Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पूर्ण
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातल्या दहा गावांचा मतदानावरचा घोषित बहिष्कार मागे-लातूर मतदार संघात सुनेगाव सांगवी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार कायम तर सोलापुरात मतदान यंत्र जाळण्याचा प्रयत्न
चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग-राजकीय नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
आणि
काउंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पूर्ण झाली. या टप्प्यात दहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९३ मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या ११ मतदार संघात शाहू महाराज छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, नारायण राणे, विनायक राऊत, अनंत गीते, सुनील तटकरे, राजू शेट्टी, प्रणिती शिंदे, राम सातपुते, शशिकांत शिंदे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अर्चना पाटील, सुधाकर श्रृंगारे, डॉ शिवाजी काळगे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते, संजय काका पाटील, चंद्रहार पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह अनेक दिग्गजांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
या सर्व अकरा मतदार संघांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं. यात लातूरमध्ये ४४ पूर्णांक ४८ टक्के , सांगलीमध्ये ४१पूर्णांक ३०टक्के, बारामतीमध्ये ३४ पूर्णांक ९६ टक्के, हातकणंगले ४९ पूर्णांक ९४ टक्के, कोल्हापूर ५१ पूर्णांक ५१ टक्के, माढा ३९ पूर्णांक ११ टक्के, उस्मानाबाद ४० पूर्णांक ९२ टक्के, रायगड ४१ पूर्णांक ४३ टक्के, रत्नागिरी -सिंधुदुर्ग ४४ पूर्णांक ७३ टक्के, सातारा ४३ पूर्णांक ८३ टक्के तर सोलापूर मतदारसंघात ३९ पूर्णांक ५४ टक्के मतदानाची नोंद झाली.
उस्मानाबाद मतदारसंघात दहा गावांमधल्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता, मात्र या गावांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी बहिष्कार मागे घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली. तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या एका केंद्रावर मतदान यंत्रातील दोषामुळे मतदान २० मिनिटं उशीरा सुरू झालं. तर धाराशिव शहरात भीम नगर भागातल्या मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन पंधरा ते वीस मिनिटं बंद पडल्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं.
या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, माजी मंत्री पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, यांनी मतदान केलं.
लातूर लोकसभा मतदारसंघात जळकोट तालुक्यातील डोंगरकोनाळी इथं जिल्हा परिषद शाळेत मतदान यंत्रातील बिघाडामुळे सकाळी ०७ ऐवजी ०३ तास उशिराने म्हणजे १० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मशीन मधील बिघाड दूर करण्यास तब्बल तीन तासांचा अवधी लागला. तर जळकोट शहरातील गुरुदत्त विद्यालयातील मतदान केंद्रातही मतदान यंत्रातील बिघाडामुळे एक तास उशिराने मतदान सुरु झालं. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी ग्रामस्थांनी आपल्या गावाला लातूर-नांदेड हायवेवर जवळचा रस्ता मिळावा म्हणून मतदानावर बहिष्कार टाकला. गावातील ४७७ पैकी एकही मतदान सायंकाळी ०५ वाजेपर्यंत होऊ शकलं नाही. दरम्यान, ज्या ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदान उशिरा झालं त्या ठिकाणी जेवढे मतदार सायंकाळी ०६ पर्यंत मतदान केंद्र परिसरात येतील त्यांचे मतदान करून घेतले जाईल असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात मतदान केंद्र क्रमांक ८६ बागलवाडी इथे एका मतदारानं मतदान करत असताना ईव्हीएम यंत्र जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला होता. मात्र निवडणूक विभागानं त्या ठिकाणी तातडीनं नवीन यंत्र दिल्यानं मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात शंकरनगर इथं १०३ वर्ष वयाच्या लतिका भगवान ठोकळे या आजींनी, कोल्हापूर जिल्ह्यात पुलाची शिरोली इथल्या १०२ वर्षे वयाच्या बाबासाहेब राजाराम यादव या आजोबांनी तर सांगली मतदार संघात बिसूर इथं चौऱ्याण्णव वर्षांचे मल्लाप्पा कुंभार यांनी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
****
मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक मतदानकेंद्रांवर विविध कल्पना राबवण्यात आल्या होत्या.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या लोदगा या गावात एक मतदान केंद्र बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंनी सजवण्यात आलं होतं, याठिकाणी मतदारांसाठी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगोळी, आकर्षक मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
सांगली मतदारसंघाच्या शहरी भागात आकर्षक मतदान केंद्रं तयार करण्यात आली होती. सखी मतदान केंद्रानं तसंच सेल्फी पॉईंटनं मतदारांचं लक्ष वेधून घेतलं. ग्रामीण भागात हरिपूर इथे तयार करण्यात आलेल्या निसर्गस्नेही मतदान केंद्रानंही मतदारांना आकर्षित केलं.
रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातल्या वडगाव इथं पाच वाड्यातल्या आदिवासी महिला आणि पुरुषांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथी व्यक्तींनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदान करून आल्यावर त्यांनी मतदान केल्याचा आनंद व्यक्त केला. करवीर प्रशासनातर्फे या सर्वांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात दोन सभा झाल्या. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मोदी यांनी अहमदनगर इथं सभेला संबोधित केलं. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मुस्लिमांचं लांगूलचालन होत असल्याचा आरोप करत, ही निवडणूक तुष्टीकरण विरुद्ध संतुष्टीकरण अशी होत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. मुस्लिमांना आरक्षण देण्याचं आश्वासन विरोधकांकडून दिलं जात असून, देशाचं संविधान मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला परवानगी देत नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधलं. अशी आश्वासनं देऊन, विरोधकच संविधान बदलण्याचं घातक कारस्थान करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
दरम्यान, बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी, पंतप्रधानांनी आज अंबाजोगाई इथं रोड शो आणि प्रचारसभा घेतली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धुळ्यात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वाळूज इथं सभा झाली.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या लेबर कॉलनी, गणेश कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर आणि टीव्ही सेंटर परिसरामध्ये पोलिसांनी आज संचलन केलं.
****
सी आय एस सी ई म्हणजेच काउंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने आय सी एस ई अर्थात दहावी आणि आय ई सी एस ई अर्थात बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रं, क्लाउड आधारित डिजीलॉकरवर ठेवण्यात आली आहेत. डिजिलॉकरच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तत्काळ उपलब्ध होतील, असं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण धुळे लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची मतदार जनजागृती विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes