Tumgik
#होळी भारतीय
airnews-arngbad · 6 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२५ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मध्य प्रदेशात उज्जैन इथल्या महाकाल मंदीराच्या गाभार्यात आज सकाळी भस्म आरती दरम्यान आग लागली. या दुर्घटनेत मंदीराच्या पुजार्यांसह १२ जण जखमी झाले. त्यांना उज्जैन इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, देवदर्शन पुन्हा सुरु झालं आहे. जिल्हाधिकार्यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून माहिती घेतली.
****
रंगांची उधळण करणारा धुळवडीचा सण आज सर्वत्र हर्षोल्हासात साजरा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वागद ईजरा इथं गोरमाटी गाण्याच्या ठेक्‍यावर लेंगी नृत्याद्वारे होळी साजरी करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं पाच हजार १०० शेणपोळ्यांनी होळी सजवण्यात आली आणि त्यावर शुद्ध शेणापासून बनवलेल्या आकर्षक सजावटीसह होलिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काल रात्री हा होलिका दहन सोहळा पार पडला.
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी बांधवांनी बुध्या, बावा आणि मोरख्याचा खास पारंपारीक वेश परिधान करुन नृत्य सादर केलं.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल लेहमध्ये सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळेच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. कर्तव्य पालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटंबाचा भाग आहेत, असं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय भांडवल बाजारात परदेशी गुंतवणुकदारांच्या गुंतवणूकीत या महिन्यात लक्षणीय वाढ दिसून आली. फेब्रुवारीत एक हजार ५३९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर, या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये ३८ हजार कोटींची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. जागतिक बाजारातली सुधारणा आणि भारतातल्या व्यापक आर्थिक सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा कल भारतात गुंतवणूक करण्याकडे असल्याचं दिसत आहे.
****
भारतीय नौदलाने पकडलेल्या ३५ सोमालियन चाच्यांना मुंबई न्यायालयाने काल १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमालियाच्या किनारपट्टीवर आयएनएस कोलकाताने या चाच्यांना पकडलं होतं.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद
मुंबई, दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली. राज्यपालांनी यावेळी सर्व पाहुण्या विद्यार्थ्यांना रंग लावला व सर्वांना पुरणपोळीची मेजवानी दिली. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबई येथे शिक्षण घेत असलेले दक्षिण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
‘देसी गर्ल’चं परदेशातही धम्माल होळी सेलिब्रेशन, निक- प्रियांकाचा रोमँटीक Video Viral
‘देसी गर्ल’चं परदेशातही धम्माल होळी सेलिब्रेशन, निक- प्रियांकाचा रोमँटीक Video Viral
‘देसी गर्ल’चं परदेशातही धम्माल होळी सेलिब्रेशन, निक- प्रियांकाचा रोमँटीक Video Viral ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. परदेशात राहत असलेली प्रियांका तिथेही भारतीय सण साजरे करताना दिसते. आताही प्रियांकानं लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत होळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात प्रियांका आणि निकचा…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद
‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद
पुणे : केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी व पणन कायदे मागे घेण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कृषी कायद्यांची होळी, रास्ता रोको आणि निदर्शने करण्यात आली. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.  संयुक्त किसान मोर्चाने कृषी कायदे रद्द होण्याबरोबरच एमएसपी कायदा करावा, वीज कायदा रद्द…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
​वीजबिल संदर्भात भाजपतर्फे सोमवारी राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन कोल्हापूर​ ​: भरमसाठ आलेल्या विजबिलाने सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे  महाविकास आघाडीला जाग आणण्यासाठी तसेच विजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी दि.२३ रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे.
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी, तर काँग्रेसची तीन उमेदवारांची यादी जाहीर
राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच-महादेव जानकर यांच्याकडून स्पष्ट तर विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम
मराठा आरक्षण हे ५० टक्के मर्यादेत असल्यास स्वीकारणार-मनोज जरांगे पाटील यांची भूमिका
      आणि  
होलिकादहनानंतर आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी, तर काँग्रेसनं तीन उमेदवारांची यादी काल जाहीर केली.
भाजपनं देशभरातल्या १११ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातल्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा - गोंदिया सुनिल मेंढे आणि गडचिरोली - चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून अभिनेत्री कंगना रनौत, तर उत्तर प्रदेशात मेरठ इथून अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनंही काल तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात उमरेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
****
राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच राहणार असल्याचं, पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ते काल पुरंदर इथं कार्यकर्त्यांसोबत बैठकीनंतर बोलत होते. ग्रामीण भागात पवार कुटुंबाची दहशत मोडून काढण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसची प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रजनी पाटील, अमित देशमुख, प्रज्ञा सातव यांच्यासह ५८ सदस्यांचा या समितीत समावेश आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं रुपिंदरसिंग यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्य सरकारनं मरा��ा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण ५० टक्के आरक्षण मर्यादेत असेल, तरच स्वीकारणार असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं, काल मराठा संघटनांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. सगोसोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन लेखी हमीपत्राद्वारे देणाऱ्या उमेदवारालाच लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असं आवाहन जरांगे यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन त्यांनी केलं. कोणत्या गावातून कोणता उमेदवार द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं ते म्हणाले. आपण स्वतः मात्र निवडणूक लढवणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
****
रंगांची उधळण करत, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा धुलिवंदनाचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे.
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण लोकांच्या जीवनात सकारात्मक उत्साह निर्माण करत असल्याचं, त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत, हा रंगांचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी उर्जा आणि उत्साह आणणारा असल्याचं म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांच्या या सणानं, सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरावेत, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करावी, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हुताशनी फाल्गुनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. काल सायंकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं.
शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर काल होलिका दहन करण्यात आलं. शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात माहरि गडावर देखील काल पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी इथं कानिफनाथाच्या यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांसह विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा कालही पाळण्यात आली.
नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हुजुर साहिब गुरुद्वारा इथं धुलिवंदनानिमित्त विविध कार्यक्रमांना काल सुरुवात झाली. प्रवचन, होला मोहल्ला, हल्लाबोल आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात पारंपारिक होलिकोत्सव साजरा करतानाच, जनजागृतीचे उपक्रम अनेक ठिकाणी राबवण्यात आले. आखाडा बाळापूर इथं होळीत कोणकोणते षडविकार जाळले पाहिजेत याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. हिंगोली इथं एका युवक मंडळाने कचऱ्याची होळी पेटवून कचरा मुक्तीचा संकल्प केला.
****
ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र आठवड्याला काल पाम संडेनं प्रारंभ झाला. ईस्टर संडे आणि गुड फ्रायडे आधीचा रविवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या सप्ताहादरम्यान आज अंजिराचा सोमवार साजरा करण्यात येतो. काल ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थना घेण्यात आली, तसंच ख्रिस्ती बांधवांनी नारळाच्या झावळ्या घेत शांतता फेरी काढली.
****
जागतिक क्षयरोग दिन काल धाराशिव इथं साजरा झाला. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली. पाच नि:क्षय मित्र तयार करून फूड बास्केट वाटप करण्यात आलं. सास्तुर ग्रामीण रुग्णालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. पोषण आहारासाठी नि:क्षयमित्र योजनेच्या प्रतिसादाबद्दल प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी समाधान व्यक्त केलं. ज���ञान प्रबोधिनी संस्थेचे प्रतिनिधी सुहास फाटक यांनी क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी जनजागृती करून ४५ हजार रुपये देणगी रुग्ण कल्याण समितीला सुपूर्द केली, त्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यात जवळपास ६२ रुग्णांना पोषण आहार किट देता आल्या, या रुग्णांच्या तब्येतीत यामुळे सुधारणा होत असल्याचं, रमाकांत जोशी यांनी सांगितलं.
****
सांगली इथं काल सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीच्या तमाशातील गण, गवळण, लावण्या, छक्कड आणि वगनाट्य यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचं 'उत्तरदायित्व' हे नाटक प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. या स्पर्धेचा काल छत्रपती संभाजीनगर इथं समारोप झाला. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांना राज्य शासनाचा बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्या निमित्तानं ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते काल नांदेड इथं फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी ईबितदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानिमित्त महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे सदाशिव बेडगे आणि पदाधिकाऱ्यांनी काल त्यांचा सत्कार केला.
****
परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी- प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात येत आहे.
****
लातूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या मुसळधार अवकाळी पावसामुळे लातूर शहरातलया अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं. लातूर शहरात सुरु असलेल्या सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेतही वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे यात्रेकरूंसह व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे सिद्धेश्वर यात्रेत काल होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धा आज होणार असल्याचं मंदिर प्रशासनानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरातल्या तीन मालमत्तांवर काल मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाई केली. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा सहा धावांनी तर राजस्थान रॉयल्स संघाने लखनऊ सुपर जायंटस् संघाचा २१ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न करुण पाक मीडियाने लायकी दाखवली .
कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न करुण पाक मीडियाने लायकी दाखवली ., पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.  कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले. कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे बाहेर थांबले होते. याचदरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना अपमास्पद प्रश्न विचारले. गुन्हेगार मुलाला भेटून आनंद झाला का? अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? तुमच्या पतीने हजारो निष्पाप पाकिस्तांनी लोकांच्या रक्ताने होळी खेळली आहे, याबद्दल काय सांगालं? आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?' , असे प्रश्न पाकिस्तानच्या माध्यमांनी विचारले. इस्लामाबादमध्ये  पाक उच्चायुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची काचेच्या भिंतीआडून भेट झाली होती. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी आणि आई शिपिंग कंटेनरमधून बाहेर पडताच पाकिस्तानी मीडियानं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पाकिस्तानी पत्रकार त्यांना ओरडून ओरडून प्रश्न विचारत होते. 'या भेटीवर समाधानी आहात का? तुमच्या पतीने हजारो पाकिस्तानी नागरिकांना ठार मारलं, त्यावर तुमचं काय मत आहे?,' असे प्रश्न पाकिस्तानी पत्रकारांनी जाधव यांच्या पत्नीला केले. जाधव यांच्या आईलाही असेच अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. कुलभूषणच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीही कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले. पत्नी अनवाणी परतली भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.,,http://www.maharashtracitynews.com/pak-media-showed-aptitude-for-the-humiliating-questions-of-kulbhushan-family/
0 notes
thanevarta-blog · 7 years
Photo
Tumblr media
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अबु आझमी आणि वारीस पठाण यांच्या प्रतिमांची होळी वंदे मातरम् च्या विरोधात समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि एमआयएमचे वारीस पठाण ��ांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांच्या प्रतिमांची होळी करण्यात आली.
0 notes
webmaharashtra-blog · 8 years
Text
गुगल डुडलची देखील अनोखी होळी
गुगल डुडलची देखील अनोखी होळी
देशभरात काल होळीचा उत्सव साजरा झाल्यानंतर आज रंगपचमी म्हणजे धुळवड सगळीकडे आनंदात साजरी होणार आहे. अनेक जण वेगवेगळ्या होळीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. देशभरात साज-या होणा-या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे राहिलं असतं तर नवलच म्हणायचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
“Happy & Colorful Holi…!!!”                                                                                  #होळी                  संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "#होळी_पौर्णिमा" असेही संबोधले जाते. #होलिकोत्सव, #धूलिकोत्सव आणि #रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व #रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक #लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला"#होलिकादहन" किंवा "होळी", "#शिमगा", "#हुताशनी_महोत्सव","#दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "#फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमना निमित्त"#वसंतागमनोत्सव" किंवा "#वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा .           महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीचे महत्त्व होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.                    होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात.ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते. भारतीय होळीचे ऐतिहासिक चित्र लहान मुलांना पीडा देणाऱ्या"होलिका","ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीच ाश्रीविष्णूदेवाने वध केला होता. होलिकेलावर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.           आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव"धूळवडआणि "रंगोत्सव"रंगपंचमीहे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने"शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.                   कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव कोकणात विशेषतः रत्नागिरीजिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.पालखी व मुख्य #विधी यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात ,व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग #होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात.गार्हाणे, खुणा काढणेदुसर्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.त्यानंतर तिसर्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा #कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.समारोप त्यानंतर #सत्यनारायणपूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हालोक नृत्यप्रकारअसतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या #गोंधळ घालून होते. रंगपंचमीफाल्गुन कृष्ण पंचमी यातिथीला रंगपंचमीहा सण साजरा केला जातो.धुलीवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. #होळी #Holi #होळी_पौर्णिमा" #Holi_Pornima #होलिकोत्सव #Holikostov #धूलिकोत्सव #Dhulikostva #रंगोत्सव #Rangostva #रंगपंचमी #Rangpanchami #होलिकादहन" #Holikadahan #शिमगा" #Shimga "#हुताशनी_महोत्सव" #Hutashani_mahostva #वसंतोत्सव" #Vasantosva ‘#शिमगा’ #Shimga #फाल्गुनोत्सव" #Falgunostva
0 notes
amhikastkar · 4 years
Text
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी
Tumblr media
[ad_1]
परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) परभणी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीजबिलांची होळी करण्यात आली. 
महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजपचे ग्रामीण…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
भाजपच्यावतीने दोडामार्गमध्ये चिनी मालाची होळी दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी येथील बाजारपेठेत चिनी मालाची होळी करण्यात आली. यावेळी चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही करण्यात आला.
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभऱ होळीचा सण उत्साहात सुरू.
अमरावती जिल्ह्यात बस अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर २५ गंभीर जखमी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत सात जागा अपेक्षित.
आणि
आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं लखनऊ सुपर जायंटस् समोर १९४ धावांचं आव्हान.
****
आज होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा - शिमगा हा सण उत्साहात साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन साजरं होत आहे. वाईट गोष्टींचा नाश करुन चांगल्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव देशभरात साजरा होणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलीवंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो, ही प्रार्थना, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिकादहन आणि उद्याच्या धूलिवंदनानिमित्त समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमधे सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळंच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. कर्तव्यपालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
****
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त मंडळ, शिर्डीतर्फे श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर आज होळी पेटवण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्निक विधीवत पुजा केली. संस्‍थानचे अधिकारी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ आणि साईभक्‍त यावेळी मोठ्या संख्‍येनं उपस्थित होते.
****
अमरावतीहून मेळघाट मार्गे मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसच्या अपघातात आज दोन महिलांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा ते धारणी मार्गावर घाटामध्ये बसचालकाचा ताबा सुटून ही बस खोल दरीत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना सेनाडोह इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
****
उन्हाळ्यात रुग्णालयांत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातल्या रुग्णालयांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा लेखा परीक्षण आणि प्रत्यक्ष तपासणी करणं, अग्नी धोक्याचा गजर, धूर शोधक यंत्र यासह सर्व अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे, याची खात्री करणं या बाबींचा यात समावेश आहे.
****
विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे पुढची पाचशे वर्षे हे मंदिर अबाधित राहील, असं पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत आज सांगितलं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असून ते करताना बेसाल्ट दगड आणि चुन्याचा वापर केला जात आहे. या दगडाचं आयुर्मान अनेक शतकं असतं असं ते म्हणाले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासह इतर सदस्य दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज दिल्लीत झालं. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यावेळी प्रमुख उपस्थित होते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले असून ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवसस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. महायुतीमध्ये पक्षाला किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पक्षातर्फे सात जागा लढवण्याची इच्छा दर्शवण्यात आली. या बैठकीला पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आपण स्वतः निवडणुकीत सहभागी होणार नाही. कोणत्याही पक्षाचा जो उमेदवार सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याच्याकडून करारनामा घेऊन त्याला पाठिंबा द्यावा किंवा जिल्ह्यातून सर्व जाती धर्मांतून एकच उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आरक्षणाच्या मूळ ५० टक्क्यांच्या आत द्यावं. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मराठा समाजसोबत बैठक घ्यावी, उमेदवार कोण द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं जरांगे पाटील म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी-प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ३१ हजार मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण ४ हजार ८०० मतदान केंद्रं आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे 'उत्तरदायित्व' हे नाटक महावितरणच्या प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचा समारोप काल तापडिया नाट्यमंदिरात झाला. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाथ सांप्रदायातील कानिफनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून मढी इथं प्रारंभ झाला. कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. कानिफनाथांच्या मढी गडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजानं गाढवाद्वारे सामग्री आणण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढ़ी इथल्या चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटवण्यात येते. ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होईल आणि ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आज होळीपासून सुरुवात होत आहे. देशभऱातील लाखो भाविक या यात्रेत दर्शनासाठी येतात. इथं हजारो नारळांच्या समवेत विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा आजही पाळण्यात आली. भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती होती.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघानं संजू सॅमसनच्या नाबाद ८२ धावांमुळं लखनऊ सुपर जायंटस समोर २० षटकांत १९४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. जयपूर इथं सुरू या सामन्यात रियान परागनं ४३ धावा केल्या. उत्तरामध्ये थोड्यावेळापूर्वी लखनऊ सुपर जायटंस संघानं पाचव्या षटकांत तीन बाद २६ धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजेपासून मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे.
****
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी अहमदाबाद इथं आज सकाळी `ग्रीन फॉर रन` या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतल्या ४५ वर्षांवरील वयोगटात २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या पार्डी इथले भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
आज होळी अर्थात  हुताशनी  फाल्गुन पौर्णिमा - शिमगा हा सण साजरा होत आहे.आज संध्याकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन केलं जणार आहे.वाईट गोष्टींचा नाश करुन चांगल्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा,वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा  सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव उद्या देशभरात साजरा होणार  आहे.
****
राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलीवंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. परस्पर प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो, ही प्रार्थना, असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सध्या सुरु आहे.या एकंदर संणाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यालगत आलेल्या सुट्ट्यांया अनुषंगानं सर्वच ठिकाणी विविध खरेदीसाठी बाजार फुलला असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
****
प्रभु येशूशी संबंधित आणि ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र अशा आठवड्याला आज पाम संडे या दिवसानं प्रारंभ होत आहे. ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी आणि गुड फ्रायडे आधीचा हा महत्वाचा दिवस आहे. या सप्ताहादरम्यान अंजिराचा सोमवार तसंच मौदी गुरुवार याप्रमाणे  दिवस  साजरे करण्यात येतात.आज ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थना घेण्यात आली.वाशिम इथं सकाळी नऊ वाजता ख्रिस्ती समाजाच्या नागरीकांनी नारळाच्या झावळ्या घेत चर्चमधून सुरुवात करत शांतता फेरी काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
****
भारतीय नौदलानं राबवलेलं विशेष समुद्री अभियान `ऑपरेशन संकल्पनं` काल शंभर  दिवस पूर्ण केले. याअंतर्गत संकटकाळी सहाय्य आणि समुद्री क्षेत्रात महत्वपूर्ण सुरक्षा भागिदाराची भूमिका नौदलानं बजावली आहे. यादरम्यान,विविध १८ घटनांमध्ये अदनची खाडी आणि त्या नजिकचं क्षेत्र, अरबी समुद्र आणि  सोमालियाच्या  पूर्वेकडील  क्षेत्रात  समुद्री सुरक्षा अभियान चालवलं आणि  नौदलानं समस्या आणि संकटाशी सामना करत समुद्री लुटेरे,सागरी सुरक्षा आणि भारताचं  हित यासाठी  कारवाई केली. नौदलानं  हिंद महासागरात सूचनेच्या आदान-प्रदानातही या अंतर्गत सक्षम कार्य केलं.
****
लेबनानमध्ये सुरु असलेल्या विश्व टेबल टेनिस फीडर बैरूत विजेतेपद स्पर्धेत विविध गटात यश मिळवत भारतीय खेळाडूंनी आगेकुच केली असून काही प्रकारातील अंतिम फेरीत भारतीय खेळाडू समोरासमोर असणार आहेत.आज हे साम��े खेळले जाणार आहेत. संमिश्र गटाच्या अंतिम फेरीत साथियान ज्��ानशेखरन आणि मनिका बत्रा या जोडीचा सामना आकाश पाल आणि पॉयमंती बैश्य या जोडीसोबत होईल. यासह, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत   मानुष  शाह आणि मानव  ठक्कर या जोड़ीचा सामना  मुदित दानी आणि आकाश पाल  या जोडीशी होईल. तर, महिला दुहेरीत भारताच्या श्रीजा अकूला आणि दिया चितळे या जोडीचा सामना हाँगकांगच्या दू होइ केम आणि  झू चेंगझू या जोडीसोबत होणार आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या श्रीजा अकूलाचा सामना दक्षिण कोरियाच्या  सुह ह्यो वॉन सोबत होईल. तर, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात जी सत्यनचा सामना कजाकिस्तानच्या  किरिल गैरासीमेंको याच्याशी  होणार आहे.  
****
इंडियन मास्टर्स नॅशनल बैडमिंटन विजेतेपद स्पर्धेत, महाराष्ट्राची खेळाडू नाहीद दिवेचा हिनं दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. हरीयाणाच्या  पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत महिला  एकेरीच्या अंतिम लढतीत  हरियाणाच्या  सुनीता सिंह पंवारला हरवून नाहीद विजेती ठरली. यासोबतच, मिश्र दुहेरीच्या प्रकारात नाहीद दिवेचा आणि किरण मोकाडे या जोडीनं कर्नाटकच्या प्रबागरान सुब्बैयन आणि जयश्री रघू या जोडीला पराभूत करत मिश्र दुहेरीच्या किताबावर शिक्कामोर्तब केलं.
****
काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी काल आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ.नामदेव किरसान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक आणि त्यानंतर उपायुक्त म्हणून १८ वर्षे नोकरी केल्यानंतर २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्त झालेले किरसान तेंव्हापासून काँग्रेस पक्षात सक्रिय असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस दरम्यानचा सामना जयपूर इथं दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं आजचा दुसरा सामना  संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यांत पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला. तर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर चार धावांनी विजय मिळवला.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
आज असणारी होळी पौर्णिमा तसंच उद्याचं धुलिवंदन यासह सध्या सुरु असलेला पवित्र रमजानचा महिना आणि त्यासोबत आलेल्या सुट्या यामुळं सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. आजच्या हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घरोघरी पारंपारीकरित्या होलीका दहन केलं जाणार असून जागोजागी नागरीकांच्या सहभागातून सार्वजनिक होळीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे.
****
यंदा होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, असं खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
****
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
****
उन्हाच्या झळां सर्वानाच जाणवू लागल्या असून उन्हाळ्यात वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती न व्हावी या साठी वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथं प्रादेशिक जंगलामध्ये लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाकडून ह्या पाणवठयांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असल्यामुळं शेकडो वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी मदत होत आहे.    
****
बीड जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसंच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी दिले आहेत. त्या काल परळी इथं या संदर्भात घेतलेल्या एका आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात काल पोलिसांनी दहा लाख ५८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. रात्रगस्ती पथकानं एका संशयास्पद चारचाकी वाहनाची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला असून आरोपी चालक वाहन सोडून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
लेबनानमध्ये  विश्व टेबल टेनिस फीडर बैरूत स्पर्धेत संमिश्र गटाच्या आज होणा-या अंतिम लढतीत दोन भारतीय जोड्या समोरासमोर असणार आहेत. यात साथियान ज्ञानशेखरन आणि मनिका बत्रा  यांचा सामना आकाश पाल आणि पॉयमंती बैस्य सोबत दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी खेळवला जाणार आहे. 
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस दरम्यानचा सामना जयपूर इथं दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं आजचा दुसरा सामना  संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीत एक कोटी ८० लाख नवमतदार प्रथमच बजावणार मतदानाचा अधिकार
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यभरात आतापर्यंत दहा उमेदवारी अर्ज दाखल
देशभरात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली
आणि
होळी तसंच धुलिवंदन सणांसाठी बाजारपेठा सज्ज
****
लोकसभा निवडणुकीत १८ ते १९ वर्ष वयोगटातले सुमारे एक कोटी ८० लाख नवमतदार मतदान करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आय वोट फॉर शुअर सारखे विविध उपक्रम समाज संपर्क माध्यमांवर राबवले जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांसह तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, या सर्व आमदारांच्या मतदार संघात लोकसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यात आतापर्यंत १० जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये ५, रामटेकमध्ये १, तर भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत २३ कोटी रुपयांची रोकड, १७ लाख लीटर मद्य, सुमारे ७०० किलो अंमलीपदार्थ, ४६ किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या १ लाखांहून अधिक वस्तू जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल, असं ते म्हणाले. परवाना नसलेली ३०८ शस्र जप्त केली असून परवाना असलेली ४५ हजार ७५५ शत्र ताब्यात घेणं, जप्त करणं किं���ा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली ७७ हजार १४८ शस्र असून उर्वरित शस्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून १ लाख ८४ हजार ८४१ मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येतं. त्यामुळं अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं.
****
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या मंगळवारी २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना ५८ हजार मतांनी पराभूत केलं होतं.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तीन वीरांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं शहिदांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आपापल्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या महापौर दालनात शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु, शहीद सुखदेव या तिनही हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही आज शहीद दिनानिमित्त भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. परभणी इथही भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना शहीद दिननिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अभिवादन केलं.
****
आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा अतिदुर्गम भागात असल्यानं, तिथे दररोज दूध पुरवठा करणं शक्य होत नाही, त्यामुळे या शाळांना विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुगंधी दुधाचा टेट्रापॅक द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून उत्पादक निश्चित केला असल्याचं विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या २७ मार्च रोजी होणार आहे. या सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने मंदिर परिसरात फळे-फुले विक्रेते, पानटपऱ्या, खेळणी विक्रेते तसच इतर विक्रेते आणि व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास बंदी घातली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
****
होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. उद्या सायंकाळी होलिका दहन तर सोमवारी धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे. होळीसणासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये शेणाच्या गोवऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्यासह धुळवड खेळण्यासाठी नाना तऱ्हेचे रंग, पिचकाऱ्या आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान या सणांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड न करण्याचं तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पर्यावरणवादी संस्था संघटनांच्यावतीनं करण्यात येत आहे.
धुळवड तसंच रंगपंचमीसाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री केली आहे. सामुदायिक विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. बीटरूट, पालक, हळद, पळसाची पाने, निळ पावडर, यापासून वेगवेगळे रंग तयार केले असल्याचं विभाग प्रमुख सुनिता काळे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या -
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की रासायनिक होळीच्या रंगामुळे शरीरावर अनेक अनिष्ट परिणाम होतात. विशेषतः केस, त्वचा, डोळे याचा फार मोठा विपरीत परिणाम रासायनिक रंगामुळे होतो. त्याला एक पर्याय म्हणून विभागाने होळीचे नैसर्गिक रंग तयार केलेले आहेत. आपल्या आजुबाजुला निसर्गामध्ये जे झाडं दिसतात, त्या झाडांच्या विविध भागांचा, फळांचा त्याचप्रमाणे फुलांचा वापर करून या रंगांची निर्मिती केली जाते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नियोजित मुंबई सेंट्रल पार्क संदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आज महालक्ष्मी रेसकोर्स इथं प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसंच संबंधित खात्यांना योग्य ते निर्देश दिले. या भेटीनंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतिपथावरील कामाचीदेखील त्यांनी पाहणी केली. ��ावेळी पूर्व उपनगर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
****
पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय निवडणूकीसाठी कर्मचारी-अधिकारी प्रशिक्षित असणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी आज छत्रपती संभाजीनगर इथं 'एक दिवस अभ्यासाचा' हा उपक्रम राबवण्यात आला, त्यावेळी स्वामी बोलत होते. जिल्ह्यातल्या सुमारे एक हजारहून अधिक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २३ आणि २४ मार्च तसंच २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सहजिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.
****
सोलापूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत जिल्ह्यात सुमारे ४१ ठिकाणी धाडी टाकल्या असून, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या पदार्थाचा सुमारे ६३ लाख ७२ हजार इतक्या किमतीचा साठा नष्ट करण्यात केला.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे.
****
0 notes