Tumgik
#पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ जागांसाठी परवा २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ जागांसाठी एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाने रद्द केला असून त्याला पाच जूनपर्यंत बालनिरीक्षणगृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, या प्रकरणात नव्या कायद्याच्या आधारे अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाला जनतेतून विरोध झाला, त्यानंतर अल्पवयीन मुलाला समुपदेशनासाठी बालनिरीक्षणगृहात पाठवण्याबाबत पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे अर्ज केला होता. 
****
उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली तेव्हा एकजण पोहून किनारी आला होता. गेले दोन दिवस राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.
****
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी परवाना विभाग तसंच अतिक्रमण विभागाला सतर्क होऊन अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागानं अनधिकृत होर्डिंग विरोधात धडक कारवाई करत आतापर्यंत मुंबईतल्या ३४ होर्डींग्जवर निष्कासनाची कारवाई केली आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी पाटील यांची ओळख होती. जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
पश्चिम बंगाल सरकारनं २०१० नंतर जारी केलेली इतर मागासवर्ग-ओबीसीची सर्व प्रमाणपत्र कोलकाता उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहेत. ओबीसी प्रमाण-पत्र जारी करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं २०१० नंतर तयार करण्यात आलेल्या ओबीसी सूचीला बेकायदेशीर ठरवलं. न्‍यायालयाने पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोगाला पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोग अधिनियम १९९३ च्या आधारे ओबीसीची नवीन यादी तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. जे मागासवर्गीय आधीपासून सेवेत आहेत, आरक्षणाचे लाभार्थी आहेत किंवा राज्य भरती प्रक्रियेत यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यांच्या सेवेवर या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 
****
येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियममध्ये, साखळी सामन्यात अर्जेंटीनाचा ५-४ अश्या गुणांनी पराभव केला. या सामन्याचा निर्णय शूटआउट नंतर झाला. या शुटआऊट मध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर अभिषेकने पाचवा गोल केला. उद्या पुरुष हॉकी संघाचा सामना यजमान बेल्जियमशी होणार आहे.
दरम्यान भारतीय महिला हॉकी संघाला युरोपीय दौऱ्याच्या पहिल्या साखळी सामन्यात  अर्जेंटीनाकडून शून्य-पाच अश्या फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॅकी संघाचा सामना  आज बेल्जियमशी होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, परवा १३ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधन-सामुग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आली आहे. या अकरा मतदार एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढवत असून, एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांवर, ५३ हजार ९५९ बॅलेट युनीट, २३ हजार २८४ कंट्रोल युनीट आणि २३ हजार २८४ व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे, दोन कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
****
मतदानासाठी बीड जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, नागरीकांनी मतदान करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ३५५ मतदान केंद्र आहेत.  यापैकी एका ठिकाणी किमान चार लोकांना एकाच वेळी मतदान करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर पाण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी पाळणाघर असणार आहे. वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आशा वर्कर केंद्रात राहतील. एकूण ६३ मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिलचेअर ची व्यवस्था करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकार्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते जोरदार प्रचार करत आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार इथं महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केलं. त्यापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार असलेल्या भागात उष्णतेची लाट नसल्याचा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. या फेरीत उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर या नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या एकूण ९६ जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम राजस्थान वगळता भारताच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट नाही. तसंच पश्चिम राजस्थानमधली उष्णतेची लाट उद्यापासून कमी होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर के जेनामणी यांनी सांगितलं.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे लातूर शहरातल्या बार्शी रोडवरील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दोन बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने हे विवाह थांबवून पालकांचं समूपदेशन केलं. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आणि बालविवाहाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर - नांदेड सचखंड एक्सप्रेसची उद्या रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
भारताचा ऑलिम्पिकपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. नीरजनं सहाव्या प्रयत्नात ८८ पूर्णांक ३६ मीटर अंतरावर भाला फेकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताच्या किशोर जेना यानंही यंदा डायमंड लीगमध्ये पदार्पण केलं. ७६ पूर्णांक ३१ मीटर भालाफेक करत तो  नवव्या स्थानावर राहिला.
****
भारताची कुस्तीपटू निशा दहियानं आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. तुर्की मध्ये काल झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निशानं ६८ किलो वजनी गटात उपान्त्य फेरीत रोमानियाच्या खेळाडुचा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी निशा ही पाचवी भारतीय महिला कुस्तीपटू आहे. याआधी अंतिम पंघाल, विनेश फोगाट, अंशु मलिक रितिका हुडा या देखील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव तर नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडीची औरंगाबादमधून अफसर खान, परभणी - बाबासाहेब उगले तर नांदेडमधून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी
नांदेड तसंच लातूर इथं मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम
आणि
पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याची काल्याची दहीहंडी फोडून सांगता
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी महाविकास आघाडीकडून काल अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यावेळी उपस्थित होते. शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करुन जाधव यांनी सभेला संबोधित केलं. इतर चार उमेदवारांनी देखील काल अर्ज दाखल केले. या मतदरासंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे १८ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय किसान पक्षाचे विष्णू जाधव यांच्यासह जगदीश पोतरे, सुरज कदम, नागोराव वाघमारे आणि नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन या अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज भरले. नांदेड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ११ अर्ज दाखल झाले आहेत.
हिंगोली लोकसभा मतदार संघात काल पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांनी काल महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला. त्याशिवाय ओबीसी बहुजन पार्टीचे रवि शिंदे यांच्यासह नामदेव कल्याणकर, देशा बंजारा आणि वसंत पाईकराव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अमर काळे यांनी महाविकास आघाडीकडून काल उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे प्रमुख, खासदार शरद पवार यावेळी उपस्थित होते.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी महायुतीकडून काल उमेदवारी अर्ज भरला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.
यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी देखील काल उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार आदित्य ठाकरे आणि रोहीत पवार यावेळी उपस्थित होते. या मतदारसंघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.
****
काँग्रेस पक्षाने काल सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये ओडिशामधल्या आठ, आंध्र प्रदेश पाच, बिहार तीन, तर पश्चिम बंगालमधल्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
****
लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं काल पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. औरंगाबाद मतदार संघातून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणी इथून बाबासाहेब उगले, नांदेड - अविनाश भोसीकर, पुण्यातून वसंत मोरे यांना तर शिरूर इथून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी, सुरक्षा दल आणि मतदान यंत्रांचं पर्यवेक्षण करण्याचं महत्त्वपूर्ण काम विशेष निरीक्षकांवर सोपवण्यात आलं आहे. विशेष निरीक्षक राज्याच्या मुख्यालयात थांबून तसंच स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून संवेदनशील भागाचा दौरा करतील, असं आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रं आणि त्याठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, सुरक्षा यंत्रणा, संदेशवहन यंत्रणा, इंटरनेट आदींची उपलब्धता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.
****
नवमतदारांनी मतदान करुन आपलं कर्तव्य पूर्ण करावं, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्या प्रमुख मिनल करनवाल यांनी केलं आहे. नांदेड शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात तीनशे नवमतदारांसोबत संवाद साधताना त्या काल बोलत होत्या. मतदान आवश्यकता आणि गरज या विषयावर विविध उदाहरणं देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज स्वयं सहाय्यता गटातल्या सुमारे एक लाख ८५ हजार महिला मतदान करण्याची शपथ घेणार आहेत. या मोहिमेत महिला आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असं आवाहन करनवाल यांनी केलं आहे.
****
जागतिक ऑटीझम दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून मतदानाविषयी काल जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या उपस्थितीत ३५० विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत नागरीकांना मतदानाचं आवाहन केलं. जिल्हा परिषदेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या मतदार जनजागृती संकल्पनेचं उद्घाटन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकार्यांनी लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं असंघटीत कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. 
****
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या दहा तारखेला रामटेक इथं जाहीर सभा होणार आहे. १४ एप्रिलला नागपूर मध्ये दीक्षाभूमी इथं दर्शन घेऊन, पंतप्रधान मोदी चंद्रपूर इथं सभा घेणार आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
चंद्रपूर लोकसभा मतदरासंघातले भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काल प्रचारादरम्यान वार्ताहरांशी संवाद साधला. जनतेच्या हितासाठी ही लढाई असून, आपल्याला नागरीकांचा आशिर्वाद मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातले ओंकार संजय निकुंभ हे खुला आणि मागास वर्गवारीतून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या स्वप्नाली तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या २४५ व्या नाथषष्ठी सोहळ्याची काल काल्याची दहीहंडी फोडून सांगता झाली. यावेळी वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसंच छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदीरातही काल काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगरसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. शहराच्या दोन हजार ७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा घेण्यासाठी दाखल जनहीत याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जलकुंभांबाबत माहिती घेतली. हनुमान टेकडी आणि टीव्ही सेंटरचे जलकुंभ हस्तांतरित करण्यात आले असून, इतर चार जलकुंभांचं हस्तांतरण एप्रिल अखेरपर्यंत करण्यात येईल, असं संबंधित कंपनीने यावेळी सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी १६ एप्रिलला होणार आहे.
****
नांदेड जिल्‍ह्यात वेगवेगळ्या तालुक्‍यात एकाच दिवशी घडणा-या बालविवाहांना महिला आणि बाल विकास विभाग, जिल्‍हा आणि पोलीस प्रशासन यांच्‍या सहकार्यानं रोखण्‍यात यश आलं. महिला आणि बाल विकास विभागाच्या कर्मचा-यांना घटनास्‍थळी पाठवून हे बालविवाह समुपदेशनाच्‍या माध्‍यमातून थांबवण्यात आले. जिल्ह्यात बाल विवाह रोखण्‍यासाठी ग्राम बालसंरक्षण समितीने आपली भूमिका कर्तव्‍यदक्षपणे पार पाडावी, असं आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं काल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातल्या तीन जणांना दीड हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलं. जिल्हा व्यवस्थापक सुनिल काची, कार्यालय सहाय्यक छाया वाकोडे, संगणक ऑपरेटर आशिष जाधव यांनी तक्रारदाराच्या मसाला उद्योग सुरू करण्यासाठी मागणी केलेले कर्ज प्रकरण मंजुरीला पाठवण्यासाठी ही लाच मागितली होती. 
****
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसची खाती गोठवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ धाराशिव इथं काल जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनानंतर जिल्हाधकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल मुंबईत वरळी आणि अंधेरी इथं अवैध मद्याचा साठा आणि चारचाकी वाहनासह ३७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सतीश शिवलाल पटेल या आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हवामान
राज्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे. काल मालेगाव आणि जेऊर इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात जालना आणि बीड इथं ४० अंश, लातूर ३९ तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची मोठी संधी - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप
      आणि    
नांदेड जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बारामती इथं काल नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यापूर्वी नागपूर, लातूर आणि अहमदनगर इथं मेळावे झाले, बारामतीतला हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून, यातून २५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी बारामतीचं बस स्थानक, बऱ्हाणपूरच्या पोलीस उप - मुख्यालय इमारतीसह बारामती तालुक्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासकामाचं भूमिपूजन देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
भारतीय जनता पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेश मधून ५१, मध्य प्रदेश २४, पश्चिम बंगाल २०, गुजरात आणि राजस्थान मधून प्रत्येकी १५, केरळ १२, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड मधून प्रत्येकी ११, तेलंगणा नऊ, दिल्ली पाच, उत्तराखंड तीन, जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधून प्रत्येकी दोन, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, आणि दमन दिव मधून प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा मतदारसंघातून, अमित शहा गांधीनगरमधून, राजनाथ सिंग लखनऊ, स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठवणार असल्याची माहिती, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यभरातले भाजपाचे ३३ हजाराहून अधिक कार्यकर्ते सूचनापत्राची पेटी घेऊन घरोघरी जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. येत्या चार तारखेला नागपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाच तारखेला अक��ला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यक्रमात सहभागी होतील असं बावनकुळे म्हणाले.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यंदा पहिल्यांदा मतदान करणारे छत्रपती संभाजीनगर इथले साक्षी वैद्य आणि कैवल्य जोशी यांनी मतदान करणार असल्याचा संकल्प केला,
****
देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या, एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पुर्णपणे माफ होणार आहे. या एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत होतं.
****
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्यात सर्वच शैक्षणिक संस्थांनी येत्या जूनपासून करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळा, या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यासोबतचं मुलींना येत्या १ जूनपासून सर्व शिक्षणाचा लाभ मोफत मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सहकार विभागानं राज्यातल्या सुमारे ३८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, लातूर शहरात २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरती पथकं, तर जालना इथं एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये २३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा नजिक काल, दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त तिघे जण, आपला बारावीच्या परीक्षेचा पेपर देवून माहूर तालुक्याच्या अंजनखेड इथून एकाच दुचाकीवरुन वापस येत होते. दुपारच्या सुमारास दुचाकी दहेली तांडा गावाजवळ आली असता, एका वळण रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटून, ती झाडावर आदळली. गावातल्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या हिताच्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत, शेती समृद्ध करण्याचं आवाहन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं कृषी विभागातर्फे आयोजित 'गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाला' काल दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवातल्या विविध कृषी विषयक दालनांना भेट देउन, त्यांनी शेतक-यांसोबत चर्चाही केली.
****
लातूर जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचं सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या, मांजरा प्रकल्पातला पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्यानं, शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसंच कोणत्याही गावाला पाणी टंचाई सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात काल लेखक माणिक पुरी यांच्या "पक्षी येती अंगणी" या कादंबरीवर परिसंवाद घेण्यात आला. पक्षी नसतील तर माणूसही संपुष्टात येईल, या सलीम अली यांच्या वाक्यानं आपल्याला अंतर्मुख केल्याचं, पुरी यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या बहुआयामी लेखन प्रवासाबद्दल आपला मनोगत व्यक्त केलं.
****
हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण काल काढण्यात आलं. या तलाव परिसराचं आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार ही कारवाई झाली.
****
0 notes