#असं…”
Explore tagged Tumblr posts
chaitanyakulkarni98 · 7 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मा��्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दि��ेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
��ोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना ��झमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जात��� आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. ��्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
nirannjan17 · 2 months ago
Text
कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी नसून मोक्षप्राप्ती झाली असं म्हणणारे साधु अथवा आज महाराष्ट्रात असलेलं..हे साधू महंत जे प्रकाशझोतात असतात किंवा आणले गेलेंले असतात अशें सदर गृहस्थ फार सद्सद्विवेकाचा आव आणून किर्तनादी गप्पा मारताना दुरचित्रवाणी वर दिसतात. देश या असल्या भोंदूंच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ते फार अगोदरच सांगून ठेवलं आहे..
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्�� करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
N_D_PATIL_25
3 notes · View notes
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघा��ेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल���या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मनोज जरांगे : 'मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षड्यंत्र'
https://bharatlive.news/?p=179428 मनोज जरांगे : 'मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असं ...
2 notes · View notes
avinashbhondwe · 2 years ago
Text
ग���्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes · View notes
airnews-arngbad · 1 hour ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
हास्य कलाकार कुणाल कामराविरोधात एफआयआर दाखल-तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु; उपाध्यक्ष पदासाठी २६ मार्चला निवडणूक
आणि
विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन साजरा
****
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत आज एकमतानं मंजूर झाला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. हा पुरस्कार देताना त्यांचा महात्मा, हा सन्मान कमी होऊ नये, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महात्मा ही लोकमान्यता आहे तर भारतरत्न ही राजमान्यता आहे, त्यामुळे त्यांचा महात्मा, हा सन्मान कुठेही कमी होणार नाही, असं फडणवीस यांनी यावर बोलताना सांगितलं.
****
हास्य कलाकार कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, कामरा प्रकरणाशी संबंधित स्टुडिओची सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस समोर असताना तोडफोड केली, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तर, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. यावेळी सभागृहात गोंधळ झाल्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
दरम्यान, कुणाल कामरा याचे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, त्याच्या बॅंक खात्यात कुठून पैसे येतात हे तपासले जाईल आणि त्याच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितलं. कामरा याच्याविरोधात याआधी अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं वाटत नसल्याचं, म्हटलं आहे. नागपूर दंगलीतल्या नुकसान भरपाईप्रमाणेच, कामराच्या ��्टुडिओ तोडफोड प्रकरणात संबंधितांकडून भरपाई वसूल केली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुणाल कामरा याच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. शिवसेना कार्यकर्ता राहुल कनाल सह ११ जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे.
****
विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. जयंत पाटील, नाना पटोले यांनीही विविध मुद्यांवर सरकारवर टीका केली.
****
विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.
****
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. मत्स्य व्यवसायात राज्याला देशात पहिल्या तीन क्रमांकात नेण्याचा सरकारचा संकल्प आहे, असं राणे यांनी सांगितलं.
****
सातबाऱ्यात असलेली मृतांची नावं हटवून त्यावर वारसांची नावं घालण्याची मोहीम येत्या १ एप्रिल पासून राज्यभरात सुरू होणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात चिखली मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दीड महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे, वारसांची नोंदणी करताना succession certificate आवश्यक नाही, तहसीलदार सर्व माहिती घेऊन वारसांची नावं सातबाऱ्यावर लिहितील, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
****
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक आज विधान परिषदेनं मंजूर केलं.
****
सामाजिक न्याय विभागाअं���र्गत येणाऱ्या वसतीगृहांसाठी पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. एक वसतीगृह दहा कोटी रुपयांचं असावं अशी सरकारची कल्पना असून, वसतीगृहातली प्रवेश प्रक्र��या समाजकल्याण आयुक्तामार्फत राबवली जाईल असं शिरसाट यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं संसद सदस्यांच्या वेतन, दैनिक भत्ता आणि निवृत्तीवेतनात वाढ केली आहे. त्यानुसार आता संसद सदस्यांचं दरमहा वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये, दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये तर निवृत्तीवेतन दरमहा पंचवीस हजारवरून एकतीस हजार रुपये, असं करण्यात आलं आहे. याशिवाय, पाच वर्षांहून जास्त सेवेतल्या प्रत्येक वर्षाचं अतिरिक्त निवृत्तीवेतन दरमहा दोन हजारहून अडीच हजार रुपये, इतकं करण्यात आलं आहे. येत्या एक एप्रिलपासून हा निर्णय लागू होईल.
****
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये, असं ते म्हणाले.
तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं.बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.
****
दहावी - बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणांत राज्यात १ मार्चपर्यंत १४ प्रकरणांमध्ये FIR दाखल झाला असून, दहावीच्या ३२ आणि बारावीच्या १०२ केंद्रांवर गैरप्रकार झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. या केंद्रांना विभागीय मंडळं नोटीस देतील, तसंच संबंधित विद्यार्थांची विभागीय मंडळ स्तरावर चौकशी होईल आणि दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. जनतेनं क्षयरोग निर्मूलनासाठीची आपली कटिबद्धता दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी आजच्या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं केलं आहे. सर्व नागरिक मिळून क्षयमुक्त भारत घडवू शकतात, असा विश्वास देखील आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथे आज या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा पार पडला. या अभियानात जिल्ह्यातल्या ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. यातल्या ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्��ृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना 'महात्मा गांधी रजत सन्मान' प्रदान करण्यात आला.
****
गडचिरोली जिल्ह्यात कृत्रीम बुद्धिमत्ता-एआयच्या मदतीनं क्षयरोग रुग्णांचं निदान करण्यात येत आहे. डॉक्टर अभय बंग यांच्या, सर्च, या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मॉ दंतेश्वरी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं वर्षभरात ८८ क्षयरुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. Qure AI या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसाचं क्ष-किरण चित्र Qure AI च्या सॉफ्टवेअरवर अपलोड केल्यानंतर, रुग्णाचा अहवाल काही सेकंदात डॉक्टरांना त्यांच्या मोबाईल ॲपवर मिळतो, त्यामुळे पुढील उपचार तसंच आवश्यक त्या चाचण्या घेण्यासाठीचा निर्णय लगेच घेता येतो. मात्र, या तंत्रज्ञानाचा रोगनिदानात उत्तम वापर होत असला तरी हे तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, असं या रुग्णालयाचे प्रशासक डॉक्टर अश्विन राघमवर यांनी स्पष्ट केलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं आज सकाळी निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह एमजीएम हॉस्पिटल इथं दान करण्यात आला.
****
0 notes
nagarchaufer · 11 days ago
Text
सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर उत्तर प्रदेशात सापडला , झालं असं की.. 
बीड जिल्ह्यातील मारहाण प्रकरणातील आरोपी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलेले असून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.  सतीश भोसले उर्फ खोक्या याचे अनेक कारनामे गेल्या आठवड्यात समोर आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला त्याने बॅटने मारहाण केली होती.सतीश भोसले हा परिसरातील भाजपचाच पदाधिकारी होता. सुरेश धस याच्यासोबत त्याचे…
0 notes
everymediaem · 13 days ago
Text
बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानींचे वनतारा मागील प्रयत्नांना दिली दाद
बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानींचे वनतारा मागील प्रयत्नांना दिली दाद
Authored byसिद्धेश जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Mar 2025, 4:06 pm
Subscribehttps://navbharattimes.indiatimes.com/youtubesubscribe.cms?channelid=UCjD_oFXbVfCDhGEsHunI-hg
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानी यांच्या वनतारा प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे कौतुक केलं. शास्त्रीजी म्हणाले की सर्व सजीवांमध्ये देव असतो आणि वनतारा या उद्देशाला साजेशी कामगिरी करत आहे. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या या प्रकल्पाने 1.5 लाखाहून अधिक प्राण्यांना आश्रय दिला आहे.
Tumblr media
https://dealspakki.com/inArticleAdvertorial.htm?host=mt&platform=desktop&subsec1=2428946&subsec2=50807229बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकतेच जगातील सर्वात मोठ्या प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा बाबत आपले विचार व्यक्त केले. ज्या उल्लेखनीय पातळीवर प्राण्यांचे जीव वाचवले जात आहेत, त्याचे त्यांनी कौतुक केलं. या उपक्रमामागील दृष्टिकोनाचे कौतुक करत त्यांनी "जीव में ही शिव है" अर्थात सर्व सजीवांमध्ये देव असतो असं ते म्हणाले. हा विचार वनताराच्या वन्यजीव संवर्धनाच्या उद्देशाशी मिळता जुळता आहे.
instagram
गुजरातमध्ये 3,500 एकर परिसरात पसरलेले वनतारा, जगभरातील प्राण्यांचा बचाव, उपचार आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असं अभूतपूर्व केंद्र आहे. 4 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन झालेले हे केंद्र अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणात वन्यजीव संवर्धनाचे काम करत आहे. इथे बचाव मोहिमांमधून आलेले दीड लाखांपेक्षा जास्त प्राणी आहेत. या केंद्रात प्रगत मल्टी-स्पेशालिटी वन्यजीव हॉस्पिटल, नवजात शिशु आयसीयू, वन्यजीवांसाठी विशेष अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि अत्याधुनिक नवजात शिशु काळजी केंद्राच्या माध्यमातून प्राण्यांची काळजी घेतली जाते.
https://navbharattimes.indiatimes.com/dmp_orion.cms?msid=118802162&sec=religion-festival-news&secmsid=50807229&wapCode=mt&isAmp=false वनतारा बाबत बोलताना त्यांनी नावाच्या अर्थावर विशेष भर दिला. “वनतारा,” म्हणजे “वनातील तारा,” असं ते म्हणाले. वाचवलेल्या प्राण्यांना आशा आणि नवीन जीवन देण्याच्या केंद्राचा उद्देश या नावातून स्पष्ट होतो, असं त्यांना वाटतं. नामशेष होत असलेल्या प्रजातींसह भारतातील आणि परदेशातील प्राण्यांना वनतारामध्ये कशाप्रकारे आश्रय मिळाला आहे, याविषयी देखील ते बोलले. या केंद्रात समस्यांचा सामना करत असलेल्या प्राण्यांना जगण्याची दुसरी संधी दिली जात आहे.
त्यांनी अनंत अंबानी यांच्या वन्यजीव संवर्धनाच्या दृढ आणि दयाळूपणाचे कौतुक केलं आणि त्यांच्या या उपक्रमात त्यांना यश मिळावं अशा शुभेच्छा दिल्या. वनताराची विशालता आणि त्यामागील विचार यामुळे हा प्राण्यांची काळजी आणि संवर्धनाचा एक अतुलनीय उपक्रम ठरतो, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
0 notes
healthsinfos · 19 days ago
Text
खरंच देव आहे का? डॉक्टरांना देखील पडला प्रश्न
डॉ. निलेश पुरकर (हार्ट सर्जन)मी हृदयरोग शल्यविशारद आहे. रोज शस्त्रक्रिया करताना मी मृत्यूला थो��वण्याचा प्रयत्न करतो. माझ्या हातात स्कॅल्पेल असतं, पण कधी कधी असं वाटतं की माझ्या हातात फक्त प्रयत्न असतात, तर निर्णय कुणीतरी दुसराच घेत असतो. त्या अज्ञात शक्तीला काही जण नशिब म्हणतात, काही विज्ञान, तर काही देव म्हणतात.एका निष्पाप हृदयाची लढाईमला अजूनही आठवते काही वर्षांपूर्वीची ती रात्र. एक सहा…
0 notes
khabar24 · 24 days ago
Text
नूतन मराठा महाविद्यालयातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी बनवला ड्रोन
नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नूतन गोल्डन सायन्स बॉईज या उपक्रमात अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील राज भोई या विद्यार्थ्याने यूट्यूब व गुगलवर सर्च करून ड्रोन बनवला. हा ड्रोन का बनवला असं राज भोई या विद्यार्थ्याला विचारले असता त्याने सांगितले की, शेतात फवारणी करण्यासाठी मजूर मिळत नव्हते व फवारणी करतांना वापरला जाणाऱ्या त्या औषधांचा मानवी…
0 notes
chaitanyakulkarni98 · 7 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर ��हे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची ��ोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिस���े. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्या��ाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हण���े प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावू��� बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
3 notes · View notes
vidyams13 · 1 month ago
Text
Tumblr media
साहित्य रसिक म्हणून अनुभवलेलं पहिलं ९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
#विद्या
===================
मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत ग्रंथ दिंडीला सुरवात झाली...
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
ह्या वर्षी पहिल्यांदाच संमेलन गीत लिहिलं गेलं ते गीतकार आनंद पेंढारकर यांनी आणि पहिला गझल कट्टा सुरु झाला अखिल भारतीय संमेलनाच विशेष !
आनंदाची गोष्ट म्हणजे संमेलन महाराष्ट्रात होते
शिवाय ह्या वेळी अध्यक्षाची निवडही उत्तम होती . कारण संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे वादग्रस्त विधानापासून लांब होते .
भव्य दिव्य सोहळा तीन दिवस सुरु होता. संमेलनात रांगोळी ,मूर्तिकला ,साहित्य संस्कृतीचं छान दर्शन घडवलं.
एकाच वेळी कवी संमेलन तर कुठे गझल कट्टा तर काही ठिकाणी परिसंवाद ,बोलीभाषेचा जागर सुरु होता . जमेल तेवढा सहभाग घेण्याचा प्रयत्न केला . वेळापत्रक माहिती असणं जास्त जरूर आहे हे ह्या वेळी कळलं . सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण करण्याचा प्रस्त���व केला होता पण मागच्या दोन वर्षापासून काही मान्य केला नाही ना कोणी राजकारणी नेत्यांनी मध्यस्ती केली .
साहित्यिक वाचक प्रकाशकांचा दुवा असणारं मराठी भाषेचा प्रसार करणार ग्रंथ दालन एक आकर्षण . मराठी भाषा जास्त बोलली जावी वाचक संख्या वाढावी म्हणून प्रत्येक जण
आपल्या परीने झटत होते . पण खूप मोठं ग्रंथ दालन एक फेरफटका मारणे हि कठीण . कुठे कोणता stall आहे याची माहिती हि बाहेर कुठे लावली नव्हती .हे खटकलं . सामाजित माध्यमाचा पुरेपूर वापर करायला हवा असं अजूनही वाटतं . तंत्रज्ञान बदलतं आहे तसे बदलायला हवं . facebook आणि you tube वर live प्रक्षेपण व्हावं हि माफक अपेक्षा आहे बघू कधी पूर्ण होतेय . साहित्यिक उपक्रमा बद्दल सांगायचं झालं तर ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या मोफत ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देते .
बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वरूप ओळखून पुस्तक हि आता ebook स्वरुपात प्रकाशित करण्यात येतात . Esahity उपक्रमा बद्दल सांगायचं तर साहित्यिकांच्या मदतीने ई साहित्य प्रतिष्ठान मोफत ebook सेवा वाचकांना देते .आधी email , website वर मिळत होती आता whatsapp वर हि सुरु करण्यात आली आहे . या दोन्ही स्तुत्य उपक्रमामुळे देशा विदेशात वाचक वर्ग वाढला आहे आणि शिवाय नव्या साहित्यिकांच्या ओळखी हि वाचकांना होतात . मराठी पाऊल पढते पुढे बोलायला हरकत नाही . मराठी माणुस मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देत नाही परिस्थिती बिकट आहे अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी उल्लेख केला शिवाय वेळे नुसार शाळेतलं शिक्षण हि बदलायला हवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा शिकवल्या जाव्यात ह्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेलं हि आशा व्यक्त केली .
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुने नवीन मित्रमंडळीशी भेटी गाठी झाल्या . हे खासच म्हणायचं .साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल आणि भोजनाची ही चांगली व्यवस्था होती. एकूण वाचक म्हणून अनुभव चांगला होता . दोन दिवस अनुभव घेतलेल्या संमेलनाची धुंदी अजून उतरली नाही . एवढचं सांगीन .
~ विद्या
0 notes
adbanaobrandbadhao · 2 months ago
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य हे खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया. 
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
pradip-madgaonkar · 3 months ago
Text
नवरी मुलगी सासरी जायला निघालेली असते, घरची मंडळी निरोप देत असतात.
दहा पावलं जातात न जातात, तोच ती मागे येऊन पळतच घरात शिरते.
Pradip : “अगं काय झालं? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी.”
नवरी मुलगी, “तुला शुभ-अशुभाचं पडलंय, इथे माझा चार्जर राहिलाय.”
😀😀😀😍😍😍🤣🤣🤣😅😅😅
0 notes
airnews-arngbad · 7 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये, असं ते म्हणाले. तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं. बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.
२० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही, तसा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही, असं राज्य सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा दत्तक योजना राबवली जात आहे. त्यात दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून आर्थिक मदत घेतली जाते. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद तसंच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यातल्या शाळा दुरुस्तीचा आराखडा लवकरच तयार करू आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून, सर्वसामान्यांचं दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचं नमूद केलं.
विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विरोधी पक्षनेता नियुक्त करताना विधानसभेतलं संख्याबळ पाहिलं जात नाही, असं ते म्हणाले. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेऊ आणि सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालेल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.
हास्य कलाकार कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. आज विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, कोणत्याही नेत्याचा अनादर करणं सहन केलं जाणार नाही, कोणालाही स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही, असं स्पष्ट केलं. कामरा यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्या��नी दिला आहे.
कर्नाटकमध्ये एका विशिष्ट अल्पसंख्यक समाजाला सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या, या निर्णयासाठी घटनेत बदल करण्याच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद प्रतिवाद वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज स्थगित केलं. लोकसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणार्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग अर्थात टीबी च्या जीवाणूंचा शोध लावला होता. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. जनतेनं क्षयरोग निर्मूलनासाठीची आपली कटिबद्धता दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजी नगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं आज सकाळी निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह एमजीएम हॉस्पिटल इथं दान केला जाईल.
0 notes