Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 August 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी देणाऱ्या, नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन योजनेला प्रारंभ
· राज्यात यंदाही दहीहंडीला परवानगी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट
· कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज- आरोग्य मंत्री राजेश टोपे
· राज्यात तीन हजार ६४३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर १५१ बाधित
· बीड जिल्ह्यातील कोट्यवधी रूपयांच्या तूर-हरभरा खरेदी घोटाळ्यातल्या सहा आरोपींना अटक
· डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्तावाढ आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आश्वासन
आणि
· टोक्यो २०२० पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धांना आजपासून सुरुवात
****
महामार्ग, रेल्वे, स्टेडियम, ऊर्जानिर्मिती आणि वितरण आदींसारखी सरकारी मालमत्ता, खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी देणाऱ्या, नॅशनल मॉनिटायजेशन पाईपलाईन - रोखीकरण योजनेचा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रारंभ केला. देशात तयार असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून, त्यातून उभी राहिलेली रक्कम नवीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. सरकारनं २०२२ ते २०२५ या चार वर्षांसाठी ही योजना तयार केली आहे. राष्ट्रीय रोखीकरण योजनेमध्ये केंद्र सरकारच्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सहा लाख कोटी रुपयांचं रोखीकरण होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
****
राज्यात यंदाही दहीहंडीला परवानगी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या ३१ तारखेला साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या अनुषंगानं, मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी, आपण सण - वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊन मानवता दाखवू, आणि कोरोनाला हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्रानं जगाला द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडी ऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणार असल्याचं मत व्यक्त केलं.
****
केंद्र सरकारनं सुवर्ण अलंकारांसाठी सक्ती केलेल्या एचयुआयडी अर्थात 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट'च्या विरोधात, काल राज्यातल्या सराफा व्यावसायिकांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पाळला. एचयुआयडी ही प्रक्रिया जाचक असून यामुळे सराफा व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे, असा आरोप सराफा व्यावसायिकांनी केला आहे. औरंगाबासह मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सराफा व्यावसायिक या संपात सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातल्या ४५० सह जिल्ह्यातले १५०० सराफा व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असून, सध्या तरी या लाटेचा धोका नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिल्कमिल कॉलनी इथल्या आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअं��र्गत पहिल्या डिजिटल एक्सरे मशीनचं लोकार्पण आरोग्य मंत्री टोपे यांच्या हस्ते झालं, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कोरोना प्रतिबंधासाठी औषधी आणि लसीकरणाचं नियोजन सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात काळजी करण्याचं कारण नसल्याचं, ते म्हणाले. राज्यात लवकरच आरोग्य कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी नमूद केलं.
****
राज्यात काल तीन हजार ६४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख २८ हजार २९४ झाली आहे. काल १०५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३६ हजार ६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल ६ हजार ७९५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ३८ हजार ७९४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पुर्णांक ०५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या ५० हजारापेक्षा कमी झाली असून, सध्या राज्यभरात ४९ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १५१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७६ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ५५, औरंगाबाद दहा, लातूर नऊ, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. जालना, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
हिंगोली जिल्ह्याची कोविडमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपैकी नऊ दिवसांत जिल्ह्यात एकही नवा कोविडबाधित रुग्ण आढळला नाही. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हा ॲक्टीव्ह रूग्णांचा सर्वात कमी आकडा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६,०२२ रुग्ण झाले असून, १५,६२८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता केवळ दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या १५ दिवसांपैकी नऊ दिवसांमधे एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली
****
बीड जिल्ह्यात दोन वर्षापूर्वीच्या कोट्यवधी रूपयांच्या तूर-हरभरा खरेदी घोटाळ्यातल्या सहा आरोपींना, आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेनं, पणन महासंघाच्या वतीनं, जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी करून त्याची रक्कम उचलली. मात्र महासंघाला सदर माल न देताच कोट्यवधी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर एप्रिल २०१९ मध्ये, बीड जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्थेचे संचालक, तीन खरेदी केंद्र प्रमुख आणि तीन ऑपरेटर यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावेळी फक्त चाँदसाहेब हसनभाई बागवान या एकाच आरोपीला अटक करण्यात आली होती. काल आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातले १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची गुणवत्तावाढ आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगानं, जीवनसाधना पुरस्कार काल डॉ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश दापके, आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी कार्यरत राहिलेले, मोहम्मद अब्दुल रज्जाक मोहम्मद अब्दुल जब्बार, यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन कार्यरत राहील अशी ग्वाही डॉ. कराड यांनी यावेळी दिली. ते म्हणाले –
जिथं जिथं आडेल तिथ राजकारण बाजुला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी, त्यांचं स्टॅण्डर्ड वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी राज्यशासन तर देईलचं आपल्याला, पण केंद्र शासनाचा भरीव निधी या विद्यापीठासाठी देईल.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला बजाज कंपनीकडून कोविशिल्ड लसीचा एक लाख १२ हजार ५०० एवढा साठा देण्यात आला आहे. तर महानगरपालिकेकडे शासनाकडून मिळालेल्या ३१ हजार कोविशिल्ड, तर दोन हजार कोवॅक्सिन लस शिल्लक आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून खऱ्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षानं, ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान', हा उपक्रम सुरू केला असून, आज नांदेड इथं या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण काल बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा या कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
****
टोक्यो २०२० पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना ‘आम्हाला पंख आहेत’ अशी आहे. या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत.
****
हवामान
गेल्या चोवीस तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोकण आणि मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes