Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 April 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १५ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि. **** कोरोना विषाणू बाधितांवर करावयाच्या उपचाराच्या पद्धतीवर मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं कृती दल तसंच अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासंदर्भात उपाययोजना सूचवण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन देशभरातल्या टाळेबंदीत तीन मे पर्यंत वाढ- पंतप्रधानांची घोषणा; रेल्वे वाहतूक आणि विमानांची उड्डाणंही रद्द राज्यात आणखी ३५० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद; १८ जणांचा मृत्यू औरंगाबादमध्येही एका रूग्णाचा मृत्यू तर एका १७ वर्षाच्या तरूणाला लागण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणानेच पण उत्साहात साजरी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत साधू यांचं निधन **** कोरोना विषाणू बाधितांवर करावयाच्या उपचाराच्या पद्धतीवर मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं कृती दल तसंच अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासंदर्भात उपाययोजना सूचवण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली. मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉक्टराचे एक टास्कफोर्स आपण तयार केलेले आहे. डॉक्टर संजय ओक आपल्याला कल्पना आहे. उधवारीयाची आहेत. त्यांच्यासोबत आणखीन सर्व डॉक्टर व्यवसायातले, विविध क्षेत्रातले म्हणजे कोण हार्टस्पेशालिस्ट आहेत, कोण किडणी विशेष तज्ञ आहे, कोण आणखीन कशातला तज्ञ आहे. अशा सर्व तज्ञ लोकांची टीम ही आपण टास्कफोर्स म्हणून कालपासून त्यांना आपण काम करायला सुरुवात केलेली. कोरोना विषाणू विषयक देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून, एकूण रुग्णांच्या १० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनावर उपाय म्हणून प्लाज्मा ट्रीटमेंट, बीसीजी लसीकरणसाठी राज्यात प्रयोग करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले, जे पंतप्रधान बोलले ते की देशातल्या संशोधकानी पुढे आलं पाहिजे. नवीन कोणी तज्ञ असेल त्यांनी पुढे आले पाहिजे. लस तयार होते का, औषध तयार होते, महाराष्ट्राने सुरूवात केली आहे. एक प्लाझमा ट्रिटमेंन्ट आणि एक डिसीसी व्यॉकसीन याच्याबद्दल प्रयोग करण्याची आपण परवानगीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित आणि बिगर कोरोन��� विषाणू बाधित रुग्णालयाची विभागणी करण्यात येत असून, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्यात सर्व स्तरावर उपाययोजना सुरु असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक साधनांचा पुरवठा सुरळीत सुरु राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २१ हजार निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू रुग्णांची सेवा करण्याची तयारी दर्शवल्याचंही मुख्यमंत्री यावेळी सांगितलं. परप्रांतीय मजुरांची चिंता करण्याचं कारण नाही, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, महाराष्ट्रात त्यांची उत्तम सोय होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मजुरांच्या भावनांशी खेळून कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करु नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल साधेपणानं साजरी झाली, अनुयायांनी दाखवलेल्या संयमाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. **** कोरोनामुळे राज्या होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, या मृत्यूचं विश्लेषण करणं आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं मुंबई अणि परिसरासाठी तसंच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात आणि मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठवणं तसंच समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई शहर आणि परिसरात कोरोनाची विषाणूबाधा आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना आणि विश्लेषण करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. के. ई. एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे, मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी असतील. मुंबई वगळून उर्वरित राज्यासाठीच्या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक या समितीचे अध्यक्ष असतील. **** कोरोना विषाणू संसर्गामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सूचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करणार असून या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. या तज्ज्ञ सदस्यांच्या समितीत जे.एस. सहानी, सुबोधकुमार, रमानाथ झा, उमेशचंद्र सरंगी, जयंत कावळे, सुधीर श्रीवास्तव या सहा सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाच्या सचिवांचा या समितीत समावेश असून, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश आहे. **** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना काल ही माहिती दिली. पंचवीस मार्चला सुरू झालेली ही टाळेबंदी काल संपणार होती, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण यापुढंही टाळेबंदीची शिस्त पाळणं सुरू ठेऊ या, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सारे सुझावो को ध्यान में रखते हुए, यह तय किया गया है कि, भारत में लॉक डाऊन को अब तीन मई तक और बढाना पडेगा। याने तीन मई तक हम सभी को, हर देस वासीको लॉकडाऊन में ही रहना होगा। इस दौरान हमें अनुशासन का उसी तरह पालन करना है जैसे हम करते आ रहे है। कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे सुरू असून, कोरोनामुळे होणारं मोठं नुकसान टाळण्यात देश यशस्वी ठरला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. कोवि़ड १९ विरुद्धच्या लढ्यात सात मुद्दयांवर जनतेनं सहकार्य करावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले, सात बातो में आपका सात. पहिली बात आपने घरके बुजर्ग लोगोका विषेश धान रखे. दुसरी बात लॉकडाऊन और सोशनडिसटन्सीन का पुरी तरह पालन करे. घर में बने फेसकर्व्हर या मास का उनका अनिवार्य और से उपयोग करे. तिसरी बात अपनी इमिनिटी बधाने के लिये, आयुष्य मंत्र्यालय द्यारा जो निर्देश दिये गये हे, उसका अगर हम पालन करे, गर्म पानी हे, काढा हे, इनका निरंतर सेवन करे. चौथी बात कोरोना सक्रंमण का फेलाव रोकने के लिये, आरोग्य सेतू मोबाईल ॲप जरूर डाऊनलोड करे. पाचवी बात, जितना हो सके उतने गरीब परिवार की देखरेख करे, उनकी भोजन की आवश्यकता परी करे. छटी बात आप अपने व्यवसाय, अपने उद्योग में अपने सात काम करने वाले लोगोके प्रती संवेदना रखे, किसी को नौकरी से न निकाले. सातवी बात देश के कोरोना यौद्धा हमारे डॉक्टर, नर्सेस, सफाईकर्मी, पोलिस कर्मी ऐसे सभी लोगोका हम सन्मान करे आदरपुर्वक उनका गौरव करे पुढील एका आठवड्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवली जाईल आणि वीस एप्रिलपर्यंत प्रत्येक पातळीवर खूप बारकाईनं यासंबंधी तपासणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या वीस एप्रिलपर्यंत टाळेबंदीचं कसोशीनं पालन करणाऱ्या आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळणाऱ्या भागांमध्ये टाळेबंदीत सशर्त सुट देण्यात येईल, अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. **** दरम्यान, टाळेबंदी वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं सर्व प्रवासी गाड्यांची वाहतूक तीन मे पर्यंत स्थगित केली आहे. या कालावधीसाठी लोकांनी आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाणार आहे. या दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे. **** राज्यात काल कोरोना विषाणू बाधित ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या दोन हजार ६८४ झाली आहे. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सध्या राज्यात ६७ हजार ७०१ लोक घरात विलगीकरणात राहत आहेत. राज्यात काल १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. **** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमधे एका ६८ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. पुणे इथून आलेल्या आरेफ कॉलनीतल्या कोरोना बाधित अभियंता तरूणाचे ते वडील होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय - घाटी इथं उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान काल त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. कोरोना विषाणू बाधित आरेफ कॉलनीतला अभियंता तरूण आणि सिडको एन-चार मधील रहिवाशी महिलेचा १४ दिवसांचा अहवाल नकारात्मक आला आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये काल आणखी एक कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आला आहे. शहरातल्या बायजीपुऱ्यातल्या एका १७ वर्षीय रूग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. हा मुलगा १० एप्रिल रोजी खासगी रुग्णवाहिकेनं मुंबईतल्या जोगेश्वरीतून आई वडीलांसह शहरात दाखल झाला होता. त्याची आई गरोदर असून, प्रसुतीसाठी ते औरंगाबादला आले. मुंबईहून आल्यानंतर मुलाला अस्वस्थ वाटू लागल्यानं महानगरपालिकेनं तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं होतं. मुलाच्या वडिलांचा अहवाल नकारात्मक आला, त्याच्या आईचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. औरंगाबाद शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या २५ झाली आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या कोरोना बाधित महिलेचा नागरी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातला हा दुसरा बळी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. या पूर्वी श्रीरामपूर इथल्या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला होता. **** नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. **** मुंबईत काल वांद्रे इथं मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्या प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली इथून अटक केली. मुंबई शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी दुबे यानं सामाजिक संपर्क माध्यमातून उत्तर भारतीय मजदूर आंदोलनाची हाक दिली होती. रात्री उशीरा नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत दुबे ला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवल्यानंतर हजारो मजुर काल वांद्रे रेल्वे स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झाले होते. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसावी जयंती काल कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू टाळेबंदीत सर्वत्र साधेपणानं साजरी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल त्यांच्या निवासस्थानी जयंती साजरी करताना बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. **** औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सामाजिक सुरक्षित अंतर ठेऊन जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात, महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं. परभणी इथंही नागरिकांनी आपापल्या घरात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी केली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक अंतर राखत अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंबेडकर जयंतीनिमित्त गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या ३० किटचं वाटप केलं. नांदेड इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबीरात १५० जणांनी रक्तदान केलं. लातूर जिल्ह्यातही बाबासाहेबांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपल्या निवासस्थानी जयंती साजरी केली. शहरातल्या आंबेडकर चौकात प्रथा-परंपरा म्हणून अवघ्या तीन लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. उस्मानाबाद इथं भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या निवासस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. **** कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड जिल्ह्यात अत्यावशक कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल हे आदेश जारी केले. आदेशाचं उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. **** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी ऑडीओब्रीजद्वारे संवाद साधला. जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्याच्या सर्व सेवा मिळाव्यात यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची रुग्णालयं बंद ठेऊ नयेत, कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना द्यावी, खासगी डॉक्टरांकडून या कामामध्ये हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. दरम्यान, जालना जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकमेव कोरोना विषाणूबाधित महिलेसह सारी या आजाराने ग्रस्त दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं भारतीय जनता पक्षाच्यावतीनं ५०० मास्क वाटप करण्यात येत आहेत. औरंगाबाद इथल्या लिलादेवी हरकचंन्द्र लोढा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातल्या ५० कैद्यांच्या कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं. **** नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र घोडजकर यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वीस हजार रुपये, तर महेश मगर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत शिधा पत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक अंतर राखण्याचा नियम काटेकोर पाळण्यात आला. **** परभणी इथं जमावबंदी आदेशाचं उल्लघंन करणाऱ्या २७ जणांविरुद्ध १३ गुन्हे दाखल करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहन धारकांवर कारवाई करून ८०५ वाहनं जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये सात ठिकाणी परप्रांतीय आणि राज्यातल्या स्थलांतरीत कामगारांची राहण्याची व्यवस्था केली आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथल्या कोरोना विषाणू विशेष शासकीय उप जिल्हा रूग्णालयात काल नऊ वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. मुखेड इथले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर डोईजड हे या रुग्णालयात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ तहसील प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर प्रशासनानं वैद्यकीय अधिकारी सेवेवर गैरहजर असल्याचे पंचनामे केले. **** जालना जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक लाख मास्क आणि पन्नास हजार निर्जंतुककीकरण बाटल्यांचं वाटप करण्यात येत आहे. भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून कालपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. **** औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल वैजापूर तालुक्यातल्या पारळा इथं आदिवासी आणि भिल्ल सम��जातल्या गरजू व्यक्तींना धान्य वाटप केलं. यावेळी टाळेबंदीच्या कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली असल्याचं तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी सांगितलं. **** नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या सीमा भागात ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली असून, अशा समित्या स्थापन करण्याच्या कामाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कारला बुद्रुक इथ ग्रामसुरक्षा समितीची स्थापन करण्यात आली आहे. **** टाळेबंदीमुळे राज्यातल्या भटके विमुक्त समाजातल्या पारंपरिक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनानं त्यांना पुरेसं अन्यधान्य, किराणा सामान, तसंच आर्थिक मदत करावी अशी मागणी, भटक्या विमुक्त जाती, जमाती सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल डोईजड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हातावर पोट असलेल्या वासुदेव, चुडबुडके जोशी, गोंधळी, नृत्त्यांगणा, ढोलकी, पिंगला, वाघ्या मुरळी, स्मशानजोगी, जोगी डकलवार, मदारी, बहुरूपी, रायंदर, नाथपंथी, डवरी गोसावी, भिल्ल पारधी या आदिवासी प्रवर्गातल्या निराधार लोकांची बिकट परिस्थिती झाली असल्याचं डोईजड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथल्या श्री संत साधू महाराज संस्थानचे आठवे वंशज आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत शंकर साधू यांचं काल दीर्घ आजारानं पुणे इथं निधन झालं, ते ७५ वर्षाचे होते. साधू यांनी उदगीरच्या उदयगीरी महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं. निळोबारायाचे अभंग वाणी आकलन आणि आस्वाद, गवाक्ष, मंथन, आवर्त, साधु महाराज चरित्र, तुकाराम स्तुती, भावार्थ एकनाथी भागवत, अनुभवामृत भाष्य, सार्थ एकनाथी भारुडे, साधू सुधा ग्रंथ ही संपादने, असे अनेक ग्रंथलेखन त्यांनी केलं आहे. **** बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात एका चाळीस वर्षीय मजुराचा काल मृत्यू झाला. मूळ ओडिसा राज्यातला असलेल्या या मजुरावर दोन दिवसांपासून कोरोना विषाणू सदृश्य लक्षणांमुळे उपचार सुरू होते. त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला असून, मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ***** ***
0 notes