Tumgik
#आर्यन खान प्रवास
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा रिजर्व्ह बँकेचा निर्णय;३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करण्याचं आवाहन
शाश्वत इंधनाचा वापर करून देशातल्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी उड्डाण
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यासाठी सुशासन नियमावलीला मान्यता
कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची काँग्रेस पक्षाची मागणी
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं सिट्रस इस्टेटच्या विविध कामांचं भूमिपूजन
माहूर इथं रेणुका देवी मंदिर परिसरात लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाची आज पायाभरणी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल
सविस्तर बातम्या
भारतीय रिजर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही नोट व्यवहारांसाठी वैध असेल. मात्र नागरिकांनी २३ मे पासून ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडील नोटा बँकेत जमा कराव्यात, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. नागरिकांना आपल्या बँक खात्यातून एका वेळी दोन हजाराच्या दहा नोटा बदलून घेता येतील. रिजर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक शाखांमधूनही या नोटा बदलता येणार आहेत.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी यासंदर्भात बोलताना, देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, तसंच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ रिजर्व्ह बँकेनं दिला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
Byte…
हा निर्णय रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानी घेतलेला आहे.चलनामध्ये दोन हजाराच्या नोटा  फार कमी आलेल्या आहेत. त्याही पेक्षा डिजीटल ट्रान्झॅक्शन भारत देशामधे खूप चांगलं चालू आहे. QR Code हे सर्वसामान्याना माहीत झालं आहे. सामान्य नागरीकांना मी एवढं सांगू इच्छितो की, आपल्याकडे जर दोन हजाराच्या नोट असतील तर ते तुम्ही बँकेच्या कुठल्याही ब्रांच मध्ये जाऊन बदलू शकता
****
देशात विकसित केलेल्या सॅफ अर्थात शाश्वत इंधनाचा वापर करून देशातल्या पहिल्या व्यावसायिक विमानानं काल प्रवास केला. एअर एशियाच्या या विमानानं पुणे ते दिल्ली असा प्रवास केला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं एका खाजगी कंपनीच्या मदतीनं हे इंधन तयार केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली विमानतळावर या विमानाचं स्वागत केलं. २०७० पर्यत शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारतात होत असलेल्या प्रयत्नांत हा मैलाचा दगड ठरल्याचं, त्यांनी सांगितलं. सॅफ इंधन हे पारंपरिक इंधनाप्रमाणे तयार न करता ते कृषी कचरा, घनकचरा आणि वन अवशेषांपासून तयार केल्याची माहिती पुरी यांनी दिली.
****
देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी काल दोन नवीन न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती कलापती व्यंकटरमण विश्वनाथन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांची संख्या आता ३४ झाली आहे. विश्वनाथन यांची निवड थेट बार कौन्सिलवरून सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावर झाली आहे. अशी निवड होणारे ते फक्त दहावे वकील आहेत.
****
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशासन नियमावली २०२३ ला काल मान्यता दिली. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही मान्यता प्रदान केली. सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्या होत्या. यासाठी निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं तयार केलेली देशातली अशा स्वरूपाची ही पहिलीच नियमावली असून, यामध्ये २०० हून अधिक सूचना देण्यात आल्या आहेत. सुशासन नियमावली २०२३ मध्ये नागरिकांना सुलभरीत्या सेवा मिळण्यावर भर देण्यात आला आहे. यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असेल. यामध्ये विभागनिहाय १६१ निर्देशांक तयार करण्यात आले असून अगदी जिल्हा पातळीपर्यंत या निर्देशांकाच्या आधारे सुशासनाची कामगिरी तपासली जाईल.
****
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग-एन सी बी चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग -सी बी आय नं केलेल्या कारवाईच्या विरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्यांना दिलासा देत, सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, वानखेडे यांनी यासंदर्भात या याचिकेत अनेक खुलासे केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांना दळणवळण सेवा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या उपक्रमांतर्गत पहिले १२ खांब ‘इंडस टॉवर्स’ या आघाडीच्या दूरसंचार कंपनीला देण्यात आले आहेत. ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला आज याबाबतचं पत्र सुपूर्द करण्यात आलं. महा मुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत महामुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिक्त येत्या १० वर्षात सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
****
नाशिक इथं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर विकसित करण्यासाठी जागा निश्चित करण्याचं आवाहन, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. नाशिक इथं उद्योजक संघटनांच्या निमा पॉवर २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात १२ हजार ३६० उद्योजक तयार झाले असल्याचं ते म्हणाले. दिंडोरी, घोटी याठिकाणी सुद्धा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम.आय.डी.सीच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत असून, ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राज्य मंडळाखेरीज अन्य शिक्षण मंडळांचे इयत्ता दहावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. लवकरच राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात, अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. हे ऑनलाइन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रचलित पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार असल्याचं, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे.
****
केंद्र शासनानं महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांची व्यसनमुक्तीसाठी निवड केली आहे. यामध्ये सोलापूर, ठाणे, जळगांव, कोल्हापूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. “व्यसनमुक्त ग्राम”या शीर्षाखाली जिल्ह्यात पाच तसंच दहा हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती निवडून, या गावांमध्ये व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
****
राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची काल भेट घेत या मागणीचं निवेदन दिलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि त्र्यंबकेश्वर इथं जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्यात आल्याचा आरोप केला. भडकाऊ भाषणं आणि वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, राज्यात मात्र या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्याची टीका पटोले यांनी केली.
****
राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटवण्यात येऊ नये, अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. काल चंद्रपूर इथं या समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भामटा शब्द या जातीतून वगळल्यास, विमुक्त जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ सवर्ण राजपूत घेतील आणि या प्रवर्गात मोडणाऱ्या १४ विमुक्त जातींवर अन्याय होईल, त्यामुळे भामटा शब्द वगळू नये, अन्यथा विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वजातींना सोबत घेऊन राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
****
विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निर्धारित ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवावी, असं आवाहन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वंदे मातरम सभागृहात, काल छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती उद्योजकता शिबीराचं उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था - सिपेटच्या विद्यार्थी क्षमतेत दुप्पट वाढ करुन, एक हजार विद्यार्थी क्षमता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात इसारवाडी इथं जागतिक दर्जाचे सिट्रस इस्टेट हा प्रकल्प नावारुपास येणार असल्याचं, पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी म्हटलं आहे. सिट्रस इस्टेटच्या विविध कामांचं काल भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पात मोसंबीची दर्जेदार आणि जातीवंत रोप तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी या प्रकल्पात प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवीन प्रयोग करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. 
दरम्यान, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांचं भूमिपूजनही काल भुमरे यांच्या हस्ते झालं. या उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून सध्या रस्ते, पार्किंग, पाईपलाईन, संगीतकारंजे, ही कामं होणार असून, दिवाळीपूर्वी हे उद्यान पर्यटकांसाठी खुलं करण्यात येईल असं भुमरे यांनी यावेळी सांगितलं.
****
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहूरगड इथं, श्री रेणुका देवी मंदिर परिसरात आज लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरात पोषाखासंदर्भातल्या नियमावलीच्या फलकाबाबत, मंदिर प्रशासनानं, संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. दरम्यान, मंदिर समितीनं भाविकांसाठी कोणतेही पोषाख संकेत जाहीर केले नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे. तसंच भाविकांना मंदिरात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध घातले नसल्याचं प्रशासनानं जारी केलेल्या प्रत्रकात म्हटलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १८७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं सहा गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज दिल्ली इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र तसंच निकोबार बेटांच्या परिसरात मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. परिणामी देशाच्या नैऋत्य भागात २३ ते २५ मे दरम्यान काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या जवळा पांचाळ इथं बस स्थानकाजवळ असलेल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला अचानक आग लागली, या आगीत एक हॉटेल आणि एक घर खाक झालं. काल संध्याकाळी ऑटोमोबाईलच्या दुकानात गरम पॅच पंक्चर जोडताना आग लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान, हिंगोली शहरात पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात काल संध्याकाळी एका धावत्या एसटी बसला अचानक आग लागली. चालकाच्या सतर्कतेनं मोठी दुर्घटना टळल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात दोन बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शिरुरकासार तालुक्यात जाटवड इथं तसंच पाटोदा तालुक्यात कारेगाव इथं हे विवाह होणार होते. हे दोन्ही बालविवाह रोखल्यानंतर बालसंरक्षण समितीनं या दोन्ही कुटुंबांचं प्रबोधन करून बालविवाह करणार नसल्याचं लिहून घेतलं.
****
परभणी जिल्ह्यात येत्या ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
****
२८ मे हा दिवस जागतिक पातळीवर मासिक पाळी दिवस म्हणून पाळला जातो. या दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात २२ ते २८ मे या कालावधीत, मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. या सप्ताहात जनजागृती फेरी, चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रबोधन आदी व्यापक स्वरूपात उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
सारथी संस्थेमार्फत शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परी��्षा तसंच शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येतं. या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन सारथीचे लातूर इथले उपव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार ढगे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी राज्य सरकार कडून एकूण तीनशे ८३ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला आहे. आमदार राणाजगजिंतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या या निधीत, उस्मानाबादसाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये, तुळजापूर साठी एकशे एकोणचाळीस आणि नळदुर्गसाठी सत्त्याण्णव कोटी रुपयांचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यात जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत एकशे दोन या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा पुरवली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णांकरता एकशे दोन या रुग्णवाहिकेतून सेवा पुरवण्यासाठी शासनानं ठरवून दिलेला प्रति किलोमीटर दर आकारून रुग्णवाहिका पुरवण्यात येते.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
विशेष एनडीपीएस कोर्टाने त्याचा पासपोर्ट जारी केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्याचा पासपोर्ट मिळाला
विशेष एनडीपीएस कोर्टाने त्याचा पासपोर्ट जारी केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्याचा पासपोर्ट मिळाला
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण: गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरणात अडकल्यानंतर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. 2 ऑक्टोबर रोजी, त्याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती, तरीही त्याला काही महिन्यांपूर्वी NCB कडून क्लीन चिट मिळाली होती. क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खानने पासपोर्ट परत मिळावा यासाठी ३० जून रोजी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. हेही…
Tumblr media
View On WordPress
0 notes