितीही खडतर पोस्टींगवर काम करायची वेळ आली तरी तिथंही असेच उल्हासाने काम करणारे सहकारी मिळतातंच. त्यामुळं पोलीसींग एन्जाय करायला शिकलो. पोलीस स्टेशन म्हटलं की तिथं समाजात घडणाऱ्या वाईटसाईटाचं रिपोर्टिंग होणारंच. कायदा सुव्यवस्थेचे मोठमोठे प्रश्न निर्माण होणारंच आणि त्यामुळे कधी काळी आपल्याला शारीरिक इजा किंवा मानसिक त्रास होईल असं वाटलं तरी योग्य प्रकारे तयारी करुन दोन हात केले तर तसा काही धोका वगैरे होत नाही असं मला जाणवलं आहे. या गोष्टींकडे आपल्यावर आलेली संकट म्हणून न बघता दैनंदिन पोलीसींगचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलं तर त्रास होत नाही.
सेवानिवृत्तीची आतापर्यंत ऐेकलेली भाषणं आठवता सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा कंठ दाटून येणं, डोळ्यांत टचकन पाणी येणं या गोष्टी होताना पाहिल्या आहेत. आपल्या बाबतीतही असं काही होणार नाही याचा भरवसा नसल्यामुळं हे सगळं लिहून ठेवावं असं मनात आलं.
जयंत नाईकनवरे. (९८९२००२५००)
३० डिसेंबर, २०२३
1 note · View note
Video
आरक्षणाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया.. #ajitpawar #manojjarange...
0 notes
news-34 · 10 months
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन
https://bharatlive.news/?p=188703 धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर ...
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
निवडणूक नसताना जनहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी कसे वागले ? , नगर चौफेर एक्सक्लुसिव्ह
निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे मतांसाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आणि उमेदवार इतर वेळी आपल्या मतदारांसोबत आणि नागरिकांसोबत कशा स्वरूपाचे वर्तन करतात याच्यासाठी नगर चौफेर न्यूज प्रतिनिधीकडून परिसरातील लोकप्रतिनिधींना संपर्क करून एक रिपोर्ट बनवण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन लोकप्रतिनिधींकडे उपस्थित केलेला विषय लोकहिताचा असून या प्रश्नावर लोकप्रतिनिधी यांचे वर्तन आपल्याला कितपत योग्य वाटते याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 1 year
Text
--II ● विवेक विचार ● II--
केवळ शारीरिक साहाय्य करून लोकांच्या दुःखांचा नायनाट करणे अशक्य आहे. जोपर्यंत माणसांची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे सारे शारीरिक अभाव उद्भवणारच, सारे कष्ट होणारच. दुनियेतील या दुःखांच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा म्हणजे अखिल मानवजातीला पवित्र बनवणे, सक्षम, सा़क्षर, आत्मनिर्भर, अध्यात्मिक बलसंपन्न, सामर्थ्यशाली बनवणे, स्वतःच्या पायावर उभे करणे तरच जगातून दुःख नाहीसे होईल. देशातील प्रत्येक घर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
कृषीमंत्र्यांनी मागितली शेतक-यांची जाहीर माफी
Tumblr media
सिल्लोड : शेतमालाला भाव नाही, खतं खरेदी करताना जात टाकावी लागणं अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या राज्यातला शेतकरी सामोरा जातो आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतक-यांन मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे. सत्तार म्हणाले, नाफेडची सध्या ४० केंद्र सुरू आहेत. कांद्याला सध्या नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. रासायनिक खतं खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये शेतक-यांना जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही. हा मुद्दा काल अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. त्यावरुन चर्चाही झाली. आपण याबद्दल केंद्र सरकारला कळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याच मुद्यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, खत खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतक-यांची माफी मागताना सत्तार म्हणाले, ‘शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतक-यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल.' Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त देशभरात सर्वत्र आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संत कबीर आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातलं हातमाग क्षेत्राचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
****
महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात बहुराज्यीय सहकारी संस्थांकडून, पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा, मुद्दा काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत उपस्थित केला. मराठवाड्यात बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी, कामगार, मजूर तसंच गरीब आणि ज्येष्ठांकडून अनेक बहुराज्यीय सहकारी संस्थांमध्ये पैसे गुंतवण्यात आले, मात्र या संस्था बंद पडल्यानं, खातेदार आणि ठेवेदार अडचणीत सापडले आहेत. या कंपन्या बहुराज्यीय असल्यानं राज्य सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याचं सांगत, या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी रजनी पाटील यांनी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असं आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणना करणं आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे ही आरक्षणा संबंधीची काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन लाख ८७ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी दोन लाख ७६ हजार ९४१ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, १४ हजार ७२६ अर्ज तात्पुरते बाद झाले आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव ओबीसी यात्रा काल बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथं पोहोचली. ओबीसी च्या घटकांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला प्रवर्गाला साथ द्यावी, हा प्रवर्गही तुम्हाला साथ देईल, त्यामुळे आरक्षणाला धोका निर्माण होणार नाही, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
6nikhilum6 · 10 days
Text
Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम तोडगा काढणार - अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज –  चऱ्होली परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावठाणाबरोबरच येथे  अनेक गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या( Charholi) असून,  साधारण 20 हजार नागरिक या परिसरात वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे.  पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने…
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास वाळू मोफत
गोंदिया/भंडारा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत, मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश��नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
crime-chovis-tass · 2 years
Text
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात बोनस देऊन शासन न्याय देईल - आ. डॉ. परिणय फुके
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात बोनस देऊन शासन न्याय देईल – आ. डॉ. परिणय फुके
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक पुढाकार घेतला.. नागपूर. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. येथे खरीप आणि रब्बी हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी बियाणे, खते, औषधांच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीच्या खर्चात झालेली वाढ, डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना पिकांवर जास्त खर्च करावा लागला. याशिवाय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नावर ६ ऑक्टोबरला सुनावणी!
https://bharatlive.news/?p=149112 राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नावर ६ ऑक्टोबरला सुनावणी!
राज्याच्या ...
0 notes
kokannow · 2 years
Text
आपल्या आमदाराची चौकशी पासून सुटका होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा
आपल्या आमदाराची चौकशी पासून सुटका होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा
संविधान वाचवण्यासाठी भाजपचा मोर्चा, मग जनतेच्या प्रश्नावर लक्ष कोण देणार ?माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल कणकवली : शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी मोर्चा काढला. तर भाजपच्यावतीने संविधान वाचवण्यासाठी मोर्चा काढला जातोय. असे असताना जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारने 100 रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes